बच्चन येतो ना, भौऽऽऽ..!!

"मग काय? धर्मेंद्रला बांधून ठेवतात आणि गब्बरसिंग बसंतीला नाचायला सांगतो."
"होऽऽ?"
"तर.. आणि तिला म्हणतो – जबतक तेरे पैर चलेंगे, इसकी सांस चलेगी.."
"धर्मेंद्र खवळून ओरडतो – बसंतीऽऽऽ, इन कुत्तों के सामने मत नाचना।"
"आयल्ला.. मग रे?"
"बसंती तरी काय करणार? नाचते ना बिचारी त्या गाण्यावर – जबतक है जान, जानेजहां मैं नाचूंगी.. त्यात वर अर्धं गाणं झाल्यावर गब्बर त्याच्या माणसांना नुस्ती खूण करतो आणि त्याची माणसं फटाफट दारूच्या बाटल्या जमिनीवर फोडतात.. आता बसंतीनं त्या काचांवरच नाचायचं."
"तिच्याऽऽयच्ची तर त्या .. गब्ब्बरच्याऽऽ!"
"हां ना राव.. ती नाचायला लागते आणि मध्येच एकदम कच्चकन पायात काच घुसते.."
"अर्रर्र.. काच कस्सली कापते माहित्ये, आपला काचेरी मांजा आहे ना राव .. लै भारी!"
"ते तर काहीच नाही. एकदा हेमामालिनी नाचताना चक्कर येऊन धाडकन् पडते, बोल.."
"आई शप्पत.. मग रेऽऽ? मरतोऽऽ? धर्मेंद्र..?"
"अरे हॅट्ट…. बच्चन येतो ना भौऽऽऽ!"

--
किमान चार पिढ्यांनी तरी, त्यांच्या लहानपणी, अमिताभच्या सिनेमांची स्टोरी मित्रांना सांगितली असेल, पण दरवेळी "अरे हॅट्ट…. बच्चन येतो ना भौऽऽ" म्हणताना तीच उत्कंठा!

"तो फालतू ऍक्टर आहे रेऽऽ" असं म्हणणार्‍यांपैकी तुम्ही असाल तर पुढे वाचून उपयोग नाही.
"तो आता फालतू रोल करायला लागलाय" म्हणाल तर ठीक आहे; तुमच्यात सुधारणा व्हायला वाव आहे.
"तो निदान वेगवेगळे रोल ट्राय करतोय" असं म्हणत असाल तर तुम्ही योग्य दिशेनं विचार करताय.
"रोल कुठलाही असू दे यार, तो ऍक्टिंगमधला गॉड आहे " असं म्हणणारे असाल तर एकदम योग्य जागी आलायत.

अमिताभच्या अभिनयाबद्दल इतकं लिहिलं गेलंय की अजून वेगळं काय लिहिणार? हा लेख वेगवेगळ्या सिनेमांतली बच्चनची एंट्री किंवा ठराविक प्रसंगातली त्याची एंट्री एवढ्यापुरताच ठेवायचा प्रयत्न करतो. तरीही, मारूतीच्या शेपटीसारखे, एकापाठोपाठ एक प्रसंग आठवतीलच आणि लिहिलेलं तुम्हालाही कमीच वाटेल. खात्री आहे माझी.

बाय दि वे, एक पाहिलंयत? त्याचे जे एसी आहेत ना ते नुसतं ‘बच्चन’ म्हणतात किंवा ‘अमिताभ’. ‘अमिताभ बच्चन’ नाही आणि थिल्लर मीडियासारखं ‘बिग बी’, ‘एबी’ वगैरे तर नाहीच नाही. (फॅनपेक्षा एक पाऊल पुढे असतो तो एसी..)

