संवाद सुबोध जावडेकरांशी

SJ-2.jpg

सु

बोध जावडेकर हे नाव मराठी विज्ञानकथा वाचकांच्या चांगलंच परिचयाचं आहे. मुंबई आय.आय.टी (IIT) मधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेले सुबोध जावडेकर मराठीतील उत्तम साहित्य, इंग्रजीतील विज्ञानकथा आणि एकूणच विज्ञानविषयक माहिती याचं वाचन करून थांबले नाहीत तर विज्ञानकथा लेखन हा साहित्यप्रकार त्यांनी स्वतःच्या लिखाणात मोठ्या कौशल्याने हाताळला. सुबोधच्या नावावर आज १६ पुस्तकं - ज्यात पाच विज्ञानकथासंग्रह (गुगली, वामनाचे चवथे पाऊल, संगणकाची सावली, आकाशभाकिते आणि पुढल्या हाका) आणि भोपाळ दुर्घटनेवर आधारित 'आकांत' ही विज्ञानकादंबरी एवढं लिखाण जमा आहे. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाची उत्कृष्ट कथासंग्रहाची पारितोषिकं मिळाली आहेत. शिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय भौतिकी परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, मराठी विज्ञान परिषद यांच्याकडून आणि असे अनेक मानसन्मानांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या लेखनाचं विविध भारतीय आणि परदेशी भाषांत भाषांतर झालं आहे. विविध वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत विज्ञान आणि विज्ञानकथा लेखन या जड वाटणाऱ्या विषयांवर सर्वसाधारण वाचकाला कळेल असं नियमित लेखन सुरू असतं ते वेगळंच! मध्यंतरी मराठी विज्ञान परिषदेने नवोदित विज्ञानकथा लेखकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी एक शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरातून मार्गदर्शन घेऊन बाहेर पडलेल्या लेखकांनी शिबिरात शिकलेलं तिथेच राहू नये, या नव्या वाटेवरचा प्रवास सुरू ठेवावा या हेतूने विज्ञान-कट्टा असा एक ऑनलाईन ग्रुप तयार केला आहे. या कट्ट्यावर एखादा विषय घेऊन त्यावर कथा लिहायची किंवा कधी एखादी संदिग्ध कल्पना घेऊन, त्याचा अर्थ लावून प्रत्येकाने त्यातून विज्ञानकथा तयार करायची असे निरनिराळे प्रयोग केले जातात. तिथेही सुबोध या नवोदित लेखकांना मार्गदर्शन करतातच पण त्यात लेखकाला आणि विषयाला समजून घेऊन मार्ग दाखवण्याचाच दृष्टिकोन असतो. विज्ञानकथेकडे बघण्याचा सुबोधचा स्वत:चा असा वेगळा पण विचारपूर्वक बनलेला दृष्टिकोन आहे.

मराठीत कमी हाताळल्या गेलेल्या विज्ञानकथा ह्या साहित्यप्रकाराबद्दल आणि एकूणच आपल्या कथेवर सुबोधचं मत काय? हे जाणून घेण्यासाठी एका सिद्धहस्त विज्ञानकथा लेखकाशी केलेला हा मनमोकळा संवाद...

प्रिया - नमस्कार, सुबोध!

सुबोध - नमस्कार!

प्रिया - मायबोली दिवाळी अंकासाठी 'तंत्र- मैत्र ही तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना आम्ही मांडली तेव्हा मुलाखत घेण्यासाठी एक यशस्वी विज्ञानकथालेखक म्हणून सर्वप्रथम तुमचं नाव डोळ्यासमोर आलं. आमच्या विनंतीला मान देऊन, तुमच्या व्यापातून वेळ काढून विज्ञानकथा ह्या विषयावर गप्पा मारण्यासाठी तुम्ही तयारी दर्शवलीत त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक आभार.

सुबोध - त्यात काही विशेष नाही केलं.

प्रिया - सुबोध, विज्ञानकथेबद्द्ल बोलण्याआधी पहिल्यांदा तुमची पार्श्वभूमी, तुमचं शिक्षण वगैरे बाबत थोडं सांगा ना… कारण बर्‍याच वेळा लेखकाचा प्रवास या अश्या टप्प्यात नकळत सुरू होतो. तुम्ही पहिल्यापासून मुंबईतच आहात का?

सुबोध - नाही. माझा जन्म इस्लामपूरचा आहे, सांगली जिल्ह्यात. तिथे माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतरचं शिक्षण कोल्हापूर जिल्हयात गारगोटीला झालं. माझे आई-वडील शिक्षक होते, त्यामुळे त्यांची नोकरी त्यांना जिथे घेऊन जाईल तिथे आपसूकच माझं लहानपण आणि शिक्षण झालं. मी मॅट्रिक मात्र चिकूर्डे नावाच्या गावातून झालो. खरं तर गावही म्हणणं बरोबर नाही, खेडंच म्हणायला पाहिजे, कारण वीजही नव्हती तिथे तेव्हा.

प्रिया - बाप रे! म्हणजे एका पिढीतच तुमचं बालपण आणि आत्ताचा काळ यात फारच मोठा बदल तुम्ही अनुभवलात!

सुबोध - हो, अगदी खरं.

प्रिया - मग महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं तुमचं?

सुबोध - पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात मी आलो. अर्थात तेव्हा बारावी नव्हती. त्यावेळी अकरावी मॅट्रिक आणि नंतर इंटर करावं लागायचं. फर्ग्युसनमधून इंटर झाल्यावर मग मी मुंबई IIT मधून १९७१ साली केमिकल इंजिनियर झालो. तेव्हाचं IIT चं वातावरण खूपच छान होतं! अगदी धमाल केली. अजूनही ते दिवस आठवतात!

प्रिया - लहानपणी म्हणजे शाळेत असताना अगदी छोट्या खेडयांचाही अनुभव तुम्ही घेतलात, आई-वडील तेव्हा सतत असायचे काही मदत, सल्ला लागला तर. पण महाविद्यालयात गेल्यावर एकदम हॉस्टेलमध्ये रहायचं म्हणजे नाही म्हटलं तरी सगळी जबाबदारी आपली आपल्यालाच घ्यावी लागते. तेव्हा या नव्या जीवनाशी कसं जुळवून घेतलंत?

SJ-1.jpgसुबोध - सुदैवाने माझे आई-वडील दोघेही - विशेषतः वडील - खूप प्रगतीशील होते. त्यांनी लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे अशी सवय लावली होती. त्यामुळे मी जेव्हा फर्ग्युसनला आलो तेव्हाही मी एकटाच आलो होतो. आणि त्याकाळी तशी पद्धतही होती. सगळं आपलं अपण शोधायचं, आपली कामं आपणच करायची. आजकाल जसं मुलांची काळजी घेतली जाते - कधीकधी जरा अतीच, म्हणजे अगदी pamper केलं जातं, तसं मी लहान होतो तेव्हा वातावरणच नव्हतं.

प्रिया - तुम्ही एकटेच की भावंडं आहेत?

सुबोध - नाही, मी एकटाच.

प्रिया - अरे, मग तर आई-वडिलांनाही जड गेलंच असेल हे सगळं.

सुबोध - हो, पण पहिल्यापासूनच त्यांची धारणा होती की मुलाला स्वतंत्र करायचं, आपल्या पायावर त्याने आपलं आपण उभं राहिलं पाहिजे, त्यामुळे त्यासाठी जे आवश्यक होतं ते सगळं त्यांनी केलं.

प्रिया - IIT मधून शिक्षण संपवून बाहेर पडल्यावर मग पुढचा प्रवास कसा झाला?

