"नारायण, नारायण"...

"प

हाट झाली, उठा स्वामी हो !
पूर्व दिशा उजळली "

पहाटेच्याही आधी अती शांत वातावरणात ते भूपाळीचे सूर असे तरंगत होते, की जणू त्या गौतमी नदीवरील रेशमी धुकेच.
१९८३ चा जानेवारी - फेब्रुव्रारी महिना, स्थळ - पावसचे स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर.
स्वामी स्वरुपानंदांच्या समाधीच्या दर्शनाला आलेला आम्हां साताठ मित्रांचा एक ग्रूप.
उजाडायच्याही एवढ्या आधीच कोण इतकं मधुर आणि भावभरलं गातंय हे पहात मी मंदिरात केव्हा शिरलो, माझे मलाच कळले नाही.
आत समाधीपाशी एक मध्यम उंचीची, कृश व्यक्ती उभी होती. हीच व्यक्ती त्या शब्दांशी, त्यातील भावाशी एकरूप होत, ही भूपाळी आळवीत होती. प्रौढशा त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर एक शांत, समाधानी पण जरासे निरागस असे भाव होते.

वातावरणात गारवा भरून राहिलेला असतानाही त्या व्यक्तीच्या अंगावर लपेटलेले एक साधे खादीचे उपरणेवजा वस्त्र व खाली गुडघ्यापर्यंत नेसलेले एक धोतर एवढेच काय ते होते. अतिशय अलगदपणे समाधीवरील वस्त्रे ती व्यक्ती उतरवत होती - न जाणो ती वस्त्रे उतरवताना स्वामींची निद्रा मोडेल की काय अशी काळजी घेत जणू ! मग हळूहळू समाधीच्या आसपासचा भाग स्वच्छ करण्यात ती व्यक्ती दंग झाली. नंतर आसपास चौकशी करताना कळले की हे श्री. वैकुंठराव उर्फ मामा पडवळ - खुद्द स्वामी स्वरुपानंदांनी अनुग्रहीत केलेला भाग्यवान महात्मा.
मामांच्या हालचाली न्याहाळताना लक्षात आले की यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक हळुवारपणा व्यापून आहे, कुठेही धसमुसळेपणाचा लवलेश नाही. ते मग फुले वेचण्याचे काम असो वा मंदिर साफसफाईचे वा अजून काही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुखात वसलेले "नारायण, नारायण!"
ते ऐकताना 'नामःस्मरण' शब्दाचा अर्थ जणू जिवंत होत होता. अगदी श्वासोच्छ्वासाइतकं सहज होतं ते. कामापुरतेच मामा बोलत, एरव्ही 'नारायण, नारायण!' बाकी ना काही चर्चा, ना काही संवाद. स्वामीप्रेमात दंग होऊन राहिले होते ते पुरेपूर.

मला व इतर काही मित्रांना मग छंदच लागला. मामांच्या हालचाली न्याहाळण्याचा, त्यांच्या सर्व कृती निरखण्याचा.

समाधीची सकाळची पूजा चालू होती. मामा अलगदपणे समाधीवरचे निर्माल्य उतरवत होते. त्यानंतर ओलसर पंचाने ते गंध टिपत होते. असे वाटत होते की त्यांच्या दृष्टीला समोरची समाधी जाऊन प्रत्यक्ष स्वामीच दिसत होते. स्वामींच्या सुकोमल शरीराला चुकूनही काही इजा होऊ नये, अशी काळजी जणू ते घेत होते. आम्ही काहीजण आसपास उभे असलेले पाहून त्यांनी नुसती हातानेच आम्हाला खाली बसण्याची खूण केली. तो पूजाविधी आम्ही सगळे मनात साठवतोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं, कारण त्या समाधीवरील गंधाच्या गोळ्या व फुलं-तुळस (निर्माल्य) हे सगळं त्यांनी तशाच हळुवारपणे आमच्या प्रत्येकाच्या हातावर ठेवलं, अगदी सहजपणे, निर्हेतुकवृत्तीने. आम्ही सगळे पूर्ण नि:स्तब्ध.

narayan narayan 1_f.jpg
मग यथासांग पूजेचे विधी सुरु झाले. जलप्रक्षालन, दुग्धस्नान, पुन्हा जलप्रक्षालन, पंचामृतस्नान, पुन्हा जलप्रक्षालन. हे करत असताना त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे पुरुषसूक्ताचे स्वर. असे काही भक्तिमय वातावरण तयार झाले होते, की सगळे कालचक्र इथेच थांबून रहावे, निदान काहीकाळ तरी. समाधीवरील तीर्थ डोळ्यांना लावणे, मग कोरड्या वस्त्राने समाधी टिपणे, मग गंधलेपन. अती मृदुतेने हे सगळं चाललं होतं.

"का कमळावरी भ्रमर | पाय ठेवीती हळुवार | कुचुंबैल केसर | इया शंका ||" ही माऊलींची ओवी मूर्तस्वरुपात साकारत होती जणू.

मग पुढे फुले, तुळस अर्पण करताना त्यांची सहज सुंदर आरास साकारली जात होती. अशी की कोण्या उत्तम चित्रकाराने सहज फुलांची रांगोळीच मांडावी. अतिसुबकपणे. आणि मग तो नैवेद्य दाखवणे.. नव्हे, नव्हे, आईच्या हाताने स्वामींना घास भरवणे. डोळे नकळत केव्हा वाहू लागले व केव्हा मिटले गेले हे माझे मलाच कळले नाही.

एकदम आरतीच्या घंटानादानेच जाग आली. जणू आतापर्यंत जमून आलेल्या त्या परम शांतीचा भंग कोणी व्रात्य पोरं करताहेत असं वाटू लागलं, कवायतीसारखी आरती करतो आहे मी, असं वाटू लागलं.

दुपारी जेवण\प्रसाद घेतानाही मामा आवर्जून आम्हा सर्वांच्या जवळ येउन "सावकाश जेवा, काय हवं अजून ?" असं मृदू आवाजात विचारत होते. जोडीला 'नारायण'स्मरण तर चालूच.
कुठल्या मुशीतून भगवंताने यांना घडवले आहे, असा विचार मनात दाटत होता.
माझ्या स्वामीजींच्या घरी आवर्जून आलेली ही सर्व मंडळी म्हणजे निस्सीम स्वामीभक्तच, माझे भाऊ-बहीणच. मग त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळतंय ना, हे मी पहायला नको का? असाच विचार त्यांच्या ठायी असणार, त्यामुळे हे सगळे पहाण्यातच ते गुंग होते. त्या जेवणाच्या गदारोळात मामांना जेवताना शेवटपर्यंत पाहिलंच नाही मी तरी.
"सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा||" असे वर्णन आतापर्यंत फक्त ऐकले होते, त्या सर्वोत्तमाच्या दासाचे असे प्रत्यक्ष दर्शन घडेल असे कधी वाटलेच नव्हते. त्यांच्या विषयी आसपासच्या मंडळींकडून जाणून घेताना फक्त आश्चर्य व आदरभावच दुणावत होता मनात.

तसं पहाता, स्वामी स्वरुपानंद हे सोऽहं ची दीक्षा देणारे सत्पुरुष. पण गंमत अशी सांगतात, की जेव्हा स्वामींनी मामांना सोऽहं ची दीक्षा दिली, तेव्हा पुढे हेही सांगितले लगेचच, की त्या "नारायणाला" सोडायचं नाही हं! असे भाग्यवान हे मामा.

मामा वेंगुर्ल्याला रहात, पण सहा महिने पावसलाच मुक्काम असे. वेंगुर्ल्याहून एकटेच खांद्यावर पताका घेऊन पायी पायी पावसची वारी करत येत असत. मुखात "नारायणाच्या" जोडीला स्वामींचे अभंग. हे ऐकल्यानंतर ते काय उद्योगधंदा करतात अन् त्यांना मुलंबाळं किती असले काही प्रश्नच मग उद्भवले नाहीत मनात. स्वामीप्रेमाने पुष्ट झालेला हा महात्मा ज्ञानेश्वरी, दासबोधात सांगितलेली सगुणभक्ती प्रत्यक्ष आचरत होता. मामांचे जगच निराळे होते. केवळ भगवंताच्या व स्वामीजींच्या भरवशावर एका वेगळ्याच मस्तीत ते वावरत होते. व्यावहारिक जगात ज्या परमात्मभावाला काडीचीही किंमत नसते त्या भावाला अंतरात प्राणापलिकडे जपत ते एक अलौकिक भावजीवन जगत होते. पण तेही अगदी सहजपणे, त्याचा देखावा न करता, त्याचा दंभ होऊ न देता.
परममहंसपदी आरुढ झालेले स्वामी स्वरुपानंद, जे आता चैतन्यमय अवस्थेत तिथे वास्तव्य करून होते, ते आम्हा शहरी, तार्किक व बुद्धिमानी (?) व्यक्तींना सगुणभक्ती कशी करावी, हा जणू पाठच देत होते या महात्म्याकरवी.
संध्याकाळी पुन्हा आरती निमित्ताने मंदिरात जाणे झाले. सकाळच्या त्या भावभरल्या आठवणी मनात साठवताना मी जरा बाहेरच थांबलो मग! आरतीचा गदारोळ पुन्हा सगळ्या शांतीचा भंग करेल की काय या भीतीने! रात्री जेवणानंतर शतपावली करायला आम्ही काहीजण बाहेर पडलो, तर मामा मंदिरात जाताना दिसले. कुतूहलाने आम्हीही त्यांच्या पाठोपाठ. पुढचे जे दृश्य मी पाहिले, ते माझ्या ह्रदयावर असे काही कोरले गेले आहे की मी ते आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. समाधीच्या मागच्याच भिंतीवरील एका कोनाड्यात श्री विठ्ठल रखुमाईच्या उभ्या मूर्ती आहेत - छोट्याशा. मामा त्या मूर्तींचे दर्शन घेऊन चक्क त्यांचे पाय दाबून देत होते. जसे आपण एखाद्या जिवंत माणसाचे दाबून देतो तसे. डोळ्यात असे आर्त भाव की देवा, किती असे तिष्ठत उभे रहाता आम्हा क्षुद्र जीवांसाठी? जरा विसावा घ्यावा ना आता.

माझी संपूर्ण खात्री आहे की हे पहायला कितीही नास्तिक, शंकेखोर माणूस जरी तिथे उपस्थित असता तर, त्यानेही लोटांगणच घातले असते. त्या विठ्ठलाला आणि या महाभागवतालाही. लौकिक-भौतिक गोष्टीत लडबडलेल्या या विसाव्या शतकात एवढे मोठे आश्चर्य माझ्यासमोर घडत होते, की क्षणभर आपण याच युगात आहोत ना? की चुकून कुठल्या सत्ययुगात वगैरे पोहोचलो की काय हे कळेना झाले. आम्ही तिथे असूनही मामा त्यांच्या पादसेवनभक्तीत दंग होते. ना तिथे कुठली कृत्रिमता ना काही विशेष आविर्भाव. हे नक्कीच त्यांचे दररोजचे, नित्याचेच भक्तिकर्म असणार. हे देवदुर्लभ दृश्य पाहताना आम्ही सगळे जागीच खिळल्यासारखे व आता पुढचा काय चमत्कार पहायला मिळणार या उत्सुकतेत.

मामा शांतपणे समाधीशेजारी बसले, मुखात स्वामींचेच भावभरले अभंग. समाधीवरील सगळ्यात वरची फुले (निर्माल्य) हळुवारपणे उचलून त्यांनी बाजूला ठेवली व अतिशय प्रेमाने थोपटल्यासारखा असा हात समाधीवर फिरवत राहिले.
माझ्या अंतःकरणातला दगड फुटून केव्हाच पाझरायला लागला होता. डोळे मिटून शांतपणे मी ते अभंग आत साठवत होतो.
किती काळ गेला कोण जाणे. मित्रांनी खांद्यावर अलगद हात ठेवत जागे केले. अर्धवट जागा, अर्धवट ग्लानीत बाहेर पडताना मी पाहिले , समाधीवरील उबदार पांघरुण मामा सारखे करत होते. स्वामी स्वरुपानंदांच्या कृपेनेच ही यात्रा अशी "सुफलित" होणार होती तर.

पुढे बर्‍याच वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये पावसला जाण्याचा योग आला. मंदिरात शिरण्यापूर्वी सहज लक्ष गेले, मंदिराच्या पहिल्याच पायरीवर, एका कोपर्‍यात एक पितळी पत्रा लावलेला. त्यावर काही मजकूर व एक दोन फुले वाहिलेली.

कुतूहलाने मी जवळ जाऊन निरखून पाहिले तर, स्वामी कृपांकित वैकुंठराव पडवळ असा नामनिर्देश पाहून तिथेच गुडघ्यावर बसलो. त्या पाटीवरुन हात फिरवताना कानात गुंजत राहिले ते भावभरले "नारायण, नारायण".
माझ्या मनात आलं - "या इथेच, श्री स्वामींच्या चरणांपाशीच सदैव रहायला आवडेल मला. स्वर्गसुख तर नकोच, पण ते अतिदुर्लभ वैकुंठसुखही नको मला." याशिवाय या महात्म्याची दुसरी इच्छा तरी काय असणार ?
स्वामीप्रेमात अखंड डुंबणारा हा अतिप्रेमळ महात्मा काय अन् विठ्ठलप्रेमाने वेडे झालेले ते श्री नामदेवराय काय ?
दोघांची जातकुळी एकच की.

"नारायण, नारायण"

- पुरंदरे शशांक

प्रतिसाद

खुप आवडलं... असा निस्सिम भाव मनात राखायला, मोठे बळ लागते.

पावसच्या त्या आश्रमात असे काही लोकविलक्षण योगभ्रष्ट आत्मे तशाच अलौकिक स्वामींकडे येऊन विसावले होते.
उपमा देता येईल रामकृष्ण परमहंसांभोवती आकृष्ट झालेल्या अस्वस्थ शिष्यांची..
त्या वातावरणात नेलेत.

सगळं 'चित्रमय' होऊन डोळ्यांपुढे उभं राहिलं.

>व्यावहारिक जगात ज्या परमात्मभावाला काडीचीही किंमत नसते त्या भावाला अंतरात प्राणापलिकडे जपत ते एक अलौकिक >भावजीवन जगत होते. पण तेही अगदी सहजपणे, त्याचा देखावा न करता, त्याचा दंभ होऊ न देता.
हे किती छान आणि महत्वाचं लिहिलंत तुम्ही.
खूप आवडलं हे ललित.

चैतन्य +१. सगळे चित्रमय होऊन समोर उभे राहिले. :-)

शशांक पावसला नेउन आणलत.वाचता वाचताच पावसला गेल की मामाना भेटायच असा विचार येत होता.पण?आता पितळी पायरिची नक्किच आठवण राहिल.

उत्कृष्ट वातावरणनिर्मिती!