काय धमाल असते ना त्याला पडद्यावर येताना पाहणं म्हणजे! कॉलेजमधे असताना आम्ही साताठ मित्र ‘अग्निपथ’ पहायला गेलो होतो. फर्स्ट डे – फर्स्ट शो! सुरुवातीचे, विजयच्या लहानपणीचे वगैरे, सीन चालू होते तेव्हा एक मित्र सारखा कटकट करत होता, "च्यायला तुम्ही माझी झोप खराब केली. पिक्चर बोर है यार.." पण जेव्हा कानावर शब्द पडले, "विजय चौहान. पूरा नाम- विजय दीनानाथ चौहान..! बाप का नाम दीनानाथ चौहान। माँ का नाम सुहासिनी चौहान । गाँव मांडवा… " तेव्हा आमचा मित्र ताडकन सावरून बसला. तो प्रसंग संपल्यानंतर म्हणत राहिला - "बॉस्स, ये पिक्चर तो हिट है।" मग पिक्चरभर बच्चनचा वावर पाहताना आणि त्याने मुद्दाम बदललेला आवाज ऐकताना दर थोड्यावेळाने ह्याचं आपलं चालूच, "ये तो हिट्ट है यार…।" (तो सीन परत पहावा असं वाटतंय ना?)

‘अग्निपथ’मधलाच अजून एक प्रसंग – विजयचे विरोधक त्याच्या तरूण बहिणीला पळवून नेतात तो! त्या धक्क्याने बेशुद्ध झालेल्या आईजवळ बसून विजय म्हणतो -- "विजय चौहान की बहन को उठाके ले गये.. काट के फेक देगा साला.." इतक्या वेळा सिनेमा पाहून अजूनही समजत नाही की, जास्त धगधगता अंगार कशात भरलाय? ती थंड नजर आणि त्या थंड आवाजात की नंतर झोपडपट्टीत उद्रेकलेल्या ज्वालामुखीत?

खरंतर आता असं वाटतंय की, फक्त ‘अग्निपथ’मधल्याच त्याच्या कामावर एक वेगळा लेख लिहावा!

अग्निपथच कशाला? शोले, दीवार, जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी, काला पत्थर, त्रिशूल, सत्ते पे सत्ता, मुकद्दर का सिकंदर, शक्ती, शान, कालिया, आखरी रास्ता, हम, खुदा गवाह, मोहब्बतें, अक्स, खाकी, आँखें, देव, ब्लॅक, सरकार, एकलव्य … हुश्श! यादी संपतच नाहीये. बरं ह्यात अजून कभी कभी, सिलसिला, बेमिसाल, चुपके चुपके, अभिमान, नमक हलाल, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, वक्त, बागबाँ, चीनी कम असे अजून काही सॉफ्ट रोल आठवणारच. अरे.... किती लेख लिहायचे?

थोडं विषयांतर करतोय पण मुकुल आनंद खूप लवकर गेला. बच्चन जेव्हा ‘देसाई- मेहरा’ साच्यात अडकला होता तेव्हा ‘हम’मधला शेखर उर्फ टायगर, ‘अग्निपथ’मधला विजय चौहान आणि ‘खुदा गवाह’मधला "सरजमीन-ए-हिन्दोस्ताँ ओ वालेक्कुम सलाम" म्हणणारा अफगाण बादशाह खान आपल्याला मुकुल आनंदनेच तर दिले. डॅनी डेंग्झोंपा किती रुबाबदार दिसू शकतो, तेसुद्धा मुकुल आनंदनेच दाखवलं.

ह्या लेखासाठी ‘दीवार’, ‘त्रिशूल’ आणि ‘डॉन’ हे खास सिनेमे आहेत. ‘दीवार’मधला तो गोदामातला प्रसंग आठवतोय ना, "पीटर … तुम लोग मुझे ढूँढ रहे हो और मैं यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हूँ." त्या प्रसंगापूर्वी, वादळाआधीच्या शांततेसारखा, एक संवाद आहे, "अगले हफ्ते एक और कुली इन मवालियोंको पैसा देनेसे इन्कार करनेवाला है !"