सुबोध - IIT मधून बाहेर पडल्यावर मी दोनचार ठिकाणी नोकरी केली आणि मग शेवटी 'जेकब्स्' या अमेरिकन कंपनीमधून जनरल मॅनेजर म्हणून २००८ साली निवृत्त झालो. आता मात्र पूर्ण वेळ मला लेखन-वाचन यासाठी देता येतो.

प्रिया - म्हणजे तोपर्यंत तुमचं सगळं लेखन, त्यासाठी आधी करावी लागणारी पूर्वतयारी - या सगळ्या गोष्टी नोकरी आणि त्या अनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या सांभाळून चालू होतं.

सुबोध - तसं काही फार लिहिलेलं नाही मी. फक्त सोळा पुस्तकं तर प्रसिद्ध झाली आहेत. अर्थात ती बसल्या बैठकीत किंवा एकापाठी एक अशी नाही झाली. मला जमेल, आवडेल ते लिहीत गेलो आणि हळूहळू पुस्तकं प्रसिद्ध होत राहिली.

प्रिया - इतका मोठा काळ आणि इतकं प्रचंड आणि दर्जेदार लेखन केलंत तर त्याचा पाया वाचनातूनच घातला गेला असं म्हणता येईल का?

सुबोध - हो, नक्कीच.

प्रिया - मग ही वाचनाची आवड तुमची तुम्हाला लागली की आई-वडील शिक्षक असल्यामुळे किंवा तुम्ही मघाशी म्हणालात तसे ते सजग आणि प्रगतीशील असल्यामुळे त्यांनी ती विचारपूर्वक तुमच्यात निर्माण केली?

सुबोध - हे मला वाटतं दोन्ही असावं लागतं - म्हणजे आपण इंग्रजीत जसं Nature and Nurture म्हणतो तसं. मुळात स्वतःला गोडी असावी लागते आणि शिवाय घरी त्याला पूरक असं वातावरणही असावं लागतं. या दोन्हीतली एखादी जरी गोष्ट नसली तरी मग वाचनाची गोडी अशी नाही लागत. माझ्या सुदैवाने माझ्या बाबतीत दोन्ही गोष्टी होत्या - मला स्वतःलाही आवड होती आणि घरात वातावरणही होतं. आणि तेव्हा लहान मुलांसाठी पुस्तकं आणि मासिकंही भरपूर असत. माझ्या लहानपणी भा. रा. भागवतांनी सुरू केलेलं 'बालमित्र' नावाचं मासिक होतं, पुढे कुसुमाग्रजांनी सुरू केलेलं 'किशोर' नावाचं मासिक होतं. आणि घरी माझ्यासाठी तश्या मासिकांची वर्गणी भरली जायची, त्याचाही मला फायदा झाला. गारगोटीला चांगलं वाचनालयही होतं, तिथेही मी भरपूर पुस्तकं वाचली.

प्रिया - मोठे होताना वाचनाचे क्षितिज जसे विस्तारत जाते तसे सगळे प्रकार वाचून बघायचे असा दृष्टिकोन होता की काही ठराविक प्रकारचे लेखन वाचायला जास्त आवडतंय असं जाणवलं?

सुबोध - हो, तसं थोडंसं आहे. एकूण कथा या प्रकाराकडे माझा ओढा जास्त आहे. तसं वैचारिक, कादंबरी, कविता हे ही वाचतो. पण एकूण वाचताना या क्रमानेच प्राधान्य मिळतं. कथा मात्र एकूण नक्कीच जास्त वाचल्या जातात. त्यात विज्ञानकथा अर्थातच जास्त आवडतात. पण इतरही प्रकारच्या कथा तितक्याच वाचल्या जातात. मराठीतले सगळे कथालेखक - गाडगीळ, गोखले, माडगूळकर, मोकाशी, अलिकडे मेघना पेठे, मिलिंद बोकील, कृष्णा खोत, भरत काळे - सगळे वाचलेत मी. आणि अजूनही नवीन लेखकाचा कथासंग्रह मिळाला की आनंदाने आणि झपाटून वाचतो.

प्रिया - इंग्रजीमधलं वाचन साधारण कसं असतं?

सुबोध - विज्ञानाची आवड असल्यामुळे विज्ञानविषयक लेख वाचले जातातच. त्यात मेंदू आणि मेंदूविज्ञान - म्हणजे न्यूरॉलॉजी - यातल्या नवीन संशोधनाबद्दल मला अलिकडे जास्त आकर्षण वाटतं. त्याच्यावर मी दोन पुस्तकंही लिहिली आहेत. शिवाय Evolutionary Biology हा विषयही आवडतो मला. अर्थात, त्यातला शरीररचनाशास्त्र हा भाग मला कळत नाही, त्यामुळे तो मी बाजूला ठेवतो. त्यातल्या मेंदू आणि मानवी वर्तन या भागाबद्दल वाचतो. आणि इतरही वाचतो. नुकतंच डॅनियल काह्नेमन यांचं 'Thinking Fast and Slow' हे पुस्तक वाचलं - फार छान पुस्तक आहे ते, म्हणजे एखादी कादंबरी वाचावी इतक्या सहजपणे वाचलं जातं. आणि बाकी कथा, कादंबऱ्या, कविता हे मिळेल तसे आणि वेळ मिळेल तसे वाचतो.

प्रिया - आणि इंग्रजीमधल्या विज्ञानकथा?

सुबोध - इंग्रजीमधल्या विज्ञानकथा मी ८०-९० च्या दशकात अगदी भरपूर वाचल्या.
मराठीत विज्ञानकथा हा प्रकार मी लिहायला सुरुवात करण्याच्या चिकार आधी आला. 'केरळ कोकिळ' नावाचं एक मासिक होतं. त्याच्यात ज्यूल व्हर्नच्या कथांचा अनुवाद छापला जायचा.

प्रिया - भा. रा. भागवतांनीही ज्यूल व्हर्नच्या कादंबऱ्यांचा अनुवाद केला होता ना?

सुबोध - ते नंतर आलं. 'केरळ कोकिळ' मध्ये अनुवाद छापला गेला तो १९०० साली! त्यानंतरही द. पा. खांबेटे, दि. बा. मोकाशी, नारायण धारप यांसारख्या लेखकांनी काही प्रमाणात विज्ञानकथा लिहिल्या. पण या लेखकांची ओळख ही विज्ञानकथा लेखक म्हणून नव्हती. एक तर त्यांच्या कथा या बहुतेक वेळा अनुवादित किंवा आधारीत अश्या होत्या आणि त्यांनी विज्ञानकथांबरोबरच किंवा जास्त प्रमाणात इतर कथाप्रकार हाताळले. त्या तुलनेत भा. रा. भागवतांचं योगदान जास्त प्रभावी आणि लोकप्रिय झालं. त्यांनी ज्यूल व्हर्न आणि वेल्स् या दोघांच्याही कथा किंवा कादंबऱ्यांचं अतिशय उत्तम भाषांतर केलं. मला एक वैशिष्टय ठळकपणे जाणवतं ते म्हणजे त्यांनी नुसतं भाषांतर न करता त्याचं अत्यंत सुंदर मराठीकरण केलं, त्यामुळे वाचताना त्याचा प्रभाव निश्चितच जास्त पडतो. आणि मला विज्ञानकथांची गोडी लागण्याचं संपूर्ण श्रेय मी भा. रा. भागवतांना देईन, इतकं त्यांचं योगदान मला महत्त्वाचं वाटतं.

प्रिया - तुम्ही मगाशी म्हणालात की इंग्रजीमधल्या विज्ञानकथांचं तुमचं वाचन १९८०-९० च्या दशकात खूप झालं. इंग्रजीतले तुमचे आवडीचे विज्ञानकथा लेखक कोणते?

सुबोध - क्लार्क आणि अॅसिमॉव्ह तर आहेतच, त्याबरोबरच मला रॉबर्ट शेकलेचं लिखाण खूप आवडतं. त्याची जी शैली आहे, विनोदी अंगानी कथा फुलवण्याची, ती फारच सुरेख आहे. त्याच्या काही काही कथा अगदी आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आहेत. तसंच डॅनियल कीजनी एकच कथा लिहिली पण ती इतकी अप्रतिम आहे की एकदा वाचली की ती कोणी विसरुच शकणार नाही. लॅरी निवेन, डॅमन नाईट वाचले, ब्रायन अॅल्डिसच्या कथा वाचल्या. गंमत म्हणजे त्याच्या काही कथा अगदी जी. ए. कुलकर्णींच्या कथेची आठवण करुन देतील अश्या आहेत. रॉबर्ट सिल्व्हरबर्ग आहे, फ्रँक हरबर्ट आहे, पॉल अँडरसन आहे. हाईनलेन तर अॅसिमॉव्हच्या बरोबरीचाच मानला जातो.

प्रिया - कार्ल सगाननी विज्ञानकथालेखन जरी मोजकंच केलं असलं तरी विज्ञानप्रसारासाठी त्यांनी केलेलं काम प्रचंड आहे आणि अतिशय मोलाचं आहे. त्याप्रकारचं लेखन, किंवा सर्वसामान्य लोकांना, वाचकांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी विज्ञानकथा लेखन हा एकच पर्याय मराठीत जास्त प्रमाणात वापरला जातो का? निरंजन घाट्यांनी विज्ञानकथांबरोबरच विज्ञानाची माहिती देणारी पुस्तकंही बरीच लिहिली, तुम्ही स्वतःही लिहिली आहेत. पण एकूण त्याचं प्रमाण कमीच आहे का?

सुबोध - एकतर एकूणच मराठीत तुम्ही इंग्रजीशी तुलना केलीत तर पुस्तकंच कमी आहेत. पण हळूहळू हा ट्रेंड बदलायला लागला आहे असं जाणवतंय - म्हणजे माहितीपर, किंवा विज्ञानाशी संबंधित लिखाण वाचायला लोकांना आवडतंय असं चित्र दिसायला लागलंय. अश्या पुस्तकांची मागणी वाढती आहे, एवढंच नाही तर या प्रकारच्या पुस्तकांच्या आवृत्त्याही निघतात.

प्रिया - म्हणजे आशेला जागा आहे…

सुबोध - हो, अगदी निश्चितच!

प्रिया - तुम्ही लेखनाला जेव्हा सुरुवात केलीत तेव्हा ती विज्ञानकथांपासून किंवा विज्ञानाशी संबंधित लिखाणापासूनच केलीत की इतरही लेखनप्रकार हाताळून पाहिलेत - विशेषतः महाविद्यालयीन काळात?

सुबोध - नाही, मी महाविद्यालयात असताना ललितलेखन काही केलंच नाही. बऱ्याच वेळा असं दिसतं की त्या काळात बरेच जण मराठी वाङमय मंडळात किंवा महाविद्यालयाचं नियतकालिक असतं त्यात लुडबुड - किंवा चाचपणी म्हणू हवं तर - करून बघतात. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. फर्ग्युसनमध्ये असतानाही नाही आणि पुढे IIT मध्ये तर मुळात मराठीचं वातावरणच फारसं नव्हतं. मराठी वाङमय मंडळ तसं नावालाच होतं, त्याचे काही उपक्रम वगैरे नसत, त्यामुळे तिथेही नाही. त्यानंतर पुढची चार-पाच वर्षं मी महाराष्ट्राबाहेर होतो, तेव्हाही काही लिहिलं नाही. मुळात तशी माझी लिहायला सुरुवात तशी बरीच उशीरा झाली - मी पहिली कथा लिहिली ती १९८२ साली आणि ती विज्ञानकथाच लिहिली. एकूणच ओढा विज्ञान आणि विज्ञानकथा यांकडे जरा जास्तच होता, त्यामुळे सगळं लेखन त्याच धर्तीचं झालं. १९८२ साली मी ती विज्ञानकथा लिहिली आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दर वर्षी जी विज्ञान रंजन कथा स्पर्धा घेतली जाते त्यासाठी पाठवली. त्याला त्या वर्षी दुसरं बक्षिस मिळालं आणि मग मात्र माझं नेमाने लिखाण सुरु झालं. एकतर तो प्रकार आवडीचा आहे, चॅलेंजिंग तर आहेच, पण तरी आपल्या आवाक्यातला आहे असं वाटलं.

प्रिया - तुम्ही म्हणता की हा प्रकार आवाक्यातला वाटला - तर तुमचं विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातलं शिक्षण आणि पुढे नोकरीच्या निमित्ताने तुम्ही विज्ञान-तंत्रज्ञानाशी सतत संपर्कात होतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढायला मदत झाली असं वाटतं का तुम्हाला?

सुबोध - थोडं-फार तसं म्हणता येईल, पण मला वाटतं तेवढंच पुरेसं नसतं. मुळात तुमची ती वृत्ती, आवड असायला लागते. शिक्षणाची-नोकरीची बॅकग्राऊंड होती, पण त्याचबरोबर मी आवडीने, शोधून-शोधून यासंबंधी सतत वाचत होतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

प्रिया - तुम्ही आत्ताच म्हणालात की मविपच्या कथास्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही लिहिते झालात. आज मराठीतले नावाजलेले किंवा भरपूर आणि दर्जेदार लेखन करणारे विज्ञानकथा लेखक जे आहेत त्या जवळपास सगळ्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्तानेच झाली ना?

सुबोध - हो, अगदी डॉ. नारळीकरांपासून ते निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे वगैरे सगळ्या लेखकांची सुरुवात जवळपास तशीच झाली असं म्हणायला हरकत नाही.

प्रिया - डॉ. नारळीकरांसारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ इंग्लंडमधले संशोधन बंद करुन काही एक विचार करुन भारतात परत येतो आणि त्यानंतर थोड्या काळात कथेच्या रुपाने विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवतो, त्या त्यांच्या विज्ञानकथेच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? कारण सर्वसाधारण माणसाचा शालेय शिक्षणानंतर विज्ञानाशी तसा फारसा संबंध नसतो. मग विज्ञानाची गोडी लोकांना लागावी, त्यातल्या नव्या वाटांची त्यांना माहिती व्हावी यासाठी विज्ञानाची कडू गोळी कथेच्या गोड आवरणात सादर करणं हे त्या काळाचा विचार करता आणि आज विज्ञानकथा ज्या टप्प्यावर आहे त्या संदर्भात, अश्या दोन्ही भूमिकांतून विचार केला तर तुम्हाला स्वतःला त्याबद्दल काय वाटतं?

सुबोध - मला वाटतं त्यांच्या भूमिकेचा फायदा नक्कीच झाला. थोडा तोटाही झाला - कसा ते सांगतोच पुढे. नारळीकरांचं वेगळेपण काय होतं, त्यांच्या आधी खांबेटे, मोकाशी वगैरे लिहीत असत त्यापेक्षा? तर त्यांच्या कथा या स्वतंत्र होत्या. त्यांची कुठलीच कथा ही आधारित नाहीये. त्यामुळे त्याला आपोआप एक वेगळा दर्जा मिळाला. शिवाय नारळीकरांसारखा शास्त्रज्ञ हे लिहितोय याचा अर्थ या बालकथा किंवा अगदीच पोरकट प्रकार नाही हे वेगळं सांगायची गरजच पडली नाही. त्या लेखनाला आपसूकच प्रतिष्ठा मिळाली. नारळीकरांच्या कथांचा आणखी एक मला जाणवलेला विशेष भाग म्हणजे त्यांच्या कथा या भारतीय मानसिकतेवरच्या कथा आहेत. 'पुत्रवती भव।' किंवा 'धुमकेतू' सारखी कथा घ्या, भारतीय समाजमन कसा विचार करतं हे विज्ञानकथेत प्रथमच आलं. आणखी एक विशेष म्हणजे ते स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे शास्त्रज्ञ कसा विचार करतो, हे ही त्यांच्या कथेतून दिसतं. या सगळ्या गोष्टींमुळे नारळीकरांच्या कथा या वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या दर्जाच्या विज्ञानकथा आहेत असं मला वाटतं. या गोष्टी त्यांच्याआधीच्या लेखकांच्या लिखाणात जवळजवळ नव्हत्याच. त्या सरळसरळ दुसऱ्यांच्या कथांचा अनुवाद किंवा रुपांतर असत नाही तर ती मूळ कल्पना घेऊन नुसती नावं बदलून भारतीय केलेली असायची.