हा लेख वाचताना असं वाटत होतं की मी स्वतः हे सगळं अनुभवतोय! अगदी माझ्या समोर घडतय हे ... डोळ्यासमोर मंदिर उभे राहिले.. कधी त्या जागी गेलो तर नक्की भेट देईन! :)

वा सुरेख!! असे निस्सीम उपासक, भक्त विरळाच. गोकुळात कृष्णवेड्या गोपींची आठवण झाली. तुम्ही तो सोहळा बघितलात खरोखरी भाग्यवान आहात... :)

सुरेख लिहिलंय :)

शशांकजी,
सुरेख माहिती मिळाली,वर्णन छान जमलयं..

रैना +१.
लेख वाचताना समोर आत्ता हेच घडतंय असे वाटत होते. आता पावसला गेलो की त्यांचेही दर्शन घ्यावे असे वाटत असतानाच शेवटचा परिच्छेद वाचला. खुप सुंदर लिहिलेय. हे सगळे अनुभवण्यासाठी तितकीच साफ दृष्टी आणि तितकेच संवेदनशील मन हवे.

सुरेख......
शोभनाताई>>> +१ पण?आता पितळी पायरिची नक्किच आठवण राहिल.

व्वा!! सुंदर वर्णन केलेत. अगदी डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग. अशी भक्ती अनुभवणे सुद्धा किती भाग्याचे आहे!

सुरेख..

सुरेख!भक्तिची उत्कटता ज्या ठायी असते तिथेच असा आपपर भाव मावळतो आणि उरते ती फक्त निस्सिम भक्ती!
पावसला मंदिरात डोळे मिटून बसल्यावर आतून शांत झाल्याचा अनुभव मीही घेतलाय.. ते सारं आठवलं..

तुम्ही फार सुरेख लिहिलत शशांक! आवडलं! :)

अतीव सुंदर. समोर घडतय असं वाटतय, शशांक.
<<डोळ्यात असे आर्त भाव की देवा, किती असे तिष्ठत उभे रहाता आम्हा क्षुद्र जीवांसाठी? जरा विसावा घ्यावा ना आता.>>
भक्तं म्हणवणार्‍या कितीजणांच्या मनात असं येत असेल? अन आलं तरीही लाज्-काज आड येऊन प्रत्यक्षं मूर्तीचे पाय दाबून देण्याचा खुळेपणा(??) कोण करील...
सगुणभक्ती काय निर्गुणभक्ती काय... समर्पण महत्वाचं.
कर्मकांड असूनही, त्यामागची समर्पण भावना जागृत असली की अगदी श्वास घेण्यालाही वेगळी भूमिका प्राप्तं होते.
सुंदर मांडला आहे हा लेख. एका भक्ताचं चित्रण करता करता, भक्तीमागची तत्वंही उलगडली आहेत.
शशांक, छान लिहिता हो.

शशांक छानच मांडलंस! स्पर्शून गेलं अगदी!

खुपच छान लिहिलं आहे.

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनापासून आभार.

दिनेशदा म्हणतात ते अगदी खरे आहे - असा निस्सिम भाव मनात राखायला, मोठे बळ लागते. मामा म्हणजे केवळ अलौकिक व्यक्तिमत्वच.

<<<भक्तं म्हणवणार्‍या कितीजणांच्या मनात असं येत असेल? अन आलं तरीही लाज्-काज आड येऊन प्रत्यक्षं मूर्तीचे पाय दाबून देण्याचा खुळेपणा(??) कोण करील...
सगुणभक्ती काय निर्गुणभक्ती काय... समर्पण महत्वाचं.
कर्मकांड असूनही, त्यामागची समर्पण भावना जागृत असली की अगदी श्वास घेण्यालाही वेगळी भूमिका प्राप्तं होते.>>> दादने हे जे लिहिलं आहे त्यात सर्व काही आले - इतके समर्पण (परमेश्वरचरणी टोटल सरेंडर / संपूर्ण शरणागती) हे फक्त संतांमधेच पहायला मिळते. सर्व संतांचे देवावर अकारण प्रेम असते - त्याबदल्यात त्यांना काहीही नको असते - आणि यामुळे परमेश्वराचे ते निस्सिम/ अंतरंग भक्त होतात यात नवल ते काय ?