‘दीवार’मधलाच तो शेवटचा ऑल टाईम क्लासिक सीन? नास्तिक विजय – आयुष्यात देवळाची पायरी न चढणारा विजय, आई वाचावी म्हणून, शंकराच्या देवळात येतो तो प्रसंग. "आज … खुश तो बहोत होगे तुम" डायलॉगचा! आवाज तर सोडा; पण डोळेही काय बोलतात ह्या माणसाचे. मध्यंतरी एकदा अमिताभला प्रत्यक्ष स्टेजवर हा डायलॉग म्हणताना बघायला मिळालं होतं. दहा-बारा हजार लोक 'टाचणी पडली तरी आवाज होईल' अशा शांततेत बच्चनचा आवाज कानांत साठवून घेत होते.

‘त्रिशूल’मध्ये त्याच्या एंट्रीलाच पार्श्वभूमीला सुरूंगाचे स्फोट होताना दाखवलेत. हातातल्या बिडीने सुरूंगांच्या वाती पेटवत, त्या धुराळ्यातून हा आपल्या दिशेनं चालत येतो, ज्याला 'ऊझिंग विथ कॉन्फिडन्स' म्हणतात ना तसा! शेट्टीचा अड्डा तोडायला तर डायरेक्ट अँब्युलन्स घेऊनच येताना दाखवलाय! आजही भारतात कुठल्याही थिएटरला (सोफिस्टिकेटेड मल्टिप्लेक्सला नाही!) ‘त्रिशूल’ लावला तर त्या सीनला शिट्ट्यांचा पाऊस पडेल.

यश चोप्रा म्हणजे 'किंग ऑफ रोमान्स' असं मानणार्‍यांना विश्वास ठेवणं जड जाईल; एकेकाळी ह्याच यश चोप्राने आपल्याला ‘दीवार’, ‘काला पत्थर’ आणि ‘त्रिशूल’ मधला दाहक बच्चन दिलाय.

‘काला पत्थर’ची पोस्टर्स मुंबईला रस्त्याच्या दुतर्फा पाहिलेली आठवतायत. त्या पोस्टरवर प्रामुख्याने दिसणारा बच्चनचा फक्त चेहरा! कोळशाने काळवंडलेला, कुठल्यातरी असह्य, अनामिक वेदनेने ओरडणारा तो चेहरा! पोस्टरवरचा तो मूक चेहराही खर्‍याखुर्‍या वेदनांनी ओरडतोय असं वाटायचं!

‘डॉन’च्या तर सुरूवातीलाच बच्चन येतो ना भौऽऽ! ‘डॉन’ पहिल्यांदा आला त्यावेळी इंपालाचं आकर्षण होतं, कारण त्या लांबलचक गाडीतून रूबाबदार बच्चन हातात बॅग घेऊन उतरतो. इफेक्ट पूर्ण करायला पार्श्वसंगीत म्हणजे डॉनची ती ‘सिग्नेचर ट्यून’ एकदम मस्तंय.

"अरे दीवानों, मुझे पहचानो .." गाण्यात सिंहाचा मुखवटा चेहर्‍यावरून काढत "मैं हूँ.. मैं हूँ.. मैं हूँ डॉन" असं बच्चन गायला लागला की आपलेही पाय आपसूक थिरकतात.. आमच्या 'Hidden Gems' ह्या म्युझिक ग्रुपच्या कार्यक्रमांत ‘अरे दीवानों…’ सुरू झालं की प्रेक्षकांतून कुणी ना कुणीतरी नक्की नाचायला लागतं.

हा लेख जरी बच्चनच्या पडद्यावरील आगमनाशी संबंधित आहे तरी ‘डॉन’ सिनेमात एक प्रसंग असा आहे ज्यात त्याची एक्झिट महत्वाची आहे. येस, "डॉनको पकडना मुश्किलही नहीं, नामुमकिन है !" डॉनला साजेल असाच प्रतिकूल परिस्थितीवरही मात करणारा कावेबाज मेंदू आणि सराईत थंडपणा इथे बच्चनने काय जबरी दाखवलाय.

माझं मत टोकाचं वाटेल, पण नवीन ‘डॉन’मधे शाहरूख पहिल्यांदा दिसतो तेव्हाच वाटतं, "हाऽऽ? आणि डॉन? आमची काय चेष्टा करता का काय ?"

‘अभिनयाची जुगलबंदी’ हा शब्दप्रयोग आपण बरेचदा ऐकतो. प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर ‘शक्ती’ पहावा. दिलीपकुमार आणि बच्चन .. समोरासमोर. नुसतं कल्पनेनंच थरारायला होतं तर पिक्चर बघतानाची काय बात? बच्चनची एंट्री आठवतीये? एक शाळकरी मुलगा, आपल्याच विचारांत गुंतलेला, पत्र्याचं डबडं लाथाडत जातो. कॅमेरा पायांवर आणि त्या डबड्यावर. नंतरच्या फ्रेममधे तसाच डबडं उडवत जाणारा बच्चन! विचारांच्या जाळ्यात गुरफटलेला .. एकलकोंडा.

‘शक्ती'मध्ये बच्चन पोलिस इन्स्पेक्टर नव्हता, पण दुसरा कुठलाही अभिनेता पोलिस इन्स्पेक्टर म्हणून बच्चनइतका रुबाबदार दिसला नाहीये; तुमचं काय मत? विश्वास बसत नसेल तर ‘राम-बलराम’ किंवा ‘परवरिश’ पहा.

गेल्या काही वर्षांतल्या ‘खाकी’ आणि ‘देव’मधूनही बच्चन इन्स्पेक्टर बनलाय. ‘खाकी’मधे सिनेमाच्या सुरूवातीचा सुस्तावलेला, निवृत्तीचे वेध लागलेला आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारी सिस्टीमला कंटाळलेला इन्स्पेक्टर, ‘हमारी ड्यूटी क्या है’ ह्या सीनला कसला चवताळतो ना राव!

आणि ‘खाकी’मधलाच तो माथेफिरू जमावाला सामोरा जातानाचा प्रसंग? म्हातारा झाला तरी सिंह गर्जनाच करतो बॉस्स .. 'म्याऊं' नाही.

‘शोले’चा रिमेक हा एक जोरदार फसलेला प्रयत्न (की वेडं धाडस?) असला तरी; एक गोष्ट नक्की की रामगोपाल वर्मा प्रतिभावान आहे. जो दिग्दर्शक आपल्याला ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कौन’ आणि ‘कंपनी’ देतो तो फालतू असूच शकत नाही. त्यामुळेच जेव्हा रामूबरोबर बच्चन ‘सरकार’ करतोय असं समजलं तेव्हा सगळे हरखले. थोडी भीतीही होतीच म्हणा. ‘गॉडफादर’ ह्या अप्रतिम कलाकृतीचं हिंदी रुपडं एकेकाळी आपल्याला फिरोज खानने ‘धर्मात्मा’ म्हणून दाखवलं होतं. आधीच प्रेमनाथ, त्यात गॉडफादर! (असाच अजून एक मराठी वाक्प्रचार आहे ना?!!!) सिनेमाचं व्हायचं तेच झालं होतं.

तर, ‘सरकार’मध्ये बच्चन हॉस्पिटलमधून परत घरी येतो तो सीन आठवा. सिनेमा हॉलच्या त्या मोठ्या पडद्यावर दिसतो बच्चनच्या हाताचा नुसता पंजा. ‘सरकार’ची सगळी ताकद आणि लोकांवरचं संमोहन दाखवायला तो सीन पुरतो. हॅट्स ऑफ टू रामू! आता सरकारचा विषय निघालाच आहे तर, दुबईहून आलेला गँगस्टर रशीद पहिल्यांदा सरकारला भेटतो, त्या सीनची आठवण न काढून कसं चालेल? बच्चनचा तर प्रश्नच नाही, पण रशीदचा रोल करणार्‍या झाकीर हुसेन ह्या गुणी नटाने पण काय काम केलंय यार. बहुतेक ‘झाकीर हुसेन’ ह्या नावातच प्रेक्षकांवर गारूड करायची शक्ती असावी. खरंतर सरकारमधे अभिषेक आणि के.के. मेनन ह्यांनी पण ‘तोडलंय’. ‘सरकार’मध्ये पार्श्वसंगीताचीही जणू महत्त्वाची भूमिका आहे. विशेषत: इन्टेन्स सीन्समधे पार्श्वसंगीताबरोबर ऐकू येणारा आवाज - ‘साम – दाम – दंड – भेद’ किंवा ‘गोविंदा, गोविंदा..गोविंदा, गोविंदा….गोविंदाऽऽऽ’.