नारळीकरांच्या या सगळ्या वैशिष्टयांचा फायदा त्यांनाही झाला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मराठी विज्ञानकथेला झाला. समीक्षकांचं लक्ष या प्रकाराकडे पहिल्यांदाच गेलं ते त्यांच्यामुळे. पूर्वी विज्ञानकथा ही त्यांच्या क्षितिजावरही नसायची, गूढकथा, रहस्यकथा असतात, त्यातलाच एक प्रकार विज्ञानकथा अशी साधारण मनोभावना असायची. वाचकांचं म्हणाल तर वाचकांना या कथाप्रकाराबद्दल कुतूहल निर्माण झालं. त्यातून कोणी विज्ञान शिकलं असेल असं मला वाटत नाही. पण कुतुहल निर्माण करण्याचं काम त्यांच्या कथांनी निश्चित केलं आणि ते खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. विज्ञान आणि विज्ञानकथा हा काय प्रकार आहे हे सर्वसामान्य वाचकाला बघावंसं वाटणं हे फार महत्त्वाचं साध्य त्यांच्या कथांनी साधलं.

तसाच तोटा थोडाफार झाला असंही मला वाटतं. एक म्हणजे, वाचकांची थोडी चुकीची समजूत झाली की विज्ञानकथा या विज्ञानाबद्दलच्या कथा आहेत. लेखकांचीही तशीच मनोधारणा झाली की विज्ञानकथा म्हणजे एक सिद्धांत घ्यायचा आणि तो कथारुपाने सादर करायचा. आणि मुख्य म्हणजे समीक्षकांनीही चुकीचे निकष लावायला सुरुवात केली. कारण विज्ञान शिकवण्यासाठी जर विज्ञानकथा आहे, तर मग अमुक एका कथेतून ते किती चांगल्या तर्‍हेनी शिकवलं जातंय? त्यामुळे चांगली विज्ञानकथा कोणती, तर जी जास्त चांगल्या रितीने विज्ञान शिकवते ती चांगली विज्ञानकथा. पण हळूहळू लेखक या चौकटीतून बाहेर पडले आणि मग वाचकही आपोआप त्या समजुतीतून बाहेर पडले.

प्रिया - आता विज्ञानकथांच्या बाबतीत हळूहळू जो आग्रह धरला जातो की ती मुळात एक सशक्त कथा असली पाहिजे आणि डॉ. फोंडके जसं सांगतात तसं त्या कथेतलं विज्ञानाचं स्थान काय? तर त्यातलं विज्ञान काढून टाकलं तर ती कथा कोसळली पाहिजे, थोडक्यात तिचा आत्मा, त्यातलं नाट्य हे विज्ञानाधिष्ठीत असलं पाहिजे. तर मग नारळीकरांच्या सुरुवातीच्या कथा या नव्या निकषांवर उतरतात का?

सुबोध - त्यांच्या सगळ्याच कथा या निकषांवर उतरतात असं नाही म्हणता येणार - म्हणजे अश्या काही कथा आहेत ज्यांत भाव-भावनांचं नाट्य कमी असतं किंवा नैतिक पेच त्यात सापडत नाही. विशेषतः अगदी सुरुवातीच्या काळातील कथांच्या बाबतीत असं मला निश्चित वाटतं.

माझी स्वतःची विज्ञानकथेची व्याख्या अशी की विज्ञान आणि तंत्रज्ञान यातून जे विविध पेच माणसापुढे उभे राहतात - राहतील, त्यांना ती माणसं कशी सामोरी जातील त्याचा शोध घेणारी कथा म्हणजे विज्ञानकथा.

प्रिया - म्हणजे तुम्हाला त्यातून उत्तरं अपेक्षित आहेतच असं नाही.

सुबोध - नाही, अजिबातच नाही. तसं पाहिलं तर कुठलाच कथाकार अश्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही. पण प्रश्न उभे करायचे आणि मानवी नाट्य त्यातून रंगवायचं - एवढंच वाचकांपुढे ठेवायचं. अमुक एका प्रश्नाचं हे उत्तर असं कुठलाच कथाकार करु पाहणार नाही आणि श्रेष्ठ कथेचा तो निकषही नाही. अनिर्णायकता हाच श्रेष्ठ कथेचा निकष मानला जातो.

प्रिया - आणि नैतिकतेमधले बरेच पेच असे असतात की त्याला एकच असं उत्तर नसतंच. त्या परिस्थितीत, त्या व्यक्तीने आपापलं उत्तर शोधावं लागतं.

सुबोध - अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी म्हटलं की या बदलत्या परिस्थितीला माणसं कशी सामोरी जातात, त्याचा शोध घेणारी कथा, ती विज्ञानकथा. म्हणजे त्यात दोन्ही आलं की जे प्रश्न आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीने निर्माण झालेले प्रश्न आहेत - त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली नाही किंवा नसती तर ते प्रश्नच उभे राहणार नाहीत, त्यामुळे त्यांचा सांगाडा हा विज्ञानाचाच आहे; पण ती कथा ही त्या माणसांची कथा आहे. त्या प्रश्नांना सामोरं जाण्याचा त्यांचा प्रवास त्या कथेतून पुढे येतो.

प्रिया - म्हणजे मग तुम्ही म्हणता की विज्ञानकथा म्हटल्यावर जो पारंपारिक अर्थ वाचकाच्या डोक्यात येतो त्याऐवजी विज्ञानकथा आणि ललित कथा यातला फरक हा फक्त जे नाट्य, जो प्रश्न कथेतून समोर येतो त्याच्या मुळात आहे. पुढे तो विषय कुठल्याही रुपाने फुलवला जाऊ शकतो.

सुबोध - बरोबर. माझा लेबलला विरोध नाही बरं का! किंबहुना विज्ञानकथा हे लेबल असावंच कारण ती इतर कथांपेक्षा वेगळी असतेच. तिचं स्वतःचं असं वैशिष्टय आहे, काही बलस्थानं आहेत, तश्या काही मर्यादाही आहेत. त्यामुळे या लेबलला माझा विरोध नाही - माझा विरोध आहे तो विज्ञानकथेवर 'विज्ञान शिकवायची' जबाबदारी टाकण्याला. कारण तसं केलं की मग तिचं कथा असणं हे दुय्यम ठरतं आणि विज्ञान हे कथेच्या पुढे येतं, तसं मला नकोय. जरी तिचा प्रकार विज्ञानकथा हा असला तरी ती विज्ञानाची कथा नको, ती माणसाचीच कथा असू दे.

प्रिया - पण एखादा लेखक एखादं विज्ञानातलं किंवा तंत्रज्ञानातलं एखादं तत्व डोळ्यासमोर ठेवून त्यावर कथा बांधतो, तेव्हा त्या तत्त्वाची, विषयाची चौकट आपोआपच त्या कथेभोवती निर्माण होत नाही का?

सुबोध - हो, तसं ते होतं आणि होणारच. पण मी स्वतः तसं काही डोक्यात घेऊन कथा लिहायला बसत नाही - म्हणजे अमुक एक समस्या आहे, ती कथारुपाने मांडू असं माझं स्वतःचं लेखन होत नाही. मला त्या समस्येबरोबरच त्याला सामोरी जाणारी माणसं, त्यांच्यापुढे पडणारे वेगळेच पेच हे सगळं एकत्रितपणे दिसतं, जाणवतं. त्यामुळे आपोआप त्याला एक एकसंधपणा येतो. त्यामुळे मला त्याची चौकट विज्ञानाची आहे असं वेगळं नाही काढता येणार.

प्रिया - म्हणजे गेल्या वर्षी जो तुमचा कथासंग्रह प्रकाशित झाला - 'पुढल्या हाका' - त्यात जशी वेगवेळ्या परिस्थितीतून जाणारी माणसं, त्यांच्या भावभावना, कधी अध्यात्म, कधी नैतिकता - हे सगळे विषय तुम्ही जेव्हा विज्ञानकथेच्या स्वरुपात मांडता, तेव्हा तुमच्या डोक्यात ती कथा रूप घेत असताना असं एकसंध रुप घेतच आकाराला येत असते.

सुबोध - हो, नैतिक पेच हा माझ्या कथेचा गाभा असतो असं म्हणायला हरकत नाही. माझा 'कुरुक्षेत्र' हा जो कथासंग्रह आहे, त्यातल्या कथा या फार तर विज्ञानाधिष्ठित कथा म्हणता येतील. पण तरी त्याही कथांमागची प्रेरणा ही तो पेच मांडणं हीच आहे. किंबहुना कुठेतरी तो नैतिक पेच दिसल्याशिवाय मी कथा लिहायलाच घेत नाही. थोडक्यात मला तश्याच प्रकारच्या कथा लिहीणं जमतं आणि आवडतंही. दुसऱ्या प्रकारे मला लिहिताच येणार नाही बहुधा. म्हटलं तर ती माझी मर्यादा आहे आणि म्हटलं तर बलस्थान. मुख्य म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी कथा लिहिली, तेव्हा मी तो पेच वाचकांपुढे मांडायचं, त्यांच्यासमोर एक प्रकारे आरसा धरायचं काम फक्त करतो. त्यातून कुणाला काही उत्तर मिळावं असा माझा हेतू नसतो आणि तसं रेडीमेड उत्तर मिळावं अशी अपेक्षाही मला चुकीची वाटते.

प्रिया - या अश्या प्रकारच्या ज्या विज्ञानकथा आहेत, किंवा आज वाचकाची विज्ञानकथेकडून जी अपेक्षा असते वा नवा लेखक जेव्हा प्रयत्न करु पाहतो की या नव्या दिशेनी जाणारी विज्ञानकथा मला जमावी, ती कथा एकदा लिहीली की तिच्या समीक्षणाचं काय? तसे समीक्षक आज मराठीत आहेत का? की जे विज्ञानकथेचं, त्यातलं विज्ञान आणि कथा या दोन्ही अंगांचं भान ठेवून समीक्षा करु शकतील?

सुबोध - प्रश्न अगदी टोकदार आहे, पण तुमच्या प्रश्नातच मला वाटतं तुम्ही उत्तरही दिलेलं आहे. जरा विस्तारानी बोलायचं, तर एक क्षणभर आपण त्यातला विज्ञानाचा भाग बाजूला ठेवूया. पण त्यातल्या कथाभागाचंही समीक्षण गंभीरपणे झालंय आजवर असं मला वाटत नाही. म्हणजे अगदी नारळीकरांच्या कथा जरी घेतल्या तरी त्यांची 'कथा' म्हणून समीक्षा नाही झालेली. आणि विज्ञान आणि त्यातला साहित्याचा भाग या दोन्हीचं समीक्षण करु शकणं ही तर फार पुढची पायरी झाली. आज ना उद्या परिस्थिती बदलेल अशी आपण फक्त आशा करु शकतो.

प्रिया - आजचा किंवा साहित्याचा समीक्षक त्यातल्या कथाभागाची समीक्षा एक वेळ करु शकेल, पण त्यातल्या विज्ञानाचं समीक्षण कोण करणार? म्हणजे त्यातलं विज्ञान हे अचूक किंवा संभाव्य आहे का हे ही तपासून बघायला हवंच ना?

सुबोध - प्रश्न अगदी बरोबर आहे, पण मला वाटतं आपण एक एक पायरी चढूया. आधी तिची कथा म्हणून तरी गांभिर्याने समीक्षा व्हायला लागू दे! कारण जर ती कथाच नसेल तर ती विज्ञानकथा असूच शकत नाही. त्यातल्या विज्ञानाच्या अचूकतेची जबाबदारी सध्यातरी लेखकावरच आहे. विज्ञान-कट्ट्याचा जो प्रयोग सुरू आहे, तिथे आपण एकमेकांच्या कथा वाचतो, सगळेचजण त्यावर आपलं मत मोकळेपणानी मांडतात, कदाचित या अश्या प्रयोगांतूनच उद्या काही घडेल. आणि मला वाटतं अचूकतेची अपेक्षा फक्त विज्ञानकथेकडूनच असते किंवा असावी असं नाही, कुठल्याही प्रकारचं लेखन असेल तरी त्यात अचूकता ही असलीच पाहिजे, ती लेखकाची जबाबदारी माझ्या मते असतेच. आणि ती तशी नसली तर जाणकार, चोखंदळ वाचकांच्या ते लक्षात येतंच. त्यामुळे अचूकता, वास्तवाचं भान हे असलंच पाहिजे, तरंच ती वाचकाला भावते. नाहीतर त्याची फँटसी होईल मग!

प्रिया - आपण समीक्षणाबद्दल बोलताना मघाशी तुम्ही निदर्शनाला आणून दिलंत तसं डॉ. नारळीकरांच्या कथांचंही कथा म्हणून गंभीरपणे समीक्षण झालंच नाही. तर असं होत असेल का की डॉ. नारळीकर, डॉ. फोंडके किंवा तुमच्यासारखे अगदी राज्यसरकारची पारितोषकं मिळालेले लेखक - यांची समीक्षा करताना नकळत दडपण येत असेल का?

सुबोध - तसं होता कामा नाही खरं तर! कारण ते मुळातच विज्ञानाच्या विरोधात जातं. विज्ञानाला हे असं दडपण मुळी मान्यच नाही. आईनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञाचे जे सिद्धांत सगळ्या कसोट्यांना उतरले नाही ते बाजूला ठेवून दिले आणि विज्ञान पुढे गेलं. त्यामुळे तसं काही बंधन यायचं काही कारण नाही. आणि इतर साहित्याच्या बाबतीत जेव्हा समीक्षा होते तेव्हा लेखक कोण आहे किंवा किती मोठा आहे याचा विचार न करता परखडपणे समीक्षा होतेच. तेव्हा विज्ञानकथेला याबाबतीत वेगळी वागणूक देण्याचं काही कारण नाही आणि तशी अपेक्षाही नाही.

प्रिया - मग जोवर अशी समीक्षा गांभिर्याने होत नाही, तोवर तुमच्यासारखे नावाजलेले, या लेखनप्रकाराचं योग्य भान असलेले जे लेखक आहेत ते नवोदित लेखकांच्या कथांचं समीक्षण करु शकतील का? ती कदाचित रुढार्थाने समीक्षा असणार नाही, पण विज्ञानकथा वाचकाच्या आणि लेखकाच्या भूमिकेतून जी समीक्षा व्हायला हवी तशी तरी ती होऊ शकेल.

सुबोध - हो, तसं होऊ शकतं, म्हणजे असा प्रयोग करुन बघण्यासारखा आहे. म्हणजे वाचकाला निदान एक दिशा तरी मिळू शकेल की विज्ञानकथा कशी वाचावी, कसा त्याचा आनंद घ्यावा, हे करता येईल.

प्रिया - लेखकांच्या बाबतीत काय करता येईल? विज्ञान-कट्ट्यावर आमचा हात धरुन, वेळप्रसंगी कान पकडून आम्हाला मार्गदर्शन करायला तुम्ही सगळे आहात, पण कट्ट्यावर नसलेलेही लेखक आहेत, त्यांना हे मार्गदर्शन कसं करता येईल? त्यांच्या कथा वाचून तुमचं मत कुठेतरी नोंदवून त्याचा उपयोग होऊ शकेल.

SJ-3.jpgसुबोध - हो, असे प्रयोग होतात ना! नुकताच एक प्रयोग असा 'कथाश्री' मासिकाने केला होता. त्यांनी एक कथास्पर्धा आयोजित केली, त्याला जवळपास साडेचारशे कथांचा प्रतिसाद मिळाला. त्यातल्या अठरा कथा त्यांनी निवडल्या, ज्या लेखकांत त्यांना चमक दिसली, ज्यांचं लेखन त्यांना आशादायी वाटलं असेल, त्या लेखकांना त्यांनी बोलवलं आणि महाराष्ट्रातल्या काही कथाकारांनाही बोलवलं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. त्यांत रंगनाथ पाठारे, राजन खान, मोनिका गजेंद्रगडकर होते, मी होतो, भारत सासणे होते - म्हणजे आजचे नावाजलेले कथाकार शक्यतो निवडले होते. तर तिथे प्रत्येकाने आपल्या तीन-तीन कथा वाचल्या आणि वन-ऑन-वन चर्चा झाल्या त्यावर. असे प्रयोग ठिकठिकाणी होतच असतात आणि व्हायलाच हवेत. आणि त्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. असं म्हणतात की लेखक घडवता येत नाही, ते तसं खरंच आहे. मी तर असंही म्हणेन की लेखकच काय, कलाकारही असे घडवता येत नाहीत. पण तरी मार्गदर्शनाचा काही फायदा निश्चित होतो. म्हणजे चांगल्या कथेत काय टाळावं हे निश्चित सांगता येतं. त्यातली पात्रांची जी भाषा आहे, ती पात्रं बोलताहेत की पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे - या अश्या चुका सुरुवातीच्या काळात लेखकाच्या हातून घडून जातात. या अश्या गोष्टीत सुधारणा होऊ शकते - निदान एका मर्यादेपर्यंत तरी. अर्थात त्यासाठी मुळात काहीतरी असावं लागतं, मुळातच अंगी प्रतिभा नसली तर कितीही घासलं-पुसलं तरी काही होणार नाही.

प्रिया - तुम्ही जेव्हा लिहायला सुरुवात केलीत तेव्हापासून किंवा थोडंफार त्याआधीपासूनचा विज्ञानकथेचा प्रवास बघितला तर लेखक आणि वाचक आज कितपत जागरुक आहेत किंवा कितपत तयार आहेत विज्ञानकथा या प्रकाराला सामोरे जायला?

सुबोध - मला वाटतं की बदल निश्चित होतोय. पूर्वी मी जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा विज्ञानकथा फक्त काही मासिकांतच येत असत. नवल, धनंजय असे मोजके अंक होते जे विज्ञानकथेला स्थान देत असत. पण आता जे मान्यवर अंक आहेत, ते सुद्धा "आम्हांला विज्ञानकथा द्या" असं आग्रहाने सांगतात.

प्रिया - म्हणजे, 'तुमची कथा द्या' याऐवजी तुमच्याकडून आम्हांला विज्ञानकथा हवी' अशी अगदी ठळक मागणी असते.

सुबोध - हो, आता असते. मी दोन्ही प्रकारच्या कथा लिहितो, पण तरी 'आम्हाला तुमच्याकडून विज्ञानकथा हवी आहे', अशी मागणी असते. याचा अर्थ वाचकांकडून त्यांना तसा प्रतिसाद, तशी अपेक्षा पोहोचत असणार. 'साप्ताहिक सकाळ'ची स्पर्धा असते, त्यातल्या बक्षिसपात्र समजा चार कथा निवडल्या असल्या तर त्यातली एखादी विज्ञानकथा किंवा विज्ञानाधिष्ठित कथा असते. म्हणजे बहुधा वाचकांनाही त्याच-त्याच विषयांवरच्या नव्या लेखकांच्या कथा वाचण्यापेक्षा वेगळया विषयावरच्या कथा वाचायला आवडत असावं.

प्रिया - म्हणजे तुम्ही जे तुमचं मत सांगितलंत की विज्ञानकथा असली तरी ती 'कथा' आहे हे लेखकाने कधीच विसरता कामा नये, त्याचा उपयोग जसा कथा सकस होण्याच्या दृष्टीने लेखकाला होतो, तसाच तो वाचकालाही होतो.

सुबोध - अगदी बरोबर आहे. कारण सर्वसाधारण वाचक कथा जेव्हा वाचायला घेतो, तेव्हा तो काही 'चला, त्यानिमित्ताने विज्ञान समजून घेऊ' या दृष्टीकोनातून कथा वाचत नाही. वाचकाच्या दृष्टीने पहिली अट म्हणजे ती कथा रंजक असली पाहिजे, शेवटपर्यंत तिने खिळवून ठेवले पाहिजे. पुढे काय होतंय याची उत्सुकता सतत राहिली तर तो वाचक ती कथा वाचेल.

प्रिया - आता परत थोडं विज्ञानकथा लेखनाकडे वळते. इंग्रजीमध्ये 'हार्ड सायन्स फिक्शन' म्हणून जो प्रकार आहे, तो मराठीत जवळपास नाहीच सापडत.

सुबोध - हो, खरंय. हार्ड सायन्स फिक्शन हा खूप अवघड प्रकार आहे. लिहायलाही खूप अवघड आहे, आणि बुद्धीगम्य आहे तो. त्यामुळे तशी कथा वाचताना कोडी सोडवताना जसा आनंद मिळतो ना, तसा आनंद मिळतो. त्यामुळे त्याचे चाहते तसे कमीच असतात. अगदी इंग्रजीतही पाहिलं तर एकूण वाचकांपैकी विज्ञानकथांचा चाहता किती असेल? माझा एक अंदाज फारतर ५ ते १० टक्के. आणि त्यातही हार्ड सायन्स फिक्शनचे रसिक संख्येने आणखीच कमी असतील. आणि ती कथा सगळ्यांनाच आवडावी अशी अपेक्षाही नाही धरता येणार.

प्रिया - मागे मी अॅसिमॉव्हच्या एका मुलाखतीत वाचलं होतं की 'हार्ड सायन्स फिक्शन मध्ये त्यातल्या कथेने थोडं दुय्यम स्थान घेतलं तरी चालेल, त्यातलं विज्ञान हे जास्त प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे.' आत्तापर्यंत विज्ञानकथा कशी असावी याबद्दल जे आपण बोललो त्याच्याशी हे मत फारकत घेतं असं वाटतं का?

