व
याची पहिली पंधरा वर्षं पालघरजवळच्या एका गावी काढल्याने त्यावेळी माझ्यासाठी माझा देश म्हणजे, पालघर आणि आसपासचा परिसर, एवढाच होता. मात्र निसर्गानं या परिसराला भरभरुन दिलंय. गावाजवळून वाहणारी सूर्या नदी, पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना डोंगर आणि टेकड्या, जवळच केळवे, सातपाटीचा समुद्र... त्यामुळे निसर्गाशी जवळीक आपसूकच झाली.
पुढे कॉलेज आणि इंजिनीअरिंगसाठी मुंबईला आल्यावर मात्र हा देश, हे जग फार मोठं असल्याचा साक्षात्कार झाला. त्यावेळी ट्रेकिंगचा चांगला ग्रूप जमला आणि आजूबाजूचे छोटेमोठे ट्रेक केले. यामध्येच कधीतरी फोटोग्राफी आणि चित्रकलेचा छंद जडला.
आता कधी कामानिमित्त, कधी कुटुंबियांबरोबर तर कधी खास चित्रं काढण्यासाठी म्हणून देशाविदेशात प्रवास होतच राहतो. चित्रासाठी ठिकाणाचं निरीक्षण करताना मग काही वैशिष्ट्यं आपोआप जाणवायला लागतात आणि ती कागदावर उतरवायचा प्रयत्न होतो.
एकच भारत देश; पण मातीचा रंग जागोजागी बदलत राहतो. कोकणची लाल माती उत्तरेकडे पिवळसर होते, तर आसामकडे थोडी पांढुरकी होते. नारळ कोकण आणि केरळात मुबलक, पण दोन्हीकडची नारळाची झाडं वेगळी ओळखता यावीत.
गवताच्या झोपड्या सगळीकडेच, पण आसाममधल्या झोपड्यांची उंची जवळजवळ दुप्पट, बहुधा ब्रम्हपुत्रेच्या पुरापासून वाचण्याचा उपाय असावा.
अजून खूप फिरायचं बाकी आहे. मात्र समुद्र, डोंगर, पठारं, बर्फाच्छादित शिखरं, वाळवंट ते गर्द हिरवाई अशी सगळी वैशिष्ट्यं दाखवणारा असा भारत देश हा एकमेव असावा.
अशाच काही जागा कागदावर चितारण्याचा माझा प्रयत्न...
चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.
- अजय पाटील