राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर ...

पहाटे सहा वाजता उठून तयार झालो. बरोब्बर सात वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो.. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरू झाली. समोर दूरवर 'सुवेळा माची'चे टोक दिसत होते.. अंदाज बांधला.. तिथपर्यंत पोचायला किमान दोन तास तरी लागणार.

border2.JPG

रा

त्रीच्या मुंबई-पंढरपूर गाडीने मी एकटाच पुण्याच्या दिशेने निघालो होतो.. पाठीवर असलेल्या मोठ्या सॅकमुळे ठाण्याला जनरल डब्यात कसाबसा घुसलो होतो.. रात्रीच्या शांततेत ट्रेनची धडधड अधिकच जोरात जाणवत होती.. तितकीच ताणली गेली होती माझी उत्कंठा! कारण मी जात होतो स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर... राजगडावर! याआधी दोनतीन वेळा राजगड दर्शन झालेले होते. यावेळी मात्र राजगडाला प्रदक्षिणा घालायची योजना होती. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून २२५ दुर्गप्रेमी राजगडावर हजेरी लावणार होते. मालाड येथील 'नेचर लवर्स' या संस्थेने हा कार्यक्रम ठरवला होता. माहिती द्यायला सोबत असणार होते इतिहासतज्ज्ञ आप्पा परब. पहाटे पाचच्या आसपास पुण्याला पोचलो आणि मी लगेच माझा मोर्चा एसटी स्थानकासमोरच्या चहावाल्याकडे वळवला. सोबत एक क्रीम रोल खाल्ला आणि सहाच्या 'वेल्हे' गाडीची वाट बघत बसलो. गाडी आल्यावर माझी सर्वांत आवडती जागा पकडली. इथेतिथे कुठे नाही तर थेट ड्रायव्हरच्या बाजूला, गियर बॉक्सच्या शेजारी! एसटी मधून प्रवास करताना मला नेहमीच ही जागा आवडते. दोन तासांत 'साखर'ला पोचलो. एसटीला टाटा केला आणि 'गुंजवणे'ची वाट पकडली. आता पुणे-सातारा महामार्ग सोडून गाडी आत वळली आणि काही वेळातच दूरवर राजगड साद घालू लागला होता...

1.jpg
पद्मावती माची आणि बालेकिल्ला!

गुंजवणेला 'नेचर लवर्स' संस्थेच्या सदस्यांकडे आल्याची नोंदणी केली. राजगडाला आले की बेधुंद व्हायला होते.. मनात अनेक विचार दौडत असतात.. त्या विचारांवर स्वार होत गड चढणीला लागलो. जरा वरच्या टप्प्याला गेलो की डाव्या बाजूला प्रचंड 'सुवेळा माची', त्यात असलेले नैसर्गिक 'नेढे', 'झुंजार बुरूज', समोर 'पद्मावती माची' आणि त्यामागे असलेला अभेद्य 'बालेकिल्ला' असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसते. ते बघत वरच्या चढणीला लागलो. मध्ये लागणार्‍या सपाटीनंतर वाट निमुळती होत अधिक चढणीला लागते आणि चोरवाट असल्याची साक्ष देत राहते. तासादीडतासाने शेवटच्या टप्प्यामध्ये वाट कड्याखालून गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकडे कड्यावरुन वर चढते. याच वाटेवर सुरू होतो 'राजगड प्रदक्षिणेचा मार्ग'. कारवी जिथे सुरू होते तिथून चोर दरवाजाकडे येण्याऐवजी जर तिकडून झाडीमध्ये डावी मारली तर एक बारीक पायवाट गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जाते. ही वाट फारशी मळलेली नाही. मी कड्यावरून चढून चोर दरवाजामधून प्रवेश करता झालो आणि पद्मावती माचीवरच्या आई पद्मावतीच्या देवळाच्या बाजूला एका तंबूमध्ये विसावलो. अनेकजण येऊन पोचले होते.. अनेक गड चढून येत होते.. सहा वर्षांच्या चिमुरड्यापासून ते सहासष्ट वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांचा उत्साह बघण्याजोगा होता.. आजच्या दिवसात जमेल तितका राजगड बघणे आणि उद्या गडाला प्रदक्षिणा घालणे असा दोन दिवसांचा कार्यक्रम नक्की होता.

2_0.jpg
पद्मावती तलाव!

'राजगड' - ज्या ठिकाणी राजांचे पंचवीस-सव्वीस वर्षे वास्तव्य होते. (१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या पंचवीस-सव्वीस वर्षांमध्ये? त्याने ऐकली १६४८मध्ये शहाजीराजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी. पाहिले बारा मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम. १६५५मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरुवातसुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ला अफझलखान आक्रमण करून आला तेव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडालासुद्धा वेदना देऊन गेले. १६६१मध्ये राजे पन्हाळगडावर अडकलेले असताना माँसाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सुरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमीसुद्धा ऐकली. १६६५मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले तेसुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७०मध्ये राजगडावरच झाला. १६७१मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने कायकाय नाही पाहिले! अनेक बरेवाईट प्रसंग.. म्हणून तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.

3_0.jpg
आई पद्मावती!

दुपारच्या जेवणापर्यंत सर्व दुर्गयात्री गडावर येऊन पोचले होते. संस्थेचे काही मुख्य सदस्य आणि आप्पांची मुलगी शिल्पा हिच्यासोबत सर्वजण गडफेरीला निघाले. मी मात्र देवळात आप्पांबरोबर थांबलो होतो. राजगड तसा दोनतीन वेळा बघून झाला होता. आज मात्र आप्पांबरोबर अधिक वेळ राहून काही अधिक ऐतिहासिक माहिती घेणे ही इच्छा होती. त्यामुळे पटापट सुवेळा माची आणि आसपासचे फोटो घेऊन पुन्हा देवळाबाहेर येऊन बसलो. त्या तासादोनतासांत ज्ञानात खूप भर पडली. राजगडाचे मूळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. 'राजगड' नाव दिले शिवरायांनी. आप्पांच्या मते खरंतर 'मुरूमदेव' हा 'बुहृमदेव' याचा अपभ्रंश असावा. बुहृमदेव म्हणजेच ब्रह्मदेव. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आजही ब्रह्मश्रीचे मंदिर आहे. शिवाय पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिरसुद्धा सयुक्तिक वाटते. खुद्द नावावरूनच राजगडाचे प्राचीनत्व समोर येते. राजगडाच्या बाबतीत आप्पांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे तोरण्याप्रमाणे इथे सुद्धा शिवरायांना झालेला धनलाभ.. गडाच्या गुंजवणे दरवाज्याचे काम सुरू असताना एके ठिकाणी अचानक गुप्तधन सापडल्याची काही माहिती 'सप्त प्रकरणात्मक' बखरीमध्ये दिलेली आहे. राजगडाच्या दोन्ही माच्या म्हणजे 'सुवेळा' आणि 'संजीवनी' यांच्या नावांबाबतसुद्धा काही माहिती ह्या बखरीमध्ये आढळते.

4_0.jpg
सुवेळा माचीचा विस्तार!

5_0.jpg
झुंजार बुरूज!

6_0.jpg
हत्ती प्रस्तर!

18_1.JPG

सूर्य कलायला लागला तसे सर्वजण परतू लागले. संध्याकाळी आप्पांचे छोटेसे व्याख्यान होते. शिवाय त्यांच्या 'राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर' या पुस्तकाचे प्रकाशनदेखील होते. वयाची सत्तरी गाठलेल्या आप्पांचा खणखणीत आवाज राजगडाच्या पद्मावती माचीवर निनादत होता. राजगडाचे सखे-शेजारी सिंहगड, तोरणा आणि दुरून रायगड या सर्वांचेच आज राजगडाकडे लक्ष लागले होते बहुधा.. म्हणता म्हणता आप्पांनी सतराव्या शतकातला राबता राजगड आमच्या डोळ्यांसमोर उभा केला.. ते देऊळ, माची, ते बुरूज, सदर- सारे काही पुन्हा शहारून जागे झाले होते.. भारावलेले काही क्षण ते पुन्हा नक्कीच जगले असतील.. व्याख्यान संपले, तसा गडही शांत झाला. आम्ही जेवून निद्रिस्त व्हायची तयारी केली आणि आपापल्या तंबूमध्ये जाऊन पहुडलो. मी कपाळावर हेडटॉर्च चढवला आणि नुकतेच प्रकाशित झालेले ते छोटेखानी पुस्तक अर्ध्या तासात पूर्ण वाचून काढले. रात्रीच्या अकरानंतर पुन्हा एकदा तंबूबाहेर आलो, तर सर्वत्र सामसूम होती. वारा मोकाट सुटला होता आणि दूरवर फडकणार्‍या जरीपटक्याला जोराने फडकवत होता. मी पुन्हा आत येऊन झोपी गेलो. उद्या पहाटे सहा वाजता गड सोडायचा होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर लागायचे होते.

पहाटे सहा वाजता उठून तयार झालो. बरोब्बर सात वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो.. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरू झाली. समोर दूरवर 'सुवेळा माची'चे टोक दिसत होते.. अंदाज बांधला.. तिथपर्यंत पोचायला किमान दोन तास तरी लागणार. आता झाडी कमी झाली होती आणि उंच वृक्षांतून डोकावणारे सकाळचे कोवळे ऊन आल्हाददायक वाटत होते.

8_0.jpg

मध्येच एके ठिकाणी कड्यावर अनेक मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसली. त्यांच्या वाटेला कोण जाणार! गुपचूप आवाज न करता सर्वजण पुढे सरकलो. अधूनमधून हळू आवाजात गप्पा सुरू होत्या- कोण कुठून आलंय वगैरे वगैरे. बहुतेक लोक पुणे-मुंबई आणि सातारा-कोल्हापूरचे होते. काही रत्नागिरी-रायगड तर काही नाशिक आणि पार नगर-औरंगाबादेहूनदेखील आलेले होते. मोजके दोनतीन लोक तर थेट नागपुराहून आलेले होते. तासाभराच्या चालीनंतर मध्ये एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. तिकडे कोपर्‍यात एक छोटुसे घरटे दिसले. पण घरात कोणीच नव्हते. सकाळीसकाळी बहुधा कामावर निघून गेले घरातले लोक!!!

7_0.JPG

आम्ही पूर्व दिशेने निघालो होतो, तेव्हा आता ऊन समोरून यायला लागले होते. सुवेळा माचीच्या उतरत जाणार्‍या डोंगरसरी एकएक करून पार करत आम्ही त्या टोकाकडे निघालो होतो. माझे लक्ष चौफेर होते. एक तर अशी भ्रमंती पुन्हा बहुधा होणार नव्हती, तेव्हा जे दिसेल ते डोळ्यांनी आणि कॅमेर्‍याने टिपणे हे माझे लक्ष्य होते. दर काही पावलांनी मी वळून मागे बघत असे. अश्याच एका वेळी टिपलेला हा बालेकिल्ल्याच्या महादरवाजाचा फोटो.

10_0.jpg
राजगडाचा बालेकिल्ला का अभेद्य आहे त्याचा एक प्रत्यय... आहे कोणाची हिंमत तिथवर पोचायची?

सुवेळा माचीपर्यंत पोचायचे अर्धे लक्ष्य पूर्ण झाले होते.. आता वाट अधिक वाट लावत होती.. आम्ही आता झुंजार बुरुजाच्या खाली होतो.. वाटेत एके ठिकाणी छोटीशी खोदीव गुहा लागली.. आत्तापर्यंत राजगडाच्या बाबतीत मी या गुहेचा उल्लेख कुठेच वाचलेला नाही. सुवेळा माचीच्या झुंजार बुरुजाच्या बरोबर खाली असलेल्या ह्या गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती हाती लागली नाही. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे निश्चित काहीतरी महत्त्व असू शकेल असे वाटते.

9_0.JPG

12_0.jpg
हत्तीप्रस्तरच्या खालच्या बाजूने. वाघाचा डोळा म्हणजेच 'नेढं' पण दिसतंय!

वर पाहिले तर लक्ष थेट 'हत्तीप्रस्तर'आणि 'वाघाचा डोळा' उर्फ नेढ्याकडे गेले. जबरदस्त नजारा होता! आता आम्ही सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्याचे अंतर बाहेरून पूर्ण करत होतो.. जेव्हा मी माचीच्या बाहेरील बाजूस पोचलो तेव्हा जे पाहिले ते थक्क करणारे होते..

13_0.jpg
सुवेळा माचीची बाहेरील बाजू.. जणू राजगड सांगतोय, 'लढलो जरि, ना पडलो मी!'

जेव्हा खुद्द औरंगजेब राजगडावर चालून आला तेव्हा मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने मोर्चे बांधून तोफांचे प्रचंड हल्ले केले होते.. खासा बादशाह जातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता.. त्याच्या खुणा आजही तिथे स्पष्ट दिसतात. या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीरपराक्रम केला. मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला की खुद्द बादशाह उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेबसुद्धा पडला होता. परंतु अखेरीस या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले. तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला. सुवेळा माचीच्या झुंजार बुरुजाच्या जरा पुढे उजव्या हाताला असलेल्या गणपतीच्या जागी आधी संताजींची वीरगळ होती असे म्हणतात.

