बालसाहित्य

संपादकीय

नमस्कार,

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. घटना आनंदाची आणि अभिमानाची खरी, पण त्यामागच्या इतिहासाची पानं चाळली, तर ती जनसामान्यांना आपल्याच सरकारविरुद्ध कराव्या लागलेल्या संघर्षाने आणि १०५ हुतात्म्यांच्या प्राणार्पणाने रक्तलांच्छित झालेली आढळतात. म्हणूनच राज्याचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करताना या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
लेखन प्रकार: 

चांदोबाची खडीसाखर...

खूप खूप वर्षांपूर्वी आकाशात सूर्यबाप्पा आणि चांदोबा असे दोघंच जण असायचे. सूर्यबाप्पा हे चांदोबाचे बाबा. सूर्यबाप्पा दिवसभर आकाशात असायचे आणि चांदोबा रात्रभर. सूर्यबाप्पा दिवसभर काम करून दमायचे आणि रात्री झोपून जायचे. त्यामुळे चांदोबाची आणि त्यांची कधी भेटच व्हायची नाही. मग चांदोबाला रात्री खूप कंटाळा यायचा. रात्री अंधार असल्यामुळे त्याला खूप भीती वाटायची आणि खूप एकटं एकटंही वाटायचं.

मग एकदा चांदोबा सूर्यबाप्पांकडे गेला आणि खूप रडायला लागला.

सूर्यबाप्पांनी विचारलं "काय रे चांदोबा, तुला काय झालं... का रडतोस तू?"

चांदोबा म्हणाला "बाबा, मला रात्री खूप भीती वाटते... खूप एकटं वाटतं... तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर रात्री."

सूर्यबाप्पा म्हणाले.."अरे सोन्या, मला दिवसा आकाशात जावं लागतं ना.. आणि दिवसभर आकाशात जाऊन मी खूप दमतो... मग रात्री मला झोपावं लागतं... मी कसा येणार तुझ्या बरोबर रात्री..."

चांदोबा अजून रडायला लागला आणि म्हणाला, "पण मग मी काय करू... मला एकट्याला नाही आवडत आकाशात... तुमची खूप आठवण येते."

सूर्यबाप्पांनी जरा विचार केला आणि म्हणला, "आपण एक आयडिया करुया का? मी तुला थोडी खडीसाखर देतो. ती तू खिशात ठेव. आणि तुला भीती वाटली किंवा माझी आठवण आली की तू थोडी खडीसाखर खा.... ठीके?"

चांदोबाला खडीसाखर खूप आवडायची, त्यामुळे तो एकदम खुश झाला आणि म्हणाला... "हो.... द्या खडीसाखर..."

मग सूर्यबाप्पांनी चांदोबाला मूठभरून खडीसाखर दिली. चांदोबानी ती खडीसाखर आपल्या खिशात ठेवली.

तेवढ्यात दिवस संपला. दिवस संपल्यामुळे सूर्यबाप्पा झोपायला गेले आणि चांदोबा आकाशात जायला निघाला. आज खिशात खडीसाखर असल्यामुळे चांदोबा खुशीत होता आणि तो जोरजोरात पळत आकाशात जायला निघाला. पळतापळता त्याचा पाय कशालातरी अडकला आणि तो धप्पकन पडला... तो पडल्यामुळे त्याच्या खिशातली खडीसाखर सांडली आणि आकाशात सगळीकडे उधळली...

चांदोबाने उठून बघितलं तर काय गंमत... सगळ्या खडीसाखरेच्या आकाशात चांदण्या झाल्या होत्या!

तेंव्हापासून चांदोबाने रात्रीचं रडणं बंद केलं... कारण तो आता आकाशात एकटा नसतो... सूर्यबाप्पांनी दिलेल्या खडीसाखरेच्या चांदण्याही त्याच्या बरोबर असतात! त्याला खूप कंटाळा आला की एक एक खडीसाखरेची चांदणी तो खात बसतो... सकाळ होईपर्यंत सगळी खडीसाखर तो संपवून टाकतो!

(म्हणून रात्री चांदण्या असतात आणि दिवसा नसतात!)

[माझ्या तीन वर्षांच्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला की आकाशात रात्री चांदण्या का असतात आणि दिवसा का नसतात.... त्याचं उत्तर देताना जन्मलेली ही गोष्ट!]

- प्रसाद शिरगांवकर

लेखन प्रकार: 

बाप्पा, तुला पेंटिंगला केवढा मोठ्ठा पेपर!


बाप्पा, तुला पेंटिंगला केवढा मोठ्ठा पेपर
सकाळ संध्याकाळी वेगळे वेगळे कलर

बाप्पा तुझ्या पेंटिंगमध्ये ढग कीती छान
दडून बसला सूर्य, बघतो हळूच काढून मान

अरे! डोंगराच्या पेंटिंगवर पाखरांचे थवे
रोज कसे देतोस सांग आकार नवे नवे?

पावसाच्या पेंटिंगवर थेंब खरे खरे
सप्तरंगी धनुष्य काढलेस कसे बरे?

शुभ्र ढगा दिलीस का पावसाळ्यात टांग?
विजेसाठी वापरतोस रंग कुठला सांग?

रात्री तुझ्या डब्यातले रंग संपतात का रे?
काळ्या पांढर्‍या रंगानीच रंगवतोस का सारे

पट्टी, कंपास शिवाय कसं जमत तुला रे?
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी ट्युशन घेशील का रे?

बाप्पा, तुला पेंटिंगला केवढा मोठ्ठा पेपर
सकाळ संध्याकाळी वेगळे वेगळे कलर...

-सत्यजित
चित्र- संपदा

लेखन प्रकार: 

माकडाचा मोबाईल

बालगायिका : कु. अनाहिता पोंक्षे
संगीतकार : विवेक काजरेकर (vivek_kajarekar)
गीतकार : मिलिंद छत्रे (milya)

गाण्याचे बोल असे आहेत:

माकडाचा मोबाईल

एक माकड घेऊन आले एकदा एक मोबाईल
डिस्प्ले होता कलरफुल आणि लेटेस्ट होती स्टाईल

स्क्रीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान
रिंगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान

माकड म्हणे वापरायचाय का तुम्हाला हा फोन?
एका कॉलला रुपये तीन, एस. एम. एस. ला दोन

दुसर्‍या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर
रोमिंग तेवढे घेतले नाही, उगाच खर्चात भर

कोल्हा म्हणाला माकडदादा झालोय फार बोअर
एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर

ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार
अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार

अस्वल म्हणाले वाट बघत असेल माझी हनी
फोन करुन सांगतो ’आलोच मी’ काढून ठेव हनी

कुत्रा बोले शेपूट हलवत सांगू का खरंच
'आयडीआ' का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना 'हच'

इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत
पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत

माकड म्हणाले "घाबरु नका! पळताय काय असे?
युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे.."

हळुच त्याने बंदुकीचा 'ठो ठो' रिंगटोन लावला
घाबरुन तेथून वाघोबाने लागलीच पळ काढला

वाघोबाची फजिती पाहून हसु लागला जो तो
माकड म्हणाले नीट बसा काढू छानसा फोटो

काढू छानसा फोटो, काढू छानसा फोटो॥

लेखन प्रकार: