अपूर्ण....

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

-स्वरुप कुलकर्णी