अरे … पण आपण नुसत्या इन्टेन्स भूमिकांबद्दलच का बोलतोय? एक-दोन जरा हलकेफुलके सीन्ससुद्धा आठवूयात की! ‘नमक हलाल’ मधली क्रिकेट कॉमेंट्री आठवतेय? विसंगतीतून विनोद निर्माण करण्यासाठी आधी एखाद्या गोष्टीवर कमालीचं प्रभुत्व असावं लागतं. टीव्हीवर उठसूठ इंग्लिश टाकणार्‍यांनी बच्चनची क्रिकेट कॉमेंट्री जरूर ऐकावी.

पाठोपाठ "मैं और मेरी तनहाई" किंवा "मधुशाला" ऐकावं. इंग्लिश आणि हिंदीवरची त्याची जबरदस्त पकड लगेच समजते.

'अमर अकबर अँथनी' मधला आरश्याला चिकटपट्टीवाला सीन तर 'ऑल टाईम क्लासिक' आहे. किती वेळा ‘अमर अकबर..’ पाहिला आणि किती वेळा तो सीन पाहिला ह्याची गणतीच नाही. आणि तो डायलॉग? " ऐसा तो आदमी लाइफमें दोइच बार भागता है… ऑलिंपिक का रेस हो, या पुलिसका केस हो|"

'याराना'मध्ये बच्चनचा रोल जितका कॉमिक होता तितकंच मनात ठसलं होतं ते "सारा जमाना…" गाण्याआधी त्याचं बंद पॅसेजमधून चालत येणं. त्याच्या बुटांचा "ठॉक… ठॉक, ठॉक… ठॉक" असा आवाज तर अजूनही कानात घुमतोय. तो ‘ठॉक.. ठॉक’ आवाज मग गाणं सुरू होताना बेमालूमपणे ड्रम बीट्स होतो आणि गाण्यात मिसळतो. आणि तो असंख्य छोटे, छोटे लाईट बल्ब्स जडवलेला ड्रेस? तो आठवतोय?

बाय-द-वे, गाण्यावरून आठवलं - किशोरकुमारने, काळाच्या पडद्याआड जाण्याआधी, बच्चनसाठी गायलेलं शेवटचं गाणं आठवतंय?
'अंधेरी रातोंमें
सुनसान राहोंपर
हर जुल्म मिटानेको
एक मसीहा निकलता है
जिसे लोग शहेनशाह कहते हैं|'

‘शहेनशाह’च्या पोषाखाचा भाग असलेलं चिलखत लावलेला हात पाजळत, "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप हैं, नाम हैं शहेनशाह" म्हणणारा एक वेगळा बच्चन आपल्याला टिनू आनंदने दाखवला.
(चौकस लोकांसाठी टीप – ‘मुकुल आनंद’ आणि ‘टिनू आनंद’ ही एकाच माणसाची दोन नावं नाहीत. मुकुल आनंदच्या ‘अग्निपथ’मधे टिनू आनंदने कामही केलंय.)

गाण्यांपैकी सांगायचं तर ‘सत्ते पे सत्ता’मधलं ‘दिलबर मेरे, कबतक मुझे, ऐसेही तडपाओगे…’ आहे ना, त्या गाण्यात बच्चन स्क्रीनवर येतो तेव्हा कस्सला हँडसम दिसतो राव! त्याची दाढी तर असली गुळगुळीत केलीय की जणू त्याच्या आफ्टर शेव्ह लोशनाचा सुगंध पडद्यावर दरवळतो. हँडसम लुक्स आणि सेक्स अपिलाबद्दल विचारलं की, अगदी आजही बर्‍याच तरूण मुली बच्चनचं नाव घेतातच की.

‘सत्ते पे सत्ता’मध्ये तो रवी म्हणून जितका हँडसम दिसलाय तितकाच बाबूच्या रोलमधे खतरनाक दिसलाय.
पिक्चरमधला बाबूच्या एंट्रीचा जो प्रसंग आहे ना, तो तर कधीच विसरणं शक्य नाही. ठाम चाल, दगडी चेहरा आणि निष्ठूर डोळे– जणू मूर्तिमंत क्रूरकर्मा! बच्चन असा चालत येताना पडद्यावर दिसतो आणि त्यात आर.डी.चं खत्तरनाक पार्श्वसंगीत. सगळं थिएटर अस्वस्थ झालं होतं.

सिनेमाचा विषय निघाला की, "किती वेळा पाहिला आठवत नाही", "आता तर सिनेमा पाठ झालाय", "पाहिजे तर शेवटाकडून उलटे सीन्स सांगू शकतो", "कोण मोजत बसतंय? मनात आलं की पिक्चर पुन्हा एकदा पहायचा, बास!" अशी वाक्यं ऐकू आली की बिनधास्त विचारावं, "काय? ‘शोले’बहाद्दर का?" अरे, त्यात बच्चन धर्मेंद्रचं ‘स्थळ’ घेऊन मौसीकडे जातो ना तो सीन. त्यात शेवटची पंचलाईन "तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ ?" बच्चन कस्सला शांतपणे टाकतो यार! आता बघा, त्या सीनबद्दल लिहितानाच, "तुम्हारा नाम क्या है, बसंती?" आठवलंय. हॅ..असंच होतं नेहमी. आता पुन्हा ‘शोले’ पहायला हवा.

इथे ‘शोले’बद्दल बोलताना तर 'यूट्यूब'वगैरेचीही गरज नाही. मी नक्की सांगतो की, तुम्ही इतक्यातल्या इतक्यात ते सीन्स मनात रिवाइंड करून पाहिले आहेत. ‘शोले’ परतपरत बघावा आणि काय! प्रत्येकवेळी ‘शोले’ बघताना त्यात नवीन काहीतर सापडतंच. निखळ आनंद आकड्यांत मोजण्यापलिकडचा असतो हेच खरं..

नाही, नाही, नाही यार! ह्या सगळ्या यादीत आपण ‘जंजीर’ अजिबात विसरलो नाहीये. ज्या सिनेमाने हिंदी सिनेमाला ’अँग्री यंग मॅन’ दिला त्या जंजीरला विसरून कसं चालेल? ’जंजीर’मध्ये शेरखान पहिल्यांदा इन्स्पेक्टर विजयला पोलिस स्टेशनमधे भेटायला येतो तो सीन आठवा. एरियाचा दादा म्हणून गुर्मीत असलेला शेरखान! त्यात तो रोल साकार करायला ‘प्राण’….म्हणजे जबरदस्तच की. शेरखान खुर्ची ओढून बिनदिक्कतपणे बसणार तेव्हढ्यात, विजय समोरच्या टेबलावर बसल्याबसल्याच खुर्ची लाथाडून शेरखानाला ऐकवतो, "ये पुलिस चौकी है, तुम्हारे बाप का घर नहीं|"

खरी धमाल तर त्यानंतरच्या प्रसंगामध्ये आहे ना.. शेरखानाचं आव्हान स्वीकारून विजय त्याच्या गल्लीत पोचतो तो प्रसंग. पांढर्‍याशुभ्र कपडयांतला, शांत डोळ्यांत वादळ घेऊन उभा, बच्चन लगेच डोळ्यांसमोर आला ना? हे असंच होतं नेहमी. एकदा बच्चनच्या सिनेमांचा विषय निघाला की किती सांगू आणि किती ऐकू? सांगावं आणि ऐकावं तेवढं कमीच वाटतं.

मला खात्री आहे, अगदी आत्तासुद्धा, जगाच्या पाठीवर कुणी ना कुणीतरी ‘शोले’, ‘जंजीर’ किंवा ‘दीवार’ वगैरेची स्टोरी रंगवून सांगत असेल.. आणि म्हणत असेल, "अरे हॅट्ट..! बच्चन येतो ना भौऽऽ..!!"

- संदीप चित्रे