इकडे काहीवेळ उसंत घेतली आणि सुवेळा माचीला वळसा घालत 'काळकाई बुरुजा'च्या दिशेने निघालो. वाट अधिकच घसरत होती. जमेल तिथे हाताला जे सापडेल ते पकडून पुढे सरकावे लागत होते. दहा वाजून गेले होते आणि ऊन आता पाठीवर हल्लाबोल करत होते.. कधी एकदा काळकाई बुरुजाच्या खालच्या गर्द झाडीत शिरतोय असे झाले होते.. तरी तिथे पोचायला तासभर लागलाच. सावली मिळाल्यावर जरा निवांत बसलो. वर बघतो तर संस्थेचे काही कार्यकर्ते काळकाई बुरुजावरून दोराच्या सहाय्याने पाण्याचे ड्रम खाली पोचवत होते. कोणालाही उन्हाचा त्रास होऊ नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सुवेळा माचीलादेखील त्यांनी असेच केले होते. हवे तितके पाणी प्यायचे आणि बाकी भरून घ्यायचे. आता आम्ही सावलीतून पुढे निघालो.. इकडे दोन ठिकाणी दोराच्या सहाय्याने खाली उतरायचे होते.. खरेतर इतके कठीण नव्हते पण काहीजण नवखे असल्याने जास्त वेळ घेत होते.. ज्यांना जमत नव्हते त्यांना धीर देत पुढे न्यावे लागे.. पण महत्त्वाचे म्हणजे कोणी मागे हटत नव्हते.. वेळ लागला तरी हे करायचेच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला होता. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांबरोबर ट्रेक करायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी एकटाच ह्या ट्रेकला आलेलो होतो.. मला थेट ओळखणारे असे कोणीही ह्या सव्वादोनशे लोकांमध्ये नव्हते. तरी सुद्धा सर्वजण एकमेकांना सांभाळत, काळजी घेत ट्रेक करत पुढे सरकत होते. आमच्यात असणारा एकमेव समान दुवा म्हणजे शिवरायांवर असणारी निस्सीम भक्ती, आदर आणि देवतुल्य भावना.. हा एक दुवा आमच्यात नवे बंध निर्माण करायला पुरेसा होता.

काळकाई बुरुजाच्या खालचा हा छोटासा टप्पा पार करायला चांगले दोन तास लागले! वळसा मारून आता आम्ही 'संजीवनी माची'च्या दिशेने निघालो. बारा वाजून गेले होते आणि पोटात भूक जाणवायला सुरूवात झाली होती. उजव्या बाजूला वरती 'अळू दरवाजा' आणि तिथून दोराच्या सहाय्याने खाली पाठवले जाणारे साहित्य पाहिले आणि खात्री पटली की पोटापाण्याची सोय झालेली आहे. बरेच दिवसांनी वनभोजनाचा आनंद लुटला आणि जरा निवांत झालो. आता पुढची वाट बरीच सोपी होती. राजगडावरून तोरण्याला ज्या वाटेने जातात तीच वाट आता घ्यायची होती. उजव्या बाजूला संजीवनी माचीचे दुहेरी संरक्षक बुरूज अगदी जवळ दिसत होते.

14_0.jpg
दुहेरी बुरूज संरक्षण... अद्वितीय तटबंदी... संजीवनी माची!

संजीवनी माचीच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च आविष्कार'. दोन्ही बाजूस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरीत्या खाली उतरणारे दोन्ही बाजूस तीन, असे एकूण सहा दुहेरी बुरूज आणि टोकाला असणारा 'चिलखती बुरूज'. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले, ना कोणी करू शकेल!! मागे कधीतरी (बहुधा १९८७ मध्ये) स्वित्झर्लंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसर्‍या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. आम्ही आता एका बाजूचे तीन दुहेरी बुरूज बघत होतो.. आत जाणे आत्ता शक्य नव्हते, पण त्यासाठी मी उद्याचा दिवस हातात ठेवला होता. काही मिनिटांत संजीवनी माचीला वळसा मारत पुन्हा राजगडाच्या राजमार्ग म्हणजे 'पाली दरवाज्या'च्या दिशेने निघालो. वाट आता प्रस्तर होती आणि इथून संजीवनी माचीचे तीन टप्प्यांत केलेले बांधकाम स्पष्ट दिसत होते.