सुबोध - मला वाटतं, तसं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की हार्ड सायन्स फिक्शन आणि सॉफ्ट सायन्स फिक्शन असे दोन गट नाही करता येत. किंबहुना मी तर असं म्हणेन की फँटसी ते हार्ड सायन्स फिक्शन असा मोठा पट्टा आहे. म्हणजे फँटसीमध्ये काहीही होऊ शकतं आणि दुसऱ्या टोकाला तुम्ही जास्तीत जास्त तर्कशुद्ध असं लिहायचा प्रयत्न करत असता. या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी सॉफ्ट सायन्स फिक्शन येते. त्यात तर्कशुद्ध, निख्खळ विज्ञानापासून तुम्ही किती दूर जाता यावर तुमची कथा या दोन टोकांमध्ये कुठे बसते ते ठरतं आणि तुम्ही ते स्वातंत्र्य फारच घेतलंत तर ती फँटसीकडे झुकायला लागते आणि मग ती विज्ञानकथा उरत नाही. आता आणखी पुढे जाऊन तुम्ही फँटसीची व्याख्या काय करता यावर बरंच अवलंबून आहे. आज जे घडत नाही ती फँटसी असं जर तुम्ही म्हणालात तर विज्ञानकथा - अगदी सॉफ्ट सायन्स फिक्शनही त्यात मोडतील. पण सायन्स फिक्शन आणि फँटसीमध्ये फरक असा की आज जरी ते घडलं नसलं तरी उद्या घडू शकेल, निदान ते अशक्य नाही असं असलं की आपण त्याला सायन्स फिक्शन म्हणतो.

प्रिया - म्हणजे त्या त्या काळात मान्यताप्राप्त विज्ञान आहे त्यात कथेतलं विज्ञान बसायला पाहिजे का?

सुबोध - अगदी तसंच हवं असं नाही, थोडं पुढे जाऊन आजच्या विज्ञानावरुन पुढचा वेध घेतला असला तरी चालेल. पण त्याच्याशी विरोधात असलेलं असं काही असता कामा नये.

प्रिया - म्हणजे कथेत न्यूटनचे तिन्ही नियम मोडीत काढले…

सुबोध - तर ते नाही चालणार, मग ती फँटसी होईल.

प्रिया - तुम्ही हे म्हणालात की विज्ञानाचे नियम पाळून थोडा पुढचा वेध कथेने घेतला तरी योग्य आहे. त्यावरुन असं मनात आलं, की तुम्ही स्वतः ज्या प्रकारच्या विज्ञानकथा लिहिता, तिथे कधी कधी असा भविष्याचा वेध घेतला तर तुम्ही मांडू इच्छित असलेला पेच जास्त ठळकपणे पुढे यायला मदत होते का?

सुबोध - हो, निश्चितच. कारण आज जो प्रश्न लहानसा वाटू शकतो, तो पुढे जाऊन विज्ञानाची प्रगती अशीच राहिली तर मोठा नैतिक पेच आपल्यापुढे उभा करु शकतो. हे विज्ञानकथेचं एक बलस्थानच आहे की आपण असा पुढचा वेध घेऊ शकतो, तेही शक्यतेच्या मर्यादेत राहून. आणि त्याचा उपयोग करुन माणूस त्या परिस्थितीत कसा वागू शकेल हे मांडता आलं तर वाचकाला क्षणभर का होईना थांबून विचार करणं भाग पडतं की आपला समाज किंवा आपल्यासारखी कोणी व्यक्ती - कदाचित आपणच - कुठपर्यंत जाऊ शकतो.

प्रिया - लेखकाने कथा लिहिल्यावर त्याचे संस्करण होत असताना जे बदल सुचवले जातात ते नव्या लेखकाने कश्या पद्धतीने हाताळावेत? कारण पुनर्लेखन करताना पहिल्या लेखनातली उत्स्फूर्तता, त्यातला उमाळा नवख्या लेखकाच्या हातून कमी होण्याची भिती असते.

सुबोध - खरंय, आणि ते तर अगदी आवर्जून टाळायला हवं. शेवटी जितके जास्त लोक वाचतात, तितकी विविध प्रकारची मतं आपल्याला मिळू शकतात. तेव्हा मला वाटतं, भाषा, काळ, राहणीमान असे म्हटले तर छोटे, पण म्हटले तर महत्त्वाचे मुद्दे असतात ते तर सुधारायलाच हवेत. पण एखाद्या सूचनेने जर तुम्हाला कथेत काय म्हणायचंय यालाच धक्का पोहोचत असेल तर मात्र तुम्ही विचारपूर्वक ठरवायला हवं कोणते बदल स्वीकारायचे ते. कारण तुमच्या कथेचा आत्मा, त्यातली उत्स्फूर्तता हरवून कसं चालेल? हाच लेख आणि कथेत मोठा फरक आहे. लेख तुम्ही हात फिरवून, घासूनपुसून तर्कशुद्ध करु शकता, पण कथेचं तसं नाही - बदल करताना त्यातली वाचनीयता गमावून चालणार नाही.

प्रिया - एक वाचक म्हणून विज्ञानकथांमध्ये दीर्घकथा, लघुकथा किंवा आता जो नवा प्रकार येऊ पाहतोय - फ्लॅशकथा, जी एखाददोन पानाचीच असते, असे प्रकार हाताळलेले कसे वाटतील वाचायला?

सुबोध - मुळात मी म्हणालो तशी विज्ञानकथा ही आधी कथा असल्याने हे सगळे प्रयोग व्हायला पाहिजेत. आज जास्त करून रुढार्थाने आपण ज्याला कथा म्हणतो तशी तरी आहे नाही तर कादंबरी तरी. हल्ली तुम्ही म्हणता तसे छोटे चुटकेही लिहिले जातात आणि एक वाचक म्हणून छान वाटतं तेही वाचायला. म्हणजे ती पूर्ण कथा अशी नसते, पण थोडक्यात पण मनोरंजकपणे एखादं तत्व त्यातून आपल्यापुढे येतं. बाकी मराठीत विज्ञानकथेच्या बाबतीत तरी दीर्घकथा मी काही अजून वाचलेली नाही. साधारणपणे कथेचं एक आशयसूत्र असतं, दीर्घकथेत दोनतीन असतात आणि कादंबरीमध्ये त्याहून जास्त. पण अजून तरी कथा आणि कादंबरी हे दोनच प्रकार रुढ झालेत, होताहेत.

प्रिया - मराठीत आत्ता लिहिली वाचली जाते आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात विज्ञानकथेचा प्रसार व्हावा यासाठी भा. रा. भागवतांनी जो ज्यूल व्हर्नच्या कादंबऱ्याच्या बाबतीत प्रयोग केला होता, तसा काही प्रयत्न परत करुन पाहता येईल का? म्हणजे इंग्रजीतल्या प्रसिद्ध विज्ञानकथा आणि कादंबरीकारांच्या कलाकृती घेऊन त्याचं मराठीकरण किंवा तेही जमलं नाही तर निदान भाषांतर करुन वाचकांपर्यंत पोहोचवायच्या.

सुबोध - हो येईल ना. पण खरं सांगायचं तर माझं वाचन अलिकडच्या लेखकांच्या बाबतीत अगदीच तटपुंजे आहे. पण मी जेव्हा नेमाने वाचत होतो तेव्हाही मला जाणवलं होतं की इंग्रजी विज्ञानकथा जास्त जास्त शैलीच्या आहारी जाते आहे. पण असे कोणी लेखक असतील जे या चौकटीच्या आहारी न जाता सशक्त विज्ञानकथा लिहितात, त्यांचं लेखन भाषांतरित करुन वाचकांसमोर ठेवण्याचा निश्चित चांगला परिणाम होईल.

प्रिया - आणखी एक मार्ग सुचतोय तो म्हणजे दिवाळी अंक जसे निघतात, तसा एखादा अंक पूर्णपणे विज्ञानकथेला वाहिलेला काढायचा.

सुबोध - तसे काही प्रयोग झाले आहेत, विज्ञानयुगचा दिवाळी अंक हा दर वर्षी विज्ञानकथा विशेषांक असायचा, 'सृष्टीज्ञान' चा अजुनही विज्ञानकथेला वाहिलेला दिवाळी अंक निघतो. 'लोकमत'ने आणि आणखीही एक-दोन मासिकांनीही हा प्रयोग केला होता. नवल वगैरे दिवाळी अंकात विज्ञानकथा आवर्जून असते.

प्रिया - पण हे अधून मधून होणारे प्रयोग झाले. मला म्हणायचं होतं की बाकीचे दिवाळी अंक जसे दर वर्षी निघतात, तसा एखादा अंक सातत्याने दर वर्षी प्रकाशित होईल, जो विज्ञानकथेला वाहिलेला असेल.

सुबोध - तसं करायचं झालं तर निदान चाळीस पन्नास ताकदीचे विज्ञानकथालेखक आधी निर्माण व्हायला हवेत. आज परिस्थिती अशी आहे की ताकदीचे लेखकच मुळी सातआठ असतील. आणि बऱ्यापैकी लिहिणारे वीसेक असतील. माझ्या मते हा आकडा शंभरापर्यंत तरी जायला हवा, ज्यांत ताकदीचे लेखक निदान वीस तरी असतील - तसं झालं तर तुम्ही म्हणताय तो प्रयोग करून बघणं शक्य तरी आहे.

प्रिया - म्हणजे वाचक घडवण्याबरोबर लेखक घडवणंही तितकंच गरजेचं झालं आहे.

सुबोध - हो, पण ते जास्त कठीण आहे, कारण दिवसेंदिवस मराठी विषय ऑप्शनला टाकणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे.

प्रिया - मग या परिस्थितीत तुम्ही मराठी विज्ञानकथेबाबत आशावादी आहात की थोडी दोलायमान स्थिती आहे?

सुबोध - मी आशावादी आहे तो या कारणासाठी की विज्ञानकथा ही साधारणपणे भविष्याचा वेध घेत असते. आज जे लहान किंवा तरुण आहेत, ते सगळे तो काळ उद्या जगणार आहेत. तेव्हा त्याचं आकर्षण वाटून तरी ही पिढी विज्ञानकथांकडे ओढली जाईल. शिवाय विज्ञान-कट्ट्यावर ज्या कथा सादर होताहेत त्या आम्ही नव्याने लिहायला लागलो. त्या काळापेक्षा बर्‍याच सशक्त आहेत. त्यामुळे त्यातून उद्याचे काही विज्ञानकथा लेखक तरी निश्चित घडतील.

प्रिया - या विज्ञान-कट्ट्याची सुरुवात मविपने नवोदित विज्ञानकथालेखकांसाठी जे शिबिर घेतलं होतं त्यातून झाली. या पहिल्याच प्रयत्नाने जर तुमच्या आशा थोड्या का होईना जागृत झाल्या असल्या तर असे शिबिर आणखी वेगळ्या ठिकाणीही भरवता येईल का?

सुबोध - हो, अगदी नक्कीच! कारण सगळे काही मुंबईला येऊ शकतात असं नाही तेव्हा निदान आणखी काही निवडक मोठ्या शहरांतून हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. झाला तर आपला फायदाच होईल त्याने!

प्रिया - सध्या एखाद्या कथासंग्रहावर किंवा कादंबरीवर काम सुरु आहे की नाही?

सुबोध - कादंबरीवर नाही. कारण कथा जशी सुचते तशी कादंबरी सुचत नाही. कादंबरीचा विषय सुचतो आणि मग तो कादंबरीच्या अंगाने लेखक फुलवत जातो. पण त्यासाठी मनाचा तसा कल लागतो. तसा माझा नाहीये. पण सध्या मी जे काही वाचन करतोय, त्यातून वेगळ्या प्रकारची काही कथाबीजं मला सापडताहेत. तेव्हा त्या कथा लिहिण्याचा पुढचा प्रयत्न असेल माझा.

प्रिया - म्हणजे नजिकच्या भविष्यकाळात तुमचा आणखी एक कथासंग्रह वाचायला मिळणार तर आम्हांला!

सुबोध - माझा लिहिण्याचा वेग बघता तो नजिकचा भविष्यकाळ तीनचार वर्षांनी उगवला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

प्रिया - सुबोध, विज्ञानकथांच्या निमित्ताने पण बऱ्याच विषयांवर तुम्ही इतक्या मोकळेपणाने तुमची मते मांडलीत! मायबोलीचे बरेच सभासद हे अतिशय चोखंदळ वाचक आहेत, अगदी विज्ञानकथांचेही. आणि प्रत्येक वाचकाच्या मनात हे कुतुहल असतंच की लेखकाचा कथाबीजापासून कथेपर्यंत आणि एका कथेपासून अनेक कथासंग्रह प्रकाशित होण्याचा प्रवास कसा असतो. तुमच्या या मुलाखतीने एक उत्तम विज्ञानकथाकार विचार कसा करतो, आपल्या निर्मितीबद्दल किती जागरुक असतो हे ही समोर आलं. त्याचा उपयोग एकूणच मायबोलीवर लिहीणाऱ्यांना होईल, तेव्हा माझ्यातर्फे, संपादक मंडळातर्फे आणि संपूर्ण मायबोली परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार आणि तुम्हांला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!

सुबोध - आभार वगैरे औपचारिकतेची खरंच काही गरज नाही. तुम्हां सर्वांनाही माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा.

- प्रिया पाळंदे

प्रश्नांसाठी साहाय्य - अस्चिग

JawadekarBooks.jpg

प्रतिसाद

छान झाली आहे मुलाखत.

विज्ञानकथेचा खूप चांगला आणि सर्वांगीण आढावा घेतला आहे.

विज्ञानकथेचा खूप चांगला आणि सर्वांगीण आढावा घेतला आहे. >> +१
विचारपूर्वक घेतलेली मुलाखत दिसून येते.

फारच छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न.

नुकतीच एका कार्यक्रमात सुबोध जावडेकरांची भेट झाली. मायबोलीचा विषय निघाला. त्यांनी या मुलाखतीबद्दल सांगितलं. या मुलाखतीने ते एकदम प्रभावित झाले असावेत असं वाटलं. तेव्हा, संपादकमंडळींनो, यासाठी तुमचं मनःपूर्वक अभिनंदन :)

छान घेतली आहे मुलाखत :-)

विज्ञानकथेचा खूप चांगला आणि सर्वांगीण आढावा घेतला आहे >> +१

छान मुलाखत :)

मला शेवटपर्यंत वाचवेना. खूप पाल्हाळिक वाटली. विषय आवडीचा नसल्यामुळेही असू शकेल.

मुलाखत आव्डली..

थोडीशी लांबल्यासारखी वाटली.. पण खूपच अभ्यासपूर्ण मुलाखत आहे! एकदम नेटके प्रश्न विचारून जावडेकरांना बोलतं केलं आहे ! :)

आवडली मुलाखत! विस्तृत आढावा घेतलाय!

अतीशय सुंदर झाली आहे मुलाखत.... एकतर वेगळा विषय, तितकासा फेमस नसलेला (मराठी साहित्यात) आणि पुन्हः लेखल म्हणून त्यांचा घडलेला प्रवास, लेखक-वाचक यांच्यातील दुवा, जडण घडणीची प्रक्रीया सर्व काही व्यव्सथित ऊलगडून सांगितलं गेलं आहे.
खेरीज- मूळ विषय जो विज्ञानकथा त्याबद्दलही व्यवस्थित सर्वांगाने चर्चा झाली आहे.

मुलाखत खुप आवड्ली.विज्ञान कथा या कथा प्रकारावर उद्बोधक चर्चा झाली.

चांगली झाली आहे मुलाखत. थोडी मोठी आहे. पण आवडली.

ही गेल्या वर्षीच्या अंकातली आहे ना?