हे सगळे अनुभवण्यासाठी तितकीच साफ दृष्टी आणि तितकेच संवेदनशील मन हवे. >>> आस यांनी जे म्हटलंय ते मला लागू होईल का - शंकाच वाटते. मामांचा जो निखळ भक्तिभाव होता त्याने मला वाटते तिथे उपस्थित असणार्‍या कोणाच्याही मनात हेच भाव निर्माण झाले असते - संतसंगती का महत्वाची आहे याचे एकमेव कारण हेच की संतांमधे जे भगवत्प्रेम असते ते आपल्याला विनासायास लाभते -आपली तार्किकता सहज गळून पडते - मन सहजच संवेदनशील होते.
संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळुनी जाय |
मग रामनामी उपजे आवडी | सुख घडोघडी वाढो लागे |
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे | हृदयी प्रगटे रामरुप |
तुका म्हणे साधन सुलभ गोमटे | परि उपतिष्ठे पूर्वपुण्ण्ये ||

अशी भक्ती अनुभवणे सुद्धा किती भाग्याचे आहे! >>> आर्याने म्हटलेले शंभर टक्के खरे आहे - ही गोष्ट अनुभवणे यासारखे भाग्य नाही - हा प्रसंग माझ्या मनावर असा काही कोरला गेलाय की मामांचे स्मरण जरी झाले तरी डोळे पाणावतातच.

भगवतकृपेने सर्वांनाच अशी सत्संगती प्राप्त होवो ही संतमहात्म्यांच्याचरणी/ भगवंतांच्याचरणी प्रार्थना.

ॐ तत् सत् ||

>>समाधीच्या मागच्याच भिंतीवरील एका कोनाड्यात श्री विठ्ठल रखुमाईच्या उभ्या मूर्ती आहेत - छोट्याशा. मामा त्या मूर्तींचे दर्शन घेऊन चक्क त्यांचे पाय दाबून देत होते. जसे आपण एखाद्या जिवंत माणसाचे दाबून देतो तसे.

हे विसरणार नाही मी कधीच

अप्रतिम..... प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारख वाटलं इतक सुंदर वर्णन..

वैकुंठराव यांची भक्ती आणि तो रेखाटणारा आपला लेख दोन्हीही उत्तम.

सुंदर वर्णन , छान लेखन

क्या बात हे शशांक
कसलं लिहील आहेस

पावसला दोनदा जाण्याचा योग आलेला आहे..
तिथली स्वच्छता ,शांतता , प्रसन्न वातावरण , स्वरूपानंदांची मूर्ती , दुपारी मिळणारा खिचडीचा नैवेद्य
भरपूर फुलझाडं , पाण्यात उमलेली कमळ सर्वच अद्भुत

मामांच व्यक्तिमत्व नितांत सुंदर रेखाटलय , अशा व्यक्ती खरच दुर्मिळ असतात

मामा त्या मूर्तींचे दर्शन घेऊन चक्क त्यांचे पाय दाबून देत होते. जसे आपण एखाद्या जिवंत माणसाचे दाबून देतो तसे. डोळ्यात असे आर्त भाव की देवा, किती असे तिष्ठत उभे रहाता आम्हा क्षुद्र जीवांसाठी? जरा विसावा घ्यावा ना आता. >> __/\__ मनाला भावल :)

किती तरल सहज सुंदर शब्द, छान लिहीलंय शशांकजी :)

खूप छान लिहिले आहेस शशांक!

उत्तम लेख ......................धन्यवाद पुरन्दरे जी !

शशांक, तु्म्हाला हे सर्व पहायला मिळाले... तुमचे भाग्य थोर!
खूप छान वर्णन केलेत!

सुरेख!