15_0.jpg
संजीवनी माचीचे तीन टप्प्यांमधले घडीव देखणे बांधकाम!

16_0.jpg
पाली दरवाजा- दुहेरी रचना!

वाटले नव्हते, पण जेवून निघाल्यावरसुद्धा चांगले तीन तास लागले होते 'पाली दरवाज्या'पर्यंत यायला! संजीवनी माचीची लांबी किती आहे याचा प्रत्यय नेमका येत होता. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. तब्बल अकरा तास लागले होते प्रदक्षिणेला! पण एक इच्छा पूर्ण झाली होती.. सूर्य पुन्हा एकदा निरोप द्यायला तयार झाला होता. मी पुन्हा राजमार्गाने गड चढून पद्मावती माचीकडे पोचलो आणि सदरेमागच्या तटबंदीवरून सूर्यास्त बघू लागलो.

17_0.jpg
दिवसअखेरीस प्रदक्षिणा संपली असली, तरी जेवणाआधी अजून एक कार्यक्रम बाकी होता- शिवरायांची पालखी नाचवायचा.. पेटत्या मशाली, फडकणारे जरीपटके आणि मधोमध श्री शिवछत्रपतींची पालखी. वा!!!

11_0.JPG

यापेक्षा अधिक उल्हसित करणारा सोहळा कुठला? त्यादिवशी भरून पावलो. शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता.. गड पुन्हा एकदा जागा झाला होता.. बर्‍याच काळाने शहारून उठला होता तो.. आपली माणसे भेटली की जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद राजगडाला झालेला होता. बर्‍याच काळाने गड शांत झाला. सर्वजण पांगले.. जेवणे आटोपली.. निवांत पडले. पहाटे उठून पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे होते ना!

मी सकाळी जरा उशिराने उठलो. सर्वांची आवराआवरी सुरू होती. सर्वत्र साफसफाई करून गड सोडायचा होता, आणि मग तिथून आपापल्या घरी. मी मात्र मागे थांबणार होतो.. गड जरा उशिराने सोडायचा असे मी ठरवले होते. स्वतःचे सामान पाठीवर मारले, आप्पांना नमस्कार केला आणि निरोप घेऊन मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळीसकाळी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून मला एक फोटो घ्यायचा होता..

19_0.jpg
बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने. समोर दिसतोय सुवेळा माचीचा विस्तार!

बालेकिल्ल्यावर एक धावती चक्कर मारली आणि उतरून संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकूण तीन टप्प्यांत विभागली आहे. जमेल तितके पुढे जाऊन मला काही फोटो घ्यायचे होते.

20_0.jpg
संजीवनी माची!

21_0.jpg
मोजके फोटो घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. खरेतर दुहेरी बुरूजांपर्यंत जाऊन काही फोटो घ्यायचे होते पण ते शक्य झाले नाही. मी वळून पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो.

22_0.jpg

तिथे काही वेळ घालवून मी पुन्हा पद्मावती माचीकडे निघालो. खरेतर तिकडून उतरून वाजेघरमार्गे जाता आले असते, पण मी पुन्हा गुंजवणेमार्गेच उतरायचा निर्णय घेतला. पद्मावती आईच्या मंदिरापाशी आलो.. सर्वत्र सामसूम होती.. सर्वजण निघून गेले होते.. गडावर बहुधा मी एकटाच होतो.. नाही म्हणायला एक कुत्रा समोर स्तंभापाशी बसला होता.. मंदिरात जाऊन आईला नमस्कार केला.. बाहेर येऊन उजव्या बाजूला पाहिले तो बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जरीपटका अजूनही डौलाने फडकत होता.. नकळत एक हात छातीवर गेला.. राजांचे स्मरण झाले!

मी दोन्ही हातांनी सॅक टाईट केली आणि झपाझप पावले टाकत परतीच्या वाटेला लागलो. चोर दरवाजाच्या पायर्‍या उतरायच्या आधी पुन्हा एकदा नजर मागे वळलीच. मनातच म्हणालो, "राजगडा... मी पुन्हा येणार आहे. लवकरच..."

- पक्का भटक्या

Taxonomy upgrade extras: