दिवाळी संवाद

संवाद- वैशाली सामंत

मुलाखतकार : पूनम छत्रे
विशेष आभार : वैभव जोशी

'वैशाली सामंत' - मराठी चित्रपटांच्या पार्श्वगायनामधलं आजचं आघाडीचं नाव, आजची 'स्टार'! तिचं नुसतं नाव जरी घेतलं, तरी एका पाठोपाठ एक कितीतरी लोकप्रिय गाणी आठवतात, 'सारेगमप लिटिल चँप्स'मधलं तिचं आश्वासक रूप आठवतं, एक कलाकार म्हणून चांगल्या गाण्याची असलेली आस जाणवते. तिची मुलाखत घ्यायची इच्छा होती, पण तिचा असलेला अतिशय व्यग्र दिनक्रम, ध्वनिमुद्रणं, गाण्याचे कार्यक्रम.. अर्धा तासही रिकामा सापडणं अवघड होत होतं. तरीही फोनवर दिलगिरी व्यक्त करत, पुढच्या तारखा देत देत, एके दिवशी थोडा वेळ मिळाला.
लेखन प्रकार: 

शोभा चित्रे-दिलीप चित्रे

संवादः शोभा चित्रे आणि दिलीप चित्रे
मुलाखतकार: वैशाली राजे

शोभा आणि दिलीप चित्रे ही नावं साहित्यप्रेमींना नवीन नाहीत. परदेशी वास्तव्य करून असणार्‍या भारतीयांचं मनोगत प्रथमच मराठी वाचकांपुढे मांडणारे साहित्यिक म्हणून ते भारताबाहेर तसेच भारतातल्या मराठी जनतेला परिचित आहेत. चित्रे दांपत्य मूळचे बडोद्याचे, पण गेली ३७ वर्षे त्यांचे अमेरिकेत वास्तव्य आहे. 'गोठलेल्या वाटा', 'गौरी गौरी कुठे आलीस', 'पानगळीच्या आठवणी' ही शोभाताईंची काही गाजलेली पुस्तकं, तसंच 'हिमगंध' हा कवितासंग्रह आणि 'अलिबाबाची हीच गुहा' हे दिलीप चित्रे यांचं नाटक सर्वपरिचित आहे.

अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, काव्यवाचन अशा मराठी मनाशी संबंधित अनेक गोष्टींचे संयोजन त्यांनी केले आहे. 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेमध्ये तिच्या स्थापनेपासून आजपर्यंत शोभा आणि दिलीप चित्रे कार्य करत आहेत. नुकताच दोघांनी मिळून केलेला एक प्रकल्प म्हणजे 'मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' ह्या मेलडी चेव्हिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचा 'मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश' या नावाने केलेला अनुवाद. जून महिन्यात या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अमेरिकेत झाला. या समारंभात प्रथम या दांपत्याशी भेट झाली. 'मायबोली'साठी मुलाखत देण्याची विनंती त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्यांच्याशी झालेला संवाद हितगुज दिवाळी अंकाच्या वाचकांसाठी सादर करीत आहे.

दिलीप चित्रे : मी दिलीप वि. चित्रे, म्हणजे दिलीप विष्णू चित्रे. मित्र माझा उल्लेख 'विचित्रे' असा करतात. बर्‍याचदा लोकांचा घोटाळा होतो माझ्या नावामुळे. 'दिलीप पुरुषोत्तम चित्रे' म्हणून मोठे मराठी साहित्यिक आहेत. ते दि. पु. चित्रे वेगळे. मला लहानपणापासूनच आवड होती लिहिण्याची. मी 'सत्यकथा' अगदी लहान असताना वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते अगदी बंद पडेपर्यंत मी त्याचा प्रमोटर होतो. अगदी अमेरिकेतही मी त्याचे वर्गणीदार जमवले. शाळा, कॉलेजमध्ये असताना कथा, कविता लिहायला लागलो. पारितोषिकं मिळवली. पु. वा. चित्रे, म्हणजे 'दिपुं'चे वडील, हे 'अभिरुची'चे संपादक होते. त्यातही माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. बडोद्याला 'मराठी वाङ्मयपरिषद' नावाची संस्था आहे. त्याचा वाङ्मयउत्सव असतो. तेव्हा स्पर्धा असायच्या, त्यात मी भाग घेऊ लागलो. पारितोषिकं मिळवली. एकदा तर सगळ्यांच साहित्यप्रकारात मला प्रथम पारितोषिक मिळालं, मग मी भाग घेणं थांबवलं. वाङ्मयपरिषदेच्या एक्झेक्युटिव्ह कमिटीवर होतो सेक्रेटरी म्हणून. कॉलेजमध्ये असताना माझ्या कविता मासिकांत वगैरे प्रसिद्ध व्हायला लागल्या. कॉलेज संपले, नोकरी लागली, मग त्यानिमित्त देशाबाहेर पडलो.

परदेशी साहित्य : एक चळवळ

अमेरिकेत यायच्या आधी ३ वर्षं आम्ही लंडनला होतो. तेव्हा जाणवलं, की तिथे राहणार्‍या मराठी लोकांना साहित्याची ओळख नाही, आवड नाही. साहित्याबद्दल कळकळ अशी फार नव्हती. मनोरंजनात्मक वाचनच करायचे लोक, अभ्यासपूर्ण असं नाही. तेव्हा पहिल्यांदा मी 'दीपावली' मासिकाचा 'लंडन विशेषांक' काढला. या कामात माझे लंडनचे मित्र कै. मुकुंद सोनपाटकी हे सुद्धा सहभागी होते. दीनानाथ दलाल संपादक होते. मुखपृष्ठ, जाहिराती यांपासून त्या अंकाचं सगळं काम लंडनमध्येच करण्यात आलं. परदेशातील अनुभवाचं चित्र साहित्यात येणं हे नवीन होतं तेव्हा. नारळीकरांपासून सर्वांचं साहित्य होतं त्यात. हा प्रकल्प खूप गाजला.

इथे आल्यानंतर वाटलं परदेशस्थ भारतीयांच्या, मराठी लोकांच्या लेखनाला शाश्वत स्वरूप द्यावं. कथासंग्रह करावा. भारताबाहेरच्या लोकांचे अनुभव मराठी साहित्यात यावेत. यातून काही वेगळं तयार होईल का, असा विचार मनात आला. त्यासाठी 'कथा' हा फॉर्म निवडला. मग १२ वर्षं प्रयत्न केला. तेव्हा कंप्युटर नव्हता, फोनसंपर्क कठीण, पत्रोत्तराला विलंब लागायचा. अश्या परिस्थितीत जपान, मिडल इस्ट, रशिया, ऑस्ट्रेलिया इकडे सर्वांना पत्रं पाठवून लिहिण्याबद्दल कळवलं. लिहिणारे लोक नवीन होते, परदेशी राहण्याचा अनुभव घेत होते. असं काही लिहावं, अशी कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती. पण लेखनामध्ये परदेशाच्या किंवा तिथे राहण्याबद्दलच्या नुसत्या कौतुकाचा भाग नको होता. 'परदेशी साहित्य' असा एक नवीन फॉर्म तयार होईल, असं शाश्वत स्वरूप त्या लेखनाला द्यायचा विचार होता. तेव्हा काही लोकांनी मला वेड्यात काढलं, पण आज ही वस्तुस्थिती आहे. दलित साहित्य असंच आलं. ग्रामीण साहित्याची सुरुवात माडगूळकर, शंकर पाटील यांच्यापासून झाली आणि मग ते प्रस्थापित झालं. तसंच या परदेशी साहित्याचं. त्याचा मोठा प्रकल्प झाला. मराठी कथाविश्वाचा ढाचा बदलला. एक लँडमार्क म्हणून हे पुस्तक, 'कुंपणापलिकडचे शेत' प्रसिद्ध झालं. मराठीचं क्षितीज विस्तारलं गेलं.

गंमत अशी की लोक पर्यटनासाठी म्हणून परदेशी जातात, पंधरा दिवस फिरतात आणि आमच्याविषयी लिहितात. यात कधीकधी चुकीचं चित्र निर्माण होतं. तरी मागे जाऊन पाहिलं, तर अनंत काणेकरांचं 'धुक्यातून लाल तार्‍याकडे' हे रशियावरचं पुस्तक मला आवडलं. प्रवासवर्णन आहे, बाकी लेखनातून परदेशातल्या जीवनाचे अनुभव आहेत का? ते नसले, तर चुकीचं चित्र निर्माण होऊ शकतं. हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही लढा दिला असं म्हणायला हरकत नाही. तिथे राहणार्‍या लोकांचं आयुष्य हे पर्यटनासाठी येऊन कळत नाही. अपर्णाचं (अपर्णा वेलणकर) 'फॉर हियर ऑर टू गो' हे नवीन पुस्तक पाहिलंयस? त्याच्या प्रस्तावनेत मी हेच म्हटलंय, खोल पाण्यात बुडी घ्यावी लागते, काठावरून सुखंदु:खं कळत नाहीत. मी इथे आलो तेव्हा 'हायर आणि फायर' माहीत नव्हतं. शेजार्‍याचा जॉब जातो... मी नुकताच आलोय. त्यात माझा रंग वेगळा. इन्टरव्ह्यूला गेलात... दुसरा गोरा, इथे जन्मलेला... तर कोणाला सिलेक्ट करतील? मग always try to be better than somebody else. कुंपणापलिकडचं शेत लांबून नेहमीच हिरवंगार दिसतं. त्यावरून चालायला सुरुवात केलीत की खरे अनुभव येतात. ते अनुभव या पुस्तकात लोकांनी मांडले.

शोभा चित्रे : मला वाचनाची आवड होती, मी नुसतं वाचन करायचे. लेखन कधी केलं नव्हतं. पण दिलीपनी तेव्हा जो विचार मांडला, परदेशी साहित्याबद्दलचा, तो मला अतिशय आवडला. मी विचार करत होते की पदरचे पैसे घालावे का, कारण कोणी प्रकाशक ओळखीचे नव्हते. दिलीपचे प्रयत्न मी पाहत होते. आलेल्या साहित्यातून पुस्तकासाठी श्री. पु.(भागवत)नी लेखनाची निवड करायची एवढं ठरलं होतं. नवर्‍याच्या धडपडीला थोडीशी मदत म्हणून मग मी या पुस्तकासाठी एक कथा लिहायचं ठरवलं. मला भीती वाटत होती, की ही कथा दिलीपला कशी दाखवायची? श्रीपुंचं नाव एवढं मोठं, त्याचा तर मी विचारच नाही केला. तेव्हा मी भारतात जाणार होते, तर जाण्यापूर्वी ती कथा मी दिलीपला देऊन निघून गेले. मग दिलीपही नंतर मुंबईला आले, तेव्हा ठरवलं की कथेवर नाव नाही टाकायचं, कारण दिलीपच पुस्तकाचं सगळं काम करत होते आणि त्यांच्याच पत्नीनं लिहिलेली कथा, तेव्हा श्रीपुंवर काही दडपण येऊ नये असं मला वाटत होतं. जमलेल्या सगळ्या कथांबरोबर ती कथा माझं नाव न घालता पाठवली. मग श्रीपुंनी ती कथा चांगली आहे, पुस्तकाच्या संकल्पनेमध्ये बसते आणि घ्यावी असं मत देऊन त्या कथेची निवड केली आणि विचारलं, कोणी लिहिली आहे? तेव्हा सांगितलं, की शोभाने लिहिली आहे. ती कथा जशीच्या तशी घेतली, एकाही शब्दाचा बदल केला नाही. श्रीपुंशी नंतरही आमचे घनिष्ठ संबंध राहिले. तेव्हा ते मला म्हणायचे, की तुम्ही लिहा, चांगलं लिहू शकाल.

तेव्हा मुलं लहान होती, वेळ मिळायचा नाही. पण परदेशातल्या भारतीयांबद्दलचं चुकीचं लेखन पाहून वाईट वाटायचं. एक आई म्हणून मला कधीकधी फार राग यायचा की इथल्या आमच्या मुलांबद्दल तुम्ही असं कसं लिहिता? मग वाटलं की आपणच लिहिलं पाहिजे. मग मी इथल्या अनुभवांवर आधारीत असे एक एक लेख लिहायला सुरुवात केली. ते लेख 'गोठलेल्या वाटा' या पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले.

दिलीप चित्रे : तसं म्हटलं तर हा मोठा शब्द होईल, पण आम्ही ही एक movement च सुरू केली. परदेशी साहित्याबद्दल एक चळवळच सुरु केली. त्यानंतर खूपजण पुढे आले. 'कुंपणापलिकडचे शेत' प्रसिद्ध झालं, तेव्हा 'एकता' मासिकाची सुरुवात झाली होती. मग अजिता काळेंचा कथासंग्रह आला. त्यातही त्यांनी सांगितलं आहे की चित्रेंच्या जुलमी आग्रहाखातर मी आयुष्यातली पहिली कथा लिहिली आणि आज माझा कथासंग्रह प्रसिद्ध होतो आहे. परदेशी साहित्य म्हणजे नुसती गाड्या, मॉल्स, ऐश्वर्य यांची वर्णनं नकोत. तिथे पोहोचेपर्यंत जे कष्ट आहेत ते लोकांना दिसत नाहीत. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. ते म्हणाले परदेशी जाणार्‍या प्रत्येकाला विमानतळावर 'गोठलेल्या वाटा' या पुस्तकाची एक प्रत भेट दिली पाहिजे! १९८७ साली न्यूजर्सीत बीएमएमचं अधिवेशन झालं तेव्हा पुलं आले होते. त्यांनी भाषणात 'गोठलेल्या वाटा'चा उल्लेख केला, तेव्हा इथल्या लोकांना खूप बरं वाटलं, शोभा इथली म्हणून. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

शोभा चित्रे : लिहिणार्‍या प्रत्येकाचाच एक प्रवास होतो. तसा 'गोठलेल्या वाटा'पासून 'गौरी गौरी कुठे आलीस'पर्यंत आहे. 'गोठलेल्या वाटा'मध्ये एक सार्वत्रिक, प्रातिनिधिक अनुभव होता तो मांडला होता. ते लोकांना आपले वाटले. 'गौरी गौरी..'मध्ये माझे वैयक्तिक अनुभव आहेत. 'गौरी गौरी कुठे आलीस' यातला शीर्षकाचा लेख प्रथम 'मौज'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला, त्याला 'सर्वोत्तम ललित लेख' म्हणून 'अनंत काणेकर पुरस्कार' मिळाला होता. 'गौरी गौरी कुठे आलीस'मध्ये माझे जरी वैयक्तिक अनुभव असले, तरी लोकांनी त्यात आपल्या ओळखीचे अनुभव शोधायचा प्रयत्न केला. गौरीचा साधा प्रसंग, पण तो एका वेगळ्याच स्तरावर जातो. गौरीला कुठे आलीस आणि काय पाहतेस विचारल्यावर त्यातून येणार्‍या उत्तरांतून तुमच्या अपेक्षा, हव्यास दिसतो. गौर पळवणारा तो वाघोबा, हव्यासाचा वाघोबा... तो कुठंतरी थांबायला हवा अशा अर्थाने.

गोठलेल्या वाटा आणि गौरी गौरी यांच्यामध्ये माझं एक पुस्तक आलं, 'पानगळीच्या आठवणी'. 'गोठलेल्या वाटा'चं प्रकाशन माझे वडील बघू शकले नाहीत. तो प्रसंग माझ्या दृष्टीने खूप भावनाप्रधान होता. माझे वडील आणि सासरे हे मित्र होते. या प्रकाशनाच्या वेळी सासर्‍यांना अल्झायमर्स झाला होता. ते आले होते, बसले होते, सगळं बघत होते, परंतु त्यांच्यापर्यंत हे काहीच पोहोचत नव्हतं. मी त्यांना मुलीसारखी होते. 'शोभा कोण?' विचारलं, तर 'शोभा माझी मुलगी' असं ते सांगायचे. त्यावेळी या आजाराबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. एक आई, बायको, सून म्हणून या प्रश्नाकडे कसं पहायचं ते सांगावं, पेशंटकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी सामान्यांपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून मी लिहायचं ठरवलं. 'पानगळीच्या आठवणी' हे पूर्ण पुस्तक म्हणजे माझं ठराविक काळापुरतं आत्मनिवेदन आहे. यात सासरे-सून यांचं नातं, कौटुंबिक संघर्ष आहे. त्यामुळे त्याची उंची वेगळी आहे. पुस्तकं वाचून असंख्य लोकांची पत्रं आली. लोक लिहित, की तुमच्या पुस्तकामुळे आम्ही आमच्या परदेशातल्या नातेवाईकांना ओळखू शकलो. पानगळीच्या आठवणी वाचून एकानी लिहिलं होतं, त्याच्या वडिलांना हा त्रास सुरू झाला, तर नातेवाईकांना वाटायचं कोणी करणी केली. मग त्याने हे पुस्तक घेऊन सगळ्यांना वाचायला दिलं. या पुस्तकामुळे या आजाराबद्दल काही जाणीव लोकांना झाली, लोक पेशंटकडे सहानुभूतीने बघू लागले, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

दिलीप चित्रे : माझी मुख्य आवड कवितेची आहे. इथे येण्यापूर्वी काही कविता मी लिहिल्या होत्या आणि नंतरही लिहिल्या. १९८८ मध्ये प्रसिद्ध झालेला 'हिमगंध' हा कवितासंग्रह म्हणजे आधीच्या आणि नंतरच्या कवितेचा प्रवास आहे. इथे आल्यानंतर सुरुवातीला एक 'नॉस्टॅल्जिया' होता, सोडून आल्यानंतरचा... अरे, आपण काय केलं हे ? का सगळं सोडून आलो ? असं वाटत असतं. तेव्हा 'ऐलतीरावर' या ध्वनीमुद्रिकेमधील माझ्या एका कवितेत हे म्हटलंय...

एक झाली चूक आता, लाख होती वेदना
मी दिली सूर्यास माती, काजव्याला वंदना

यात सूर्य आणि काजवा ही प्रतिमा होती. एकदा देश सोडून इथे राहू लागल्यानंतर काही दिवसांनी भावना प्रगल्भ होत जाते. 'पण जायचेच आम्हाला या नव्याच वाटेवरूनी' असा आत्मविश्वास येतो. न्यूजर्सीच्या अधिवेशनाचे स्वागतगीतही मी लिहिले होते,

पूर्व आणि पश्चिमेची पालखी स्कंधावरी
आमुची दिंडी निघाली, जय हरी, जय जय हरी
पालखीला पेलण्या उत्तुंग बळ द्या भास्करा
ख्रिस्त, येशू, शंकरा...

(तेव्हा काही लोकांनी आक्षेप घेतला, 'ख्रिस्त' कशाला? कृष्ण का नाही?' वगैरे... पण यांची वैचारिक प्रगल्भता कुठे जाते असा विचार करताना? नन्स कॉलेजमध्ये अधिवेशन आणि ख्रिस्त नको? धर्म, जातपात कधी सोडणार लोक, कळत नाही.)

'अलिबाबाची हीच गुहा' हे नाटक होतं. जाणीवपूर्वक वेगळा फॉर्म निवडला होता. कथासंग्रह झाला, रेकॉर्ड झाली. गरजेप्रमाणे कथावाचन, काव्यवाचन केलं. इथे मराठी चित्रपट महोत्सव केला. इथल्या फिलाडेल्फियाच्या डॉ. खाडीलकरांनी माझ्या कवितांवर आधारीत 'हिमगंध' याच नावाचा कार्यक्रम तयार केला. फ्लोरिडापासून ओहायो, फिलाडेल्फियापर्यंत १३-१४ कार्यक्रम केले. शब्द आणि सूर या माध्यमांतून कविता लोकांपर्यंत पोहोचवायची अशी त्याची संकल्पना होती. काही कविता मी वाचायचो, ज्या गायल्या जायच्या त्यांची पार्श्वभूमी सांगायचो. तो कार्यक्रम लोकांना आवडला.

मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश
(चित्रे दांपत्याने अनुवाद केलेले हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. मेलडी चेव्हिस यांच्या 'मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सत्तेसाठी संधीसाधू अफगाण लोकांनी रशियाला अफगाणिस्तानात प्रवेश करू दिल्यावर त्यांना हुसकावण्यासाठी अमेरिकनांचा हस्तक्षेप, त्यातून झालेला तालिबानचा उदय आणि या सगळ्या धुमश्चक्रीत अफगाणी जनतेची, विशेषतः स्त्रियांची झालेली परवड... या पार्श्वभूमीवर मीना या तरुण मुलीनं RAWA (रिव्होल्युशनरी असोसिएशन ऑफ द विमेन ऑफ अफगाणिस्तान) ही संस्था स्थापन केली आणि स्वतःचा प्राण धोक्यात घालून स्त्रीमुक्तीसाठी लढा दिला. त्या मीनाची ही कथा आहे.)

दिलीप चित्रे : हे पुस्तक म्हणजे आम्ही दोघांनी मिळून केलेला पहिलाच प्रोजेक्ट... खरं तर दुसरा म्हणायचा! पहिला संसार केला. आता दुसरं काहीतरी जमेल म्हणून हे केलं!

शोभा चित्रे : मला लायब्ररीत हे पुस्तक सापडलं. वाचायला सुरुवात केल्यावर इतकी पकड घेतली. अफगाण बायका कसं जीवन जगत होत्या... त्यात ही तर एक तरुण मुलगी, घरात राजकीय वातावरण वगैरे होतं असंही काही नाही. अगदी साधी मुलगी. हिच्यात एवढी हिंमत कशी आली? पण तिला चांगलं शिक्षण मिळालं. चांगल्या शिक्षकांचा आणि चांगल्या वाचनाचा किती उपयोग होत असतो. खडतर आयुष्यात तिने पेटून उठून काम केलं. बुरखा घालावा लागायचा तर त्याचाच वापर करून त्यांनी काम केलं. ते वाचल्यानंतर मला असं वाटू लागलं की हे पुस्तक मराठीतून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवावं. मी मूळ पुस्तकाच्या लेखिका मेलडी चेव्हिस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही लगेच प्रतिसाद देऊन अनुवादासाठी परवानगी आणि प्रोत्साहन दिलं.

हे पुस्तक भारतातही पोहोचलं आहे. तिथल्या मुस्लिमांना अवेअरनेस आला आहे. पूर्वी सगळे समाज शांतनेने नांदत, आता जो संघर्ष निर्माण झालाय तो वाईट आहे. या पुस्तकाचा त्या दृष्टीने उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.

दिलीप चित्रे : आम्ही दोघंही महाराष्ट्र फाउंडेशनचं काम करतो. आम्ही जातीधर्म मानत नाही. एकदा फाउंडेशनने शबाना आझमीला बोलावलं होतं, तर लोकांनी टीका केली. आम्ही तिला एक नटी किंवा एम. एल. ए. म्हणून नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून बोलावलं होतं. समाजकार्यात आणि साहित्यात जातीधर्म नको. आम्ही दक्षिण भारतात लोकांना मदत केली आहे, तसंच कच्छ, लातूर इथंही केली आहे. फाउंडेशनच्या पोस्टरवर एक कविता आहे, ती माझीच आहे,

चैतन्याची फुलवा झाडे, द्या जगण्याला अर्थ नवा
अडले पडले उचला, ज्यांना आधाराचा हात हवा

आता काही लोक देवधर्मावर पैसे खर्च करतात आणि भिकार्‍याला ठोकरुन पुढे जातात. मग काय उपयोग? तुम्ही देवळात देव बघता, आम्ही लोकांत देव बघतो. रुढी, व्रतंवैकल्य यांत देव नाही. लोक आम्हाला म्हणतात, की तुमची श्रद्धा नाही. पण श्रद्धा कशावर ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

शोभा चित्रे : इथेसुद्धा स्त्रिया हळदीकुंकू करतात. ज्या काळी बायकांना बाहेरचं जग नव्हतं, लहानपणी लग्न व्हायची, माहेरची आठवण यायची, तेव्हा मुलीला एकटं वाटू नये, काही करमणुकीचं साधन, मैत्रिणी मिळवण्याचं साधन म्हणून या रुढी होत्या. आपल्या सगळ्या रुढींना सामाजिक संदर्भ आहेत, धार्मिक नाहीत. आपण आता घराबाहेर पडलोय, कमावतो, करमणुकीची इतर साधनं आहेत. मग हे हळदीकुंकू वगैरे कशाला? इथे चैत्रगौरीचे, नवरात्रीचे इतके हळदीकुंकू समारंभ होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया एकत्र येतात, तर सगळ्यांनी मिळून चांगलं काहीतरी करावं. चॅरिटी सुरू करावी, डोनेशन्स द्यावी. पण असं काही होत नाही याचं वाईट वाटतं.

या रुढी पकडून ठेवण्यामागची कारणं काय असतील याचा विचार केला, तर आपण आपल्या समाजापासून दूर आहोत, त्यातलं काहीतरी इथे जास्त जपायचा प्रयत्न करणं हे एक असावं, असं मला वाटतं. पण या जुन्या चालीरिती जपल्या म्हणजे आपली संस्कृती जपली असं नाही. काही पालकांचा आग्रह असायचा की आपल्या मुलांनी भारतीय मुलांशीच मैत्री करावी. पण असं नको, बाकीचंही कल्चर पहा, अनुभवा. Let them grow. प्रत्येकात चांगलं आणि वाईट असतं, तर जे चांगलं ते पहायला शिका ना. ज्या पालकांनी आपल्या मुलांवर अशी बंधनं घातली त्यांच्याच मुलांनी मग त्यांना हवं तेच केलं. मुलं अनुकरण करतात, त्यांना आपल्या व्हॅल्यूज शिकवाव्यात. बोलणं एक आणि आचरण दुसरं असं नको.

इथल्या मला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे लोकांना कोणतंही काम करायला लाज वाटत नाही. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना नाहीत. कष्ट करण्याची सवय आणि तयारी या गोष्टी खरंच कौतुक करण्यासारख्या आहेत. कुठे संकट आलं तर भरभरून मदत करतील. डोनेशन्स देतील. चर्चचं प्रस्थ बरंच आहे, पण त्यांच्यामार्फत दानधर्मही बराच चालतो. प्रत्येक चर्च काही ना काही करतेच.

दिलीप चित्रे : या देशालाही इतिहास आहे, स्वातंत्र्याची वर्षं जास्त आहेत. इथे सगळं जतन करण्याची धडपड असते. आर्टचं ऍप्रिशिएशन जास्त आहे. युरोपात आणि इथेही म्युझियम्स, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं इत्यादी बघून वेड लागतं. आपली संस्कृती तर इतकी जुनी आहे! मी एक आर्किटेक्ट म्हणून काम करतो, म्हणून मला जाणवतं. इथे ऐतिहासिक वास्तूंच जतन फार चांगल्या पद्धतीनं होतं. जुन्या वास्तूंचं जतन करणे वगैरे गोष्टी भारतात फार कमी, या गोष्टींची किंमतच नाही. इथली कला, चित्रपट, त्यांचं तंत्र हे सगळंही खूप आवडतं. खूप रिऍलिस्टिक चित्रपट असतात. पण या देशातही धर्माचं राजकारण चालतं, ते नाही आवडत.

सॅन फ्रॅन्सिस्कोचे साहित्य संमेलन

दिलीप चित्रे : पुढल्या वर्षीचं सॅन फ्रॅन्सिस्कोमधलं साहित्य संमेलन... आम्ही याबद्दलचं आमचं निवेदन 'लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध केलं होतं. त्यावरून इथे आणि भारतातही चर्चा झाली. आता याला ते 'साहित्य संमेलन' म्हणत नाहीत! पण बंड्या म्हणा किंवा बाळ्या, पोर तेच आहे! त्यांच्याकडे पैसा आहे, सक्सेसफुल करतीलही, पण उद्देश काय आहे? मराठी ग्लोबल व्हावी? पुढच्या पिढीला मराठीबद्दल आस्था निर्माण व्हावी? अरे, पाच नवीन मराठी पुस्तकांची नावं सांगा आधी, पाच लेखक आणि कवी, येतील सांगता? म्हणजे कुसुमाग्रज, पाडगांवकर, बापट नकोत. हल्लीचे सांगा! तुम्हालाच जर नाही सांगता आले तर पुढच्या पिढीचे काय घेऊन बसलात! आणि हे एकदाच करुन काय उपयोग? सतत करत राहणार असाल तर माझा पाठिंबा आहे. भारतात पाच-सहा लाख लोक येतात. कित्येक कोटी रुपयांची पुस्तकांची खरेदी होते. त्या गावाची पूर्ण अर्थव्यवस्थाच बदलते त्या काळापुरती. इथे किती लोक येणार, सत्तर? पुन्हा पुढच्या वर्षी बीएमएमचं अधिवेशन आहेच ना, मग लोक दोन-दोन वेळा येणार का? मी ही कल्पना मांडली होती की बीएमएममध्येच का नाही ठेवत अर्धा-एक दिवस साहित्यासाठी? आणि हे आत्ताच नाही, मी पूर्वीपासून सांगत आलोय. तशा पुस्तकपंढर्‍या मी केल्या होत्या. १९९३ साली पुस्तकपंढरीमध्ये खूप पुस्तकांची विक्री झाली. अमेरिकेत एवढ्या प्रमाणात मराठी पुस्तकं पहिल्यांदाच विकली गेली. आता ही पुस्तकपंढरी ते व्यावसायिक करतात. तिथे काही प्रकाशक येतात, पण प्रकाशक संघाशी संपर्क साधा. त्यांचा एक प्रतिनिधी बाकी प्रकाशकांशी संपर्क साधेल. जुनं, नवं, अध्यात्मिक, ग्रामीण, दलित, परदेशी सगळ्या प्रकारचं साहित्य पाहिजे. एकच प्रकाशक नको.

'कुंपणापलिकडचे शेत'चा प्रकाशन समारंभ मी केला. I projected that as 'साहित्यसोहळा'. त्यावेळी व्यंकटेश माडगूळकर, सुभाष भेंडे, लाटकर, मधुकाका कुलकर्णी, पाडगांवकर हे सगळे माझ्या घरी होते. माडगूळकरांचे कथाकथन, पाडगांवकरांचे काव्यवाचन असे चार-पाच ठिकाणी कार्यक्रम केले. तेव्हा सांगितलं होतं, येताना एक बॅग पुस्तकांनी भरून आणायची. तरच यायचं. तेव्हा चिकार पुस्तकं आली... तेव्हा आतासारखं रिस्ट्रिक्शन नव्हतं.

****

सध्या लेखनाच्या अनेक नवीन प्रकल्पाच्या कल्पना चित्रे दांपत्याच्या मनात आहेत. वाचन चालूच आहे. इन्डियन अमेरिकन्सपैकी रोहिंटन मिस्त्रीचं लेखन दिलीप चित्रेंना आवडतं. शोभा चित्रेंना झुंपा लाहिरीचं लेखन आवडतं. त्यांनी नुकतंच तिचं 'अनऍकस्टम्ड अर्थ' वाचून संपवलं आहे. मराठीमध्ये सध्या विनया खडपेकरांचं 'ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर' वाचत आहेत. नोव्हेंबरमध्ये पर्यटनासाठी म्हणून इजिप्तला जात आहेत. 'फक्त पर्यटनासाठी जात आहोत, लेखनाचा विचार नाही' असं त्यांनी स्पष्ट केलं असलं, तरी नवीन लेखनप्रकल्पासाठी स्फूर्ती देणारी ती सहल व्हावी, अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही.

लेखन प्रकार: 

दिवाळी संवाद - श्रीधर फडके

दिवाळी संवाद : श्रीधर फडके
मुलाखतकार : प्रणव मायदेव

मराठी सुगम संगीतात आपल्या प्रतिभेने रसिकांचे मन जिंकलेल्या, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके, यांच्याशी गप्पा मारण्याचा अत्यंत मनोहारी योग काही महिन्यांपूर्वी आला. त्यांच्या सुरेल गायनाची व त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गाण्यांची ओळख नसलेला मराठी माणूस विरळाच. त्यांच्या कोणाही चाहत्याला 'फडके घराण्याचा वरदहस्त लाभलेल्या या अतिशय गुणी कलाकाराला प्रत्यक्ष भेटायला मिळणे' यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असणार? गेल्या दोन वर्षात आवर्जून त्यांचे "ऋतू हिरवा" आणि "बाबूजींची गाणी" हे कार्यक्रम प्रत्यक्ष बघितले होतेच. पण या भेटीत श्रीधरजींच्या अतिशय साध्या व प्रेमळ स्वभावाने त्यांच्याविषयीचा आदर दुणावला आणि त्यांनी माझं मन गाण्यांशिवायही पुन्हा एकदा जिंकून घेतलं. श्रीधरजींबरोबर झालेल्या या अनौपचारिक गप्पा मायबोलीकरांसमोर ठेवताना आनंद होत आहे.

प्रणव: सर्वप्रथम तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमची गाण्याची आवड कधीपासूनची?
श्रीधरजी: तसं बघितलं, तर शाळेत असताना मला संगीताची फारशी आवड नव्हती. पण तेव्हाही शिकलो नसलो, तरी थोडीफार पेटी वाजवायला आवडायची. तबलाही वाजवत असे. कॉलेजमधे गेल्यावर मला आणखी आवड निर्माण झाली. बाबूजींची रेकॉर्डिंग्ज असायची, तेव्हा त्या रेकॉर्डिंग्जना मी बर्‍याच वेळा त्यांच्याबरोबर जायचो. मग ते रेकॉर्डिंग कसं चाललंय हे बघून, त्याचा अभ्यास करत, नकळत मनावर संस्कार होत गेले. पूर्वी स्पूल्स असायची - ज्याला रील टू रील म्हणतात - त्यावर गाणं रेकॉर्ड करायचं, मोठ्या टेपरेकॉर्डरवर ते लावून ऐकायचं, असं करत करत हळूहळू आवड निर्माण झाली.

प्रणव: घरी बाबूजी, म्हणजे सगळं वातावरण संगीतमय असणार. शिवाय तुमच्या आई, ललिता फडके, यादेखील सुप्रसिद्ध गायिका. मग या क्षेत्रात काम करायला तुम्हाला स्वतःला आवडेल हे कधी कळलं?
श्रीधरजी: खरं तर मी संगीतात काम करायला, म्हणजे व्यवसाय या अर्थी, कधी घेतलंच नाही. तरी देखील मला चाली तयार करण्याची आवड निर्माण झाली. आणि आवडीमुळे असो किंवा व्यवसाय म्हणून असो, एकदा आपण त्यात पडलो की हळूहळू शिकायला लागतो. मग चाली बांधता बांधता वेगवेगळ्या कविता बघायच्या; किंवा कधी आधी चाली बांधून मग त्यावर कविता लिहून घ्यायच्या असा हा सगळा प्रवास सुरु झालेला आहे.

प्रणव: तुम्ही कंप्यूटर सायन्सचे विद्यार्थी, बरोबर? मग या दरम्यान तुम्ही गाण्याकडे कसे काय वळलात?
श्रीधरजी: हो, मी इथे अमेरिकेत शिक्षणासंदर्भात आलो असताना, कॅम्लिनच्या मालती दांडेकरांनी मला एका अभंगाला चाल लावायला सांगितली होती. त्याआधी मी आणि माझा मित्र उदय चित्रे, असं दोघांनी मिळून भारतात असताना रेकॉर्डिंग केलं होतं. ते आम्ही EP (Extrended Play) मधे केलं होतं. पण इथे शिकत असताना बसवलेला अभंग म्हणजे माझं स्वत:चं असं पहिलं रेकॉर्डिंग. तो अभंग म्हणजे 'देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' हा, जो मी १९७४ च्या जून-ऑगस्टच्या सुमारास संगीतबद्ध केला. म्हणजे आता यालासुद्धा ३४ वर्षं झाली बघा.

प्रणव: संगीताचं औपचारिक शिक्षण न घेतासुद्धा तुम्ही तुमच्या गाण्यांमधे शास्त्रीय संगीताचा इतका सुरेख वापर करता. ते कसं जमवलंत?
श्रीधरजी: एकदा आवड निर्माण झाली की आपण त्यावर विचार करायला लागतो. आता बाबूजी गायचे तेव्हा ते यमन, मालकंस, भीमपलास, किंवा तोडी, भैरवी असे वेगवेगळे राग गायचे. ऐकून ऐकून भैरवी म्हणजे नेमकं काय आहे हे आपोआप कळू लागलं. म्हणजे जरी मी ते शिक्षण एखाद्या गुरुकडे जाऊन, तिथे बसून घेतलं नसलं, तरी मी ते स्वतःहून शिकत गेलो. माझे काही संगीतक्षेत्रातील मित्र आहेत, जे वादक आहेत. त्यांना विचारायचं की, 'अरे हा मालकंस आहे ना, मग याचा जरा आरोह अवरोह दाखव." आणि मग ते वाजवतील ते लक्षात ठेवायचं आणि नंतर त्या रागाचं चलन बघून त्याच्यावर चाल बांधायची.

प्रणव: शुद्ध शास्त्रीय रागदारीवर आधारित अशीही गाणी बसवलीत का?
श्रीधरजी: हो, बसवलीत ना. आता बघा, शुद्ध शास्त्रीय म्हणजे एकही स्वर बाहेरचा लागता कामा नये. असं माझ्या संगीतात फारसं झालेलं नाहीये; नाहीच म्हणा. परंतु तो राग आधार धरुन गाणं बांधणं आणि एखादा स्वर वेगळा बांधणं हे स्वातंत्र्य सुगम संगीतात घेता येतं. तसं केल्यामुळे गाण्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे. गाणं ऐकताना मधेच एखादा स्वर ऐकून, "अरे वा! हा कोणता वेगळा स्वर आहे! त्या रागात नाहीये, पण त्यामुळे ते ऐकायला कसं गोड वाटतं!" असं वाटणं हे महत्त्वाचं आहे. जसं माझं 'ॐकार स्वरूपा' बैरागी भैरव मधे आहे. 'सांज ये गोकुळी' यमन कल्याण आणि पूर्वा कल्याण या दोघांचं मिश्रण आहे. म्हणजे यमन मधे शुद्ध रिषभ लागतो तर यात कोमल रिषभ लागतो. नंतर 'ऋतू हिरवा' चारुकेशी मधे आहे. 'घनरानी' हे पूर्ण तिलंग मधे नसलं तरी तिलंग वर आधारित आहे. अशी अनेक गाणी आहेत. आता 'मी राधिका' हे आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेलं गाणं मधुकंस मधे आहे. पण त्यात मधेच एखादा स्वर मधुवंती मधे आहे तसाही लागतो. असा वेगळा स्वर लागल्यामुळे त्या गाण्यात काहीतरी वेगळं, खास असं वाटलं पाहिजे. 'त्या कोवळ्या फुलांचा' शिवरंजनी मधे किंवा, 'विठ्ठल नामाचा रे टाहो' मालकंस मधे आहे.

'दे साद दे ह्रदया' मधे मला बिलासखानी तोडीमधे आणि झपतालात काहीतरी करायची इच्छा होती. तर काय करावं या विचारात मी आरतीला विचारलं की त्या रागाचं चलन काय आहे. मला साधारण माहीत होतं, आणि त्यावर विचार करुन मग ती चाल सुचली.

प्रणव: आपण चालींविषयी बोलतो आहोत, तर मला विचारायचं होतं, की एखादी चाल कशी सुचते हो? म्हणजे गाणं हजारो वेळा ऐकूनही ज्याची गोडी संपत नाही, अशी चाल परफेक्शन पर्यंत कशी पोचते?
श्रीधरजी: कुठलंही गाणं किंवा एखादी कविता असो, जिला चाल लावायची आहे, ती निवडल्यावर प्रथम हा विचार करावा लागतो की त्या कवितेतून काय सांगायचं आहे. कधीकधी त्या शब्दांमधूनच पटकन चाल सुचते तर कधी हळूहळू चाल तयार होत जाते. 'ॐकार स्वरुपा' ही जी कॅसेट आहे त्यामधे एक अभंग आहे, 'माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद'. तर या अभंगाला चाल लावताना माझ्या मनात होतं की आपण याला वेगळा ताल वापरावा, म्हणजे दादरा. आणि त्याच्यामधे बंगाली वाद्यं वापरावीत, जी बाऊलगीतांमधे वापरतात. त्यात बंगाली एकतारा असतो आणि खोळ असतो. म्हणजे नाल. बारिक तोंड असलेल्या मृदुंगासारखं हे वाद्यही वापरायचं मनात होतं. पण हे वापरायचं तर चाल देखील तशाच प्रकारची यायला पाहिजे. मग हे सगळं माझ्याच मनाप्रमाणे केलं आणि तिलक कामोदच्याच प्रकारातल्या एका रागात ती चाल बसवायच्या नादात अचानक मला मुखड्याची चालही सुचली. ती अशी -

प्रणव: वा, सुरेख! मग अशी एखादी चाल डोक्यात घुमत असेल आणि पूर्णत्वास जात नसेल, तर त्रास होतो का?
श्रीधरजी: होतो तर! मुखडा झालाय आणि अंतरा होत नाहीये असं होतं कधी सहा-सहा महिने! किंवा आधी चाल सुचली आणि मग मागाहून शब्द लिहिले असंही अनेकवेळा झालेलं आहे. जसं माझ्या डोक्यात एक चाल होती जी मी शांताबाईंना ऐकवली. (गुणगुणून दाखवत) आणि त्यांनी त्यावर 'गगना गंध आला' हे सुरेख गाणं नंतर लिहून दिलं.

प्रणव: बाबूजी म्हणजे मराठी संगीतविश्वातला एक अढळ तारा. त्यांची एवढी मोठी कारकीर्द. बाबूजी, पुलं, अशी दोन चार नावं आपलं मराठी विश्व define करतात. तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला कधी असा दबाव जाणवला का, की आपली वेगळी ओळख निर्माण करावी, किंवा आपली वेगळी, स्वतंत्र स्टाईल असावी?
श्रीधरजी (हसत): नाही, असा दबाव कधी नाही आला. कारण मी असं ठरवलं कुठे होतं, की मला काही स्वतःचं वेगळं करायचं आहे म्हणून! ते होत गेलं! जर तुम्ही काही ठरवलं की मला हे पाहिजे, मला हे असं साध्य करायचं आहे, तर ते वेगळं. प्रयत्न तर कुठल्याही कामासाठी करावेच लागतात. पण माझ्या बाबतीत ते ठरवून न केल्यामुळे आपोआप होत गेलं. नंतर लक्षात आलं जेव्हा लोक म्हणायला लागले की श्रीधरची गाणी जरा वेगळी आहेत. आणि बाबूजींनाही ते आवडलं. अगदी मागे, सुरुवातीला, मी त्यांना एकदा विचारलं होतं की मी इथे अडलोय, तर तुम्ही मला काही सुचवा, काय करु ते सांगा. ते त्यांनी मला तेव्हा सांगितलं. पण नंतर ते म्हणाले की नाही, मी तुला सांगणार नाही. मी सांगितलं तर ती तुझी चाल राहणार नाही. त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवलं. हे फार महत्त्वाचं आहे. कुठेही ते माझ्यासाठी बोलले नाहीत. अगदी पहिला चित्रपटही, केवळ दिग्दर्शकांना माझी चाल आवडली होती, म्हणून बाबूजी म्हणाले की याला द्या. आणि मग लोकांना गाणी आवडत गेली. आता ज्याअर्थी लोकांना ती गाणी आवडली असावी केवळ म्हणूनच मी आज तुमच्यापुढे आहे.

प्रणव: बाबूजींनी संगीताला आपली कारकीर्द बनवून सगळ्या आयुष्यभर त्याची साधना केली. आपण संगीतासाठी स्वतःला वाहून घेणं आणि केवळ आवड म्हणून संगीत करणं यामधे काही फरक आहे का?
श्रीधरजी: आहे ना! आता संगीताला वाहून घेणं म्हणजे तो तुमचा व्यवसाय होतो. आणि मग व्यवसायात कधी 'अरे ही चाल अशी नाही, तशी करा' वगैरे अशी काही बंधनं येऊ शकतात. कदाचित आपल्याला आवडलेली चाल दिग्दर्शकाला आवडली नाही असं होऊ शकतं. अर्थात बाबूजी तसं करत नसत. कधी त्यांना पटलं, की दिग्दर्शकाचं म्हणणंही बरोबर आहे, तर ते चाल बदलायचे पण अन्यथा नाही. पण तरीही सिनेमामधे असं होऊ शकतं. माझ्या बाबतीतही असं बरेचदा झालंय की मी जी चाल बांधली, ती जशीच्या तशी आवडली आहे. पण कुठल्याही व्यवसायात असतात तशी व्यवसायाची बंधनं तिथे येतात. जर आवड म्हणूनच करायचं असेल तर मात्र तशी बंधनं येत नाहीत; तेव्हा तो आपला मुक्तछंद असतो.

प्रणव: दोन वर्षांपूर्वी पुण्यात तुमचा 'बाबूजींची गाणी' हा कार्यक्रम अफाट गर्दीत कुठेतरी दूर बसून मी ऐकला होता...
श्रीधरजी: तो ठीक झाला होता कार्यक्रम? कारण बाबूजींची गाणी म्हणणं हे अतिशय कठीण आहे. तसं कोणाचीही.. पण माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांची गाणी म्हणणं अवघड आहे. कारण त्यांच्या गाण्यात लयीचा जो अंदाज असतो तो आला नाही, तर मग ते गाणं गेलं. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

प्रणव: कार्यक्रम अतिशय सुरेख झाला होता. 'बाबूजींची गाणी', 'ऋतू हिरवा' या सारखे इतरही काही कार्यक्रम करता का?
श्रीधरजी: 'ॐकार स्वरूपा' म्हणून एक आहे. त्यात फक्त अभंग, भक्तिगीतं म्हणतो. पूर्वीच्या संतांच्या आणि आत्ताच्या नवीन कवींच्या देखील, ज्यात भक्तिरस असेल, अशा प्रकारच्या रचना त्यात सादर करतो.

प्रणव: बाबूजी आणि गदिमा यांनी एकत्र मिळून 'गीतरामायणाचा' आविष्कार घडवला. तसं काही करण्याचा तुमचा मानस?
श्रीधरजी: गीतरामायण म्हणजे विस्तृत रामकथाच आहे. प्रत्येक प्रसंगाला एकेक गीत आहे आणि अशा ५६ गीतांमधे ते बसवलेलं आहे. तसं मी काही करत नाहीये, आणि करूही शकणार नाही. कारण 'गीतरामायण' हे एकदाच होतं. गदिमा आणि बाबूजी या दोघांच्या हातून हे जे एवढं मोठं कार्य झालेलं आहे, ते अद्वितीय आहे. ते तसं परत कोणी करायचं म्हणून करायला गेलं तर होत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. गदिमा आणि बाबूजी दोघेही प्रतिभावान. गीतरामायण अजरामर व्हावं अशी विलक्षण त्यांची कामगिरी आहे. कुठल्या तरी अज्ञात शक्तीनी ते त्यांच्याकडून करवून घेतलं अशी त्यांची धारणा होती. परंतु मला वाटतं की त्या अज्ञात शक्तीलाही माहीत असणार की हे दोघे तेवढे प्रतिभावान आहेत, त्यांच्याचकडून हे काम करवून घ्यायला पाहिजे म्हणून!

गीतरामायणाचे प्रयोग मी आत्ता दोन तीन वर्षापूर्वीच सुरु केले. इतके दिवस मी गाणार नाही म्हणत होतो, कारण मला धीर होत नव्हता. अभ्यास केल्याशिवाय करायचं नाही हे नक्की होतं. जेव्हा सुवर्णमहोत्सव सुरु झाला तेव्हा मी माझ्या आईला विचारलं. ती म्हणाली की हरकत नाही. मी तिला म्हटलं की माझ्या कानावर जे संस्कार झालेत, जे मी ऐकलंय ते बरोबर आहे की नाही ते बघ. मग तिने ऐकवलं की हे असं गा. बाबूजी कार्यक्रमात कसे गायचे, त्यांचे उच्चार कसे असत हे सगळं तिने सांगितलं.

प्रणव: बाबूजींना आपल्यातून जाऊन सहा वर्षं झाली जुलै मधे. तुम्ही सगळ्यात जास्त त्यांना कसं मिस करता?
श्रीधरजी: त्यांचा सहवास. कुठेतरी असं वाटतं की ते आहेत, बघतायत आपल्याकडे. काही काम करत असतांना त्यांची आठवण आली की मग गलबलून जायला होतं. समाजसेवा आणि राष्ट्रसेवा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. नुसतंच संगीत किंवा गायन असं नव्हतं. त्यामुळे त्यांचं जीवन मल्टीफोल्ड म्हणतात तसं होतं. त्यांच्या कामामधे वैविध्य होतं. सामाजिक कामांमधे पण ते स्वतःला झोकून द्यायचे. सावरकरांवरचा चित्रपट हा त्याचाच भाग. ते गेल्याचं वाईट वाटतंय अर्थात.

प्रणव: एखादी नवीन सीडी काढायचा विचार?
श्रीधरजी: हो, आता आशाबाईंबरोबर एक सीडी करत आहे. म्हणजे रेकॉर्डिंग्ज अजून सुरू व्हायची आहेत पण बाकीचं काम सुरु आहे. ध्वनिमुद्रण नोव्हेंबर-डिसेंबर मधे सुरु व्हावे असे वाटते. त्या सीडीचं नाव अजून ठरलं नाही, पण त्यात गदिमा, शांताबाई, ग्रेस, इंदिरा संत, शिरीष गोपाळ देशपांडे, निधी नाखवे, अरूणा ढेरे वगैरेंच्या रचना आहेत.

शिवाय एक पूर्ण सीडी समर्थ रामदासांवर करतो आहे, सज्जनगडाच्या संस्थानातर्फेच आहे ते. त्याचं काम तेरा ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यात सुरेश वाडकर, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, आरती अंकलीकर-टिकेकर, संजीव चिमलगी, मंजुषा पाटील, अमृता सुभाष, विद्या करलगीकर, आणि अजय-अतुल हे जे नवीन संगीतकार आलेत, त्यांच्यातले अजय असे सगळे गातायत. समर्थांच्या रचनांमधे इतकं विलक्षण वैविध्य आहे - सगळ्याच संतांच्या अभंगामधे ते असतं - त्यामुळे हे काम करताना फार मजा येत आहे. वीस नोव्हेंबरला पुण्यामधे संत संमेलन आहे. तेव्हा ही सीडी प्रकाशित करावी असा आमचा विचार आहे.

तल्लीन गोविंदे या कॅसेट मधला हा एक अभंग.

समर्थांवर एक चित्रपटही येत आहे; आणि त्याचंही संगीत मी करत आहे. त्याशिवाय आणखी एक भावगीतांची सीडी करायची इच्छा आहे.

प्रणव: आशाताईंचा उल्लेख केलात.. आशाताई आणि बाबूजी हे काँबिनेशन म्हणजे मराठी माणसाचा वीक पॉईंट! तुमचे असे बरोबर काम केलेले एखादे आवडते गायक किंवा गायिका?
श्रीधरजी: वाडकरांबरोबरची माझी काही गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत...

प्रणव: आणि असं एखादं नाव की ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल पण तशी संधी आली नाहीये?
श्रीधरजी (हसत): लताबाई?! पण आता काय आणि कसं होईल ते माहीत नाही. आता बघा, आपल्याला पारितोषिक मिळतं, तेव्हा त्याचा आनंद कोणालाही असतोच. तो आपला बहुमान असतो. मुंबई दूरदर्शनची जी सह्याद्री वाहिनी आहे, ते दरवर्षी नवरत्न पुरस्कार देतात. नऊ जणांना हा पुरस्कार दिला जातो. २००४/२००५ मधे त्यातला संगीताचा पुरस्कार मला मिळाला होता. तेव्हा लताबाई तिथे उपस्थित होत्या. त्यांनी भाषणात सांगितलं की 'मी फडके साहेबांची गाणी खूप गायले. (आशाबाई आणि लताबाई 'फडके साहेब' म्हणतात, बाबूजी नाही!) मला त्यांची गाणी आवडतात. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मला श्रीधरचं एखादं गाणं मिळावं! मला त्याचंही संगीत आवडतं'. लताबाई म्हणाल्या की ते कसं होईल ते मला माहीत नाही पण मला आवडेल. आता ही जी पावती आहे, ती कुठल्याही संगीतकाराला वाटेल तशी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. लताबाईंनी - म्हणजे प्रत्यक्ष जी सरस्वती - त्यांनी असं म्हणणं हा मला फार मोठा बहुमान वाटतो.

प्रणव: अरे वा! अशी गाणी आम्हाला रसिकांनाही लवकर ऐकायला मिळोत अशी मी आशा करतो. कारण हे काँबिनेशनही तितकंच सुरेख होईल याची मला खात्री आहे.
तुम्ही हिंदी गाण्यांना किंवा चित्रपटांसाठी कधी संगीत दिलंत का?

श्रीधरजी: हिंदीमधे 'सुराज' म्हणून चित्रपट होता. आर्ट फिल्म होती ती. त्यासाठी एक गाणं दिलं होतं. बाकी पुढे नाही केलं कारण हिंदीसाठी म्हणजे तुम्ही त्यात फुल टाईम पाहिजे. ते विश्व वेगळं आहे.

प्रणव: तुम्ही वेस्टर्न म्युझिक ऐकता का? आणि कशा प्रकारचं ऐकता?
श्रीधरजी: हो. खरं सांगू का, वेस्टर्न आणि ईस्टर्न, म्हणजे त्यांची जी पद्धती आहे - मेलडी आणि हार्मनी - तर ती आणि आपल्या पद्धतीमधे जे स्वर आहेत ते सारखेच. मांडणी, सादरीकरण हे सगळं थोडं वेगळं आहे. कॉर्ड सिस्टम थोडी वेगळी आहे. आता आपल्याकडे जे चाललंय ते मला, म्हणजे माझ्या वयाच्या पिढीला, फार पसंत पडत नाही. कारण सगळ्याच गाण्यांमधे असा रिदम येऊन चालत नाही. हल्ली सगळी गाणी आता तशी यायला लागली आहेत. एखाद दोन गाण्यात तो आनंद वाटतो, पण तेच तेच झाल्यावर त्यातली मजा जाते. मूळ चाल आणि शब्द हे सगळ्यात महत्त्वाचे. मुलगी सुंदर असली की मग तिला काहीही पेहराव केला तर ती जास्त सुंदर दिसते, पण ती मुळात सुंदर पाहिजे तसं आहे ते.

संगीत मी सगळ्या प्रकारचं ऐकतो. मला इथलं कंट्री म्युझिक फार आवडतं. आमच्या वेळी ग्लेन कँपबेल म्हणून होते; त्यांचं 'Like a Rhinestone Cowboy' म्हणून फार गाजलेलं गाणं आहे. १९७५ सालचं हे गाणं आहे - तुम्हाला माहीत असेल. ते एक आठवतंय. कंट्री म्युझिक मधे कसं असतं की बँजो असतो आणि सोलो व्हायोलिन, म्हणजे एकच व्हायोलिन असतं. पण ते फार काहीतरी वेगळं असतं. ते टॅपवरती करतात ते फार आवडतं. नंतर मला पोल्का म्हणजे ईस्ट युरोपिअन संगीत खूप आवडतं. अरेबिक छान असतं. शेवटी संगीत हे संगीत आहे. ते कानांना जोपर्यंत गोड वाटतं तोपर्यंत ते आवडतं.

प्रणव: माझा एक आवडता व्हिडीयो आहे. बाबूजी आणि आशाताईंच्या 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याच्या लाईव्ह रेकॉर्डिंगचा. तो बघताना आपल्याला सगळा वाद्यवृंद वाजवताना दिसतो, आशाताई लाईव्ह गाताना दिसतात आणि हे सगळं प्रत्यक्ष साकारतानाचे बाबूजींच्या चेहर्‍यावरचे भाव बघायला मिळतात. तर आजच्या काळात हे असं शक्य होतं का?
श्रीधरजी: नाही होत. पूर्वी कसे मोठे स्टुडियो असायचे. एका स्टुडियोमधे २५-४० लोक बसतील एवढे ते मोठे असायचे. मधे गॅप्स म्हणजे पार्टीशन्स असायची साऊंड सेपरेशनसाठी. याशिवाय ते उंचही असायचे कारण sound ambience महत्त्वाचा असायचा. तो नैसर्गिक असणं केव्हाही चांगलं. जरी खूप वेळ लागत असला तरी, सगळ्यांनी एकत्र येऊन गाणं बनवणं हेच चांगलं असं मला वाटतं. आता तसं होत नाही. बेसिक ट्रॅक करायचा झाला तरी तो टक-टक-टक-टक क्लिक वर जसा ताल असेल तसा करायचा. आणि मग एक जण येऊन स्पॅनिश वाजवतो. मग दुसरा तबला वाजवतो आणि मग तिसरा येऊन ढोलक वाजवेल. असं करत करत ते चालतं. कारण एवढ्याश्याच खोलीत हे सगळं रेकॉर्डिंग चालतं. त्यामुळे सगळं एकत्र न होता तुकड्या-तुकड्यानी होत जातं. आणि मग कोणी चुकला तर मग परत त्या जागेपासून वाजवा. म्हणजे तुम्हाला जी उर्मी असते, स्वतःला वाटत असतं की नाही, मला बरोबर वाजवायला पाहिजे ती उर्मी रहात नाही. वाजवणारे वाजवतात उत्तम, सगळं लिहून घेतात... आजकालच्या काळात सगळं बार टू बार लिहिलेलं असतं. बार म्हणजे मात्रांचे. त्यात सगळे बदल लिहून घेतलेले असतात. पण अशी सगळी तयारी असूनही पूर्ण गाणं पूर्वीसारखं लाईव्ह असं तयार होत नाही.

वाद्यांबद्दल बोलायचं झालं तर हल्ली फार इलेक्ट्रॉनिक्स त्यात आलंय. एका ठराविक मर्यादेपर्यंतच ते वापरलं तर ठीक आहे असं मला वाटतं. सगळीकडे ते वापरलं तर मग ते सिंथेटिक वाटायला लागतं. नैसर्गिक ध्वनी निर्माण करणारी जी वाद्यं आहेत, आपली सतार, बासरी किंवा अगदी पाश्चिमात्य म्हटली तर व्हायोलिन्स, पियानो, पिकोलो, सॅक्सोफोन, की फ्ल्यूट, ट्रंपेट वगैरे - त्यांची मजा वेगळीच. ही सगळी नैसर्गिक वाद्यं आहेत, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक काही नाही. आता सगळंच सिंथेसायजरने होत असल्यामुळे तो जो मूळ व्हायोलिनचा टोन, तो तुम्हाला काही म्हटलं तरी मिळतच नाही. दहा-पंधरा व्हायोलिन्स एकदम वाजवण्यात जो ग्रँजर येतो तो सिंथेसायजरने नाही मिळत.

प्रणव: अशा वेळेस मग तुम्ही काय करता?
श्रीधरजी: कधी कधी तडजोड करावी लागते. आता त्यांना किती खर्च करायचा आहे त्याप्रमाणे आहे. काही जणं असतात जी म्हणतात की तुम्ही वापरा. मग आम्ही जेवढी बसतील तेवढी व्हायोलिन्स वापरुन ती दोन तीन वेळा रेकॉर्ड करुन गाण्यात वापरतो.

प्रणव: हल्ली टीव्ही वर जे 'सारेगमप' सारखे कार्यक्रम येतात, ते तुम्ही बघता का? आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
श्रीधरजी (हसतात): काय आहे की कार्यक्रम हा स्तुत्य आहे. त्याच्यातून नवीन गायक मिळतात. चांगल्या तरुण मुलामुलींना त्यातून संधी मिळते. मला एवढंच वाटतं की त्यांनी जे विजेते निवडावेत ते परिक्षकांच्या माध्यमातून निवडावेत, SMS ने नव्हे. आणखी एक मला असं वाटतं की जो कोणी त्यातून निवडला जाईल, उत्तम गायक किंवा गायिका, त्यांना त्यांनी शिष्यवृत्ती द्यावी. आणि चांगल्या गुरुकडे पाच वर्षं शिकायला पाठवावं. इतर काहीतरी पारितोषिकं देण्यापेक्षा तुम्हाला चांगला गायक व्हायचं आहे ना? मग त्यांना पाच वर्षं, दहा वर्षं क्लासिकल शिकू देत. जेणेकरुन ते उत्तम शिक्षण घेऊन जास्त तयार होतील, अधिक पुढे येऊ शकतील. हे माझं मत आहे.

प्रणव: तुम्हाला आवडेल अशा कार्यक्रमांना परिक्षक म्हणून काम करायला?
श्रीधरजी: मी मागे केलं होतं, आणि मला आवडेल. नुकताच मी परिक्षक म्हणून गेलोही होतो.

प्रणव: नवीन पिढीला संगीत शिकवण्याचा पुढेमागे काही विचार?
श्रीधरजी: शिकवणं हा तर मोठा शब्द झाला पण मला जे काही माहीत आहे ते सांगायला मला आवडेल. तसा विचार आहे. बघू कधी होतंय ते.

प्रणव: नवीन पिढीचा विषय निघालाय तर तुमच्या घरी पुढच्या पिढीला संगीताची आवड आहे का?
श्रीधरजी: मोठी स्वप्ना आणि धाकटी प्रज्ञा. मी कधी मुद्दाम त्यांना शिकवलं नाही. पण त्यांनी स्वतःहून आवड दाखवली तर माझा पूर्ण पाठिंबा आहे.

प्रणव: सध्याच्या प्रोजेक्टस व्यतिरिक्त काही आवडी?
श्रीधरजी: आहेत ना. सध्या मी शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा अभ्यास करतोय. मला अनेक हिंदी संगीतकार आवडतात. त्यात हे माझे खूप आवडते. या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाण्यात खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमधे कोणी, कशी गाणी केली याचा अभ्यास करतो. लताबाईंना भेटलो, आशाबाईंना भेटलो, ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं अशा इतर बर्‍याच जणांशी बोललो. खूप माहिती मिळाली.

प्रणव: गातांना किंवा रियाज करताना खाण्यापिण्याची काही पथ्य असतात का?
श्रीधरजी: हो. मी शक्यतो कार्यक्रमाच्या आधी पोट जड ठेवत नाही. नाहीतर त्रास होतो. आणि हळदीचं गरम दूध थोडंसं घ्यायचं. बाबूजी रियाज करायचे तेव्हा खर्जापर्यंतचे आपले सगळे स्वर - अ आ इ ई उ ऊ - हे गायचे प्रत्येक वेळी. म्हणजे सा रे ग म असं खालपासून वरपर्यंत आणि श्वासासाठी म्हणून असे वेगळे.

प्रणव: श्रीधरजी, आता थोडे प्रश्न रॅपिड फायर म्हणतात ना, जरा तशा पद्धतीचे...?
श्रीधरजी: (हसत) हो चालेल...

प्रणव: नुकतंच वाचलेलं पुस्तक?
श्रीधरजी: आत्ता इथेच वाचलेलं पुस्तक म्हणजे आर्थर क्लार्क चं 'द फरगॉटन एनिमी' हे. शिवाय मराठी मधे मला सगळं आवडतं. नुकतीच समर्थांवर असलेली रवींद्र भटांची एक जुनीच कादंबरी आहे; ती वाचली.

प्रणव: आवडता खाद्यपदार्थ?
श्रीधरजी: खरं सांगू? वरण भात! (हसतात)

प्रणव: तुमच्या गाडीत सध्या वाजणारी कॅसेट किंवा सीडी?
श्रीधरजी: माझ्या गाडीत सध्या वाजणारी म्हणजे एक तर शंकर जयकिशन आणि दुसरी मदन मोहन. आणि बाबूजींची गाणी. नवीन मधे म्हणजे नुकताच मी इजिप्तला गेलो होतो. तिथल्या गाण्यांच्या सीडीज आणल्या होत्या ऐकण्यासाठी म्हणून. त्या सध्या घरी ऐकतोय.

प्रणव: तुमच्या गाण्यांपैकी तुमचं सगळ्यात लाडकं गाणं?
श्रीधरजी: नाही सांगता येणार! कारण काय आहे की आपली गाणी म्हणजे आपण निर्माण केलेली अपत्यच असतात. त्यामुळे हे मूल मला आवडतं आणि हे दुसरं नावडतं आहे असं होऊ शकत नाही. जेव्हा गाणं तयार होत असतं त्याचवेळी आपण ठरवायचं असतं की हे कसं आहे. ते आधी स्वतःलाच आवडलं पाहिजे. त्याशिवाय ते लोकांसमोर ठेवण्यात अर्थ नाही.

प्रणव: मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल?
श्रीधरजी: मला कौतुक आहे की तुम्ही इतक्या दूर येऊन, म्हणजे अमेरिकेत काय, किंवा कॅनडा, इंग्लंड वगैरे, जिथे जिथे आपली मराठी माणसं आहेत, त्या सगळ्यांचं मला कौतुक वाटतं की मराठी भाषा टिकवली जाते आहे. तुम्ही तरूण आहात आणि इतके शुद्ध मराठी बोलताय याचं मला खरंच कौतुक आहे. तसंच मी आत्ता बघितलं की अनेक लहान मुलं देखील फार छान मराठी बोलतात. शेवटी इतकी जुनी भाषा आहे आपली, ज्ञानेश्वरांपासून समृद्ध झालेली, ती टिकवली पाहिजे असं मला तरी वाटतं. का कोणास ठाऊक पण आपल्या महाराष्ट्रात देखील हे प्रयत्न व्हायला पाहिजेत. होतायत; होत नाहीत असं म्हणणंही बरोबर नाही. पण सगळ्यांनी प्रयत्न केले तरच आपली भाषा टिकेल. त्यामुळे मायबोलीसारखं आपलं जे माध्यम आहे त्याचं मला कौतुक वाटतं आणि त्यांना मला मनःपूर्वक शुभेच्छा द्याव्याश्या वाटतात.

प्रणव: तुमच्यासमोर बसून तुम्हाला गाताना ऐकणं हा हेवा वाटावा असा अनुभव मला आज मिळतोय, पण मायबोलीकरांसाठी एखादं गाणं तुम्ही गाणार का?
श्रीधरजी: जरुर... ही कुसुमाग्रजांची कविता आहे.


माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

प्रणव: अतिशय सुरेख! मायबोलीसाठी "माझ्या मातीचे गायन" याहून सुंदर आणि समर्पक गाणं कोणतं असेल!

श्रीधरजी, शेक्सपियरचं एक वाक्य आहे की या जगात संगीताएवढं चिरस्थायी दुसरं काही नाही अशा अर्थाचं. तर या क्षेत्रात तुमचं एवढं मोठ्ठं कार्य झालं, योगदान झालं त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत?
श्रीधरजी: अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला वाटतं की माझं फक्त एक टक्का काम झालंय. कारण जेव्हा मी माझं काम बघतो तेव्हा एक तुलना असते की इतर लोकांनी केवढं काम केलंय. म्हणजे बाबूजींचं आहे, इतर संगीतकारांचं आहे. आणि त्यांचा आवाका बघितल्यानंतर, त्यापुढे माझं काहीच नाही. अजून खूप करायचं आहे आणि उत्तम करायचं आहे. शेवटी काय असतं की आपण जसं म्हणतो क्वालिटी आणि क्वांटिटी. असे संगीतकार असणं की क्वालिटी मधे बेस्ट आणि क्वांटिटीही भरपूर तर छानच. पण समजा क्वांटिटी नाही झाली तरी गुणवत्ता असली तरी ते जास्त महत्त्वाचं.

प्रणव: तुम्ही एवढे कार्यक्रम करता. हजारो चाहत्यांना भेटता. काही लक्षात राहिलेल्या आठवणी?
श्रीधरजी: एक आठवण तुम्हाला सांगतो. 'ऋतू हिरवा' या कार्यक्रमाच्या वेळचा. एका प्रयोगाला एक अंध माणूस आला होता. तर त्यांनी मला कार्यक्रमानंतर भेटून सांगितलं की, 'अहो, ऋतू हिरवा हे ऐकल्यानंतर मला रंग म्हणजे काय याची जाणीव झाली'. ही सगळ्यात मोठी दाद आहे! आणि खूप लोक येतात. वयोवृद्ध येतात. खूप प्रेमानी आशिर्वाद देतात. लहान मुलं, तरुण भेटायला येतात आणि आम्हाला आवडलं असं आवर्जून सांगतात. शेवटी आपण हे कशासाठी करतो? अशी कोणाकडून पावती मिळणं हीच समाधानाची गोष्ट आहे.

प्रणव: 'दिवाळी संवाद' च्या निमित्ताने वाचकांसाठी आणि तुमच्या चाहत्यांसाठी काही संदेश?
श्रीधरजी: देशात आणि परदेशात राहणार्‍या आपल्या सगळ्या बांधवांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांची दिवाळी खूप सुखा-समाधानाची आणि आनंदाची जावो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो!

प्रणव: तुमच्याकडून आणखी एखादं गाणं ऐकायला खूप आवडेल...
श्रीधरजी: जरुर.. कुठलं गाणं म्हणू? तुम्हाला कुठलं आवडतं?

प्रणव: तुमची सगळीच गाणी माझी आवडती आहेत. "रंग किरमिजी" हे गाणं माझं खूप आवडतं आहे!

श्रीधरजींनी माझं खूप आवडतं असं हे गाणं तर प्रत्यक्ष म्हटलंच पण खास मायबोलीकरांसाठी गाण्याची मूळ ध्वनीफीतही वाजवण्याची परवानगी त्यांनी दिली. गाणं 'आतून' येऊन कसं 'आतपर्यंत' पोचतं त्याचा प्रत्यय म्हणजे हे गाणं! त्यांच्या या सुरेल गाण्यानेच या मुलाखतीचा समारोप करुया. शब्द आहेत प्रवीण दवणे यांचे. या गाण्याचं संगीत श्रीधरजींचं आहे, ते गायलंही त्यांनीच आहे. आणि या गाण्यातली शीळही श्रीधरजींनीच वाजवलेली आहे!

रंग किरमिजी, सांज तिर्‍हाईत, मी दुखणाईत
दिठीतली सल, अंधुक चंचल, बघ आंदोलीत
विझता तगमग, आलीस तू मग, पदर सावरीत
क्षण उजळावा, चंद्र फिरावा, हीच नसे रीत

जिवलग हात, मूर्तीमंत घात, दंश सराईत
आता सांजरंग, काळीज दुभंग, मना जोजवीत
तुझ्याच पाऊली, जुन्याच चाहुली, कोण बोलवीत
आठवांचे पीस, गमते आकाश, चंद्र सजवीत

कुठले काहूर, मग दूरवर, क्षण पाजळीत
आयुष्य वेल्हाळ, मन रानोमाळ, कुठे हारजीत
सुटलेला शर, खोल खोलवर, तोच मनमीत
चाललो चाललो, काठाशी बोललो, जिवा उधळीत


लेखन प्रकार: 

मुलाखत - डॉ. आनंद कर्वे

पुनर्निर्मितीक्षम उर्जास्रोत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या संशोधक, समाजसेवकांना दरवर्षी ऍश्डेन पारितोषिक देण्यात येतं. हे अतिशय मानाचं समजलं जाणारं पारितोषिक दोनदा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. आनंद कर्वे.
कर्वे कुटुंबाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक जडणघडणीत अतिशय मोलाचं योगदान आहे. म. धोंडो केशव कर्वे, श्री. र. धों. कर्वे, श्री. दि. धों. कर्वे, डॉ. इरावती कर्वे, गौरी देशपांडे आणि डॉ. आनंद कर्वे या सार्‍यांनीच आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरं घडवून आणली.
डॉ. कर्वे आणि त्यांच्या 'आरती' (Appropriate Rural Technology Institute) या संस्थेनं कृषी व पर्यावरण क्षेत्रांत आपल्या मूलभूत संशोधनानं एक प्रकारची क्रांतीच घडवून आणली आहे. त्यांनी लावलेले शोध आणि सुचवलेले उपाय यांचा अवलंब जगभरातील शेतकरी करत आहेत. शिवाय जागतिक तापमानवाढ, इंधनांची कमतरता या समस्या सोडवण्यासाठीही डॉ. कर्वे यांनी लावलेले शोध महत्त्वाचे ठरले आहेत.

डॉ. आनंद कर्वे यांच्याशी केलेली ही बातचीत.

***

चिन्मय : आपण संशोधनाकडे कसे वळलात?

डॉ. कर्वे : माझे आईवडील हे दोघेही प्राध्यापक होते. त्यांचे घरी येणारे स्नेहीसुद्धा शिक्षण, संशोधन क्षेत्राशी संबंधित असेच होते. त्यामुळे त्यांच्या चर्चाही त्याच विषयांशी निगडित अशा असायच्या. अत्यंत academic असं वातावरण आमच्या घरी होतं. पुस्तकंही आमच्या घरी भरपूर होती. मराठी तर मी वाचायचोच, पण इंग्रजीही भरपूर वाचत असे. तेव्हा Scientific Clubची पुस्तकं निघत असत. ती पुस्तकं आमच्या घरी येत असत. सोप्या भाषेत त्यात वैज्ञानिक तत्त्वं समजावून सांगितलेली असत. अगदी लहानपणापासून विज्ञानाची आणि शास्त्रीय विषयांवरील पुस्तकं वाचण्याची गोडी होती. शास्त्रज्ञ व्हायचं, हे मी खूप लहानपणीच ठरवलं होतं. मेडिकल कॉलेजला आरामात प्रवेश मिळेल, असे गुण इंटर सायंन्सला मिळूनही मी B.Sc.ला प्रवेश घेतला. वनस्पतीशास्त्र हा माझा विषय होता. B.Sc.नंतर लगेचच संशोधनासाठी मी जर्मनीला गेलो.

चिन्मय : तिथे आपल्या संशोधनाचा विषय काय होता?

डॉ. कर्वे : Einstein's Law of Photochemistryशी संबंधित असा माझा विषय होता. वनस्पतींच्या पानांवर पर्णछिद्रे असतात, आणि ती रक्षकपेशी नामक दोन अर्धगोलाकार पेशींनी वेढलेली असतात. या पेशींच्या हालचालींमुळे ही पर्णछिद्रे लहान, मोठी किंवा बंद होतात. सकाळी प्रकाश पडल्यावर ही छिद्रे उघडतात. या प्रकाशाची तरंगलांबी मी शोधून काढली. ही तरंगलांबी सापडल्यानंतर, तो प्रकाश शोषून घेणारं रंगद्रव्य (pigment) शोधायचा मी प्रयत्न केला. यांपैकी एक रंगद्रव्य हे क्लोरोफिल होते हे समजले. पण याशिवाय निळा प्रकाश शोषून घेणारे आणखी एक रंगद्रव्य या प्रक्रियेत भाग घेत असावे, असे दिसत होते. ते कोणते ते मला शोधून काढता आले नाही. आणि अजूनही ते रंगद्रव्य कोणाला सापडलेले नाही.

चिन्मय : Appropriate Rural Technology Institute म्हणजे 'आरती'ची स्थापना कशी झाली?

डॉ. कर्वे : ARTI सुरू करण्याच्या आधी इथे पुण्यामध्येच Center for Application of Science and Technology for Rural Development या नावाची एक संस्था डॉ. टिळकांनी सुरू केली होती. डॉ. बी. डी. टिळक हे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की, ज्या २९ राष्ट्रीय प्रयोगशाळा भारतभर आहेत, तिथे जे काही संशोधन चालतं, ते मुख्यतः उद्योगांसाठी आणि पर्यायाने शहरांच्या विकासासाठी वापरलं जातं. परंतु जर आपण या संशोधनांचा नीट अभ्यास केला, आणि एक चाळणी वापरली, तर ग्रामीण भागातही हे संशोधन वापरता येऊ शकेल. या विचारातूनच या सेंटरची स्थापना डॉ. टिळकांनी केली. NCLच्याच आवारात हे केंद्र होतं. Department of Science and Technologyने Science and Society Division असा खास वेगळा विभाग मुद्दाम तयार केला होता, आणि त्यातूनच या केंद्राला भरघोस अनुदान मिळालं.

डॉ. टिळकांची कल्पना अशी होती, की वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रयोगशाळांना भेट द्यायची आणि तिथे एक आठवडा राहून तिथल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करायची, त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्यायचं आणि मग पुण्यात त्याचा नीट अभ्यास करून ग्रामीण भागात त्यापैकी काय वापरता येईल, हे शोधून काढायचं. वर्षातून एकदा एक मेळावा भरवायचा, आणि त्या मेळाव्यात सर्व स्वयंसेवी संस्थांना बोलावून या शोधांची माहिती द्यायची, असं हे प्रोजेक्ट होतं. ही कल्पना अतिशय उत्तम होती, पण पुढे त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. या स्वयंसेवी संस्थांतील लोक यायचे, दिवसभर बसायचे, खाणंपिणं व्हायचं, निघून जायचे. हा प्रयोग यशस्वी न होण्यामागचं एक कारण असं होतं, की आपल्याकडील स्वयंसेवी संस्था या do-gooders आहेत. या संस्थांमध्ये शास्त्रज्ञ नसतात. कोणी वकील असतो, कोणी डॉक्टर, कोणी उद्योगपती. यांपैकी काही लोक हे खरंच समाजासाठी काहीतरी करावं या हेतूने आलेले असतात, तर अनेकांसाठी समाजसेवा म्हणजे चराऊ कुरण असतं. समाजसेवेच्या नावाखाली आपला खिसा भरायचा, आणि फुकटात प्रसिद्धी मिळवायची, असंही करणारा एक वर्ग असतो. तर सांगायचा मुद्दा हा की या कामात बहुतांश स्वयंसेवी संस्थांना अजिबातच रस नव्हता. आणि 'application of science and technology for rural development' हा जो हेतू होता, तो मुळीच साध्य होत नव्हता. केंद्राचं, प्रोजेक्टचं काम काही पुढं सरकत नव्हतं.

१९८८ साली मी पुण्यामध्ये आलो. त्यावेळी मी 'हिंदुस्थान लिव्हर लि.'च्या शेतकी संशोधन विभागाचा प्रमुख होतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांत असतं, तसंच वातावरण तिथे होतं आणि ते काही मला आवडलं नाही. तिथे मला स्वतःला काहीच संशोधन करण्याची परवानगी नव्हती. कंपनीची जी धोरणं आणि ध्येयं असतात, त्याला पूरक असंच संशोधन करणं मी अपेक्षित होतं. माझ्या डोक्यात बर्‍याच कल्पना होत्या आणि त्या मला तिथे मूर्त स्वरूपात आणता येईनात. म्हणून मी राजीनामा देऊन बाहेर पडलो. त्या अगोदर एक-दोन वर्षं डॉ. टिळकांची बायपास सर्जरी झाली होती, आणि ते आपल्या उत्तराधिकार्‍याच्या शोधात होते. या सेंटरमध्ये मग मी उपसंचालक म्हणून सामील झालो. पुढे दोन वर्षांनी डॉ. टिळक त्या सेंटरमधून पूर्णपणे बाहेर पडले आणि मी संचालक झालो.

त्या आधी डॉ. टिळकांनी हे केंद्र राष्ट्रीय प्रयोगशाळेतून कोथरूडच्या Indian Institute of Education इथे हलवलं होतं. १९९१ मी Director झालो आणि १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षं हे सेंटर तिथे होतं. पण केंद्र सरकारच्या एक ऑडिटरच्या असं लक्षात आलं की या केंद्राला जी आर्थिक मदत दिली जाते, त्यासाठी कायद्यात तरतूद नाही. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे एक प्रोजेक्ट, अशी या केंद्राची नोंदणी झाली होती. आणि आता एका वेगळ्याच संस्थेत या केंद्राचं कामकाज सुरू होतं. शिवाय सरकारकडून जी आर्थिक मदत मिळते, ती संस्थेला प्रोजेक्टसाठी मिळते, आणि त्या दृष्टीने आमचं म्हणजे एक हवेत लटकणारं प्रोजेक्ट होतं. सरकारकडून मग तगादा सुरू झाला की तुम्ही तुमच्या सेंटरची स्वतंत्र संस्था म्हणून नोंदणी करा. तसं केलंत तरच तुम्हाला आर्थिक मदत मिळेल, अन्यथा नाही. आम्हाला इतकी वर्षं मिळणारी मदत तशी बेकायदेशीरच होती, आणि पुढे ती मिळणं अशक्यच असल्याने मी आमच्या केंद्राची नोंदणी केली. पण त्यातून बरीच खटलेबाजी वगैरे सुरू झाली. Indian Institute of Educationने आमच्या संस्थेच्या नावावर आक्षेप घेतला. या सगळ्यात बराच वेळ, पैसा वाया जात होता. म्हणून मग आम्ही एक नवीनच संस्था सुरू करायचं ठरवलं, आणि Appropriate Rural Technology Institute या नावाने आम्ही संस्था नोंदवली.

पण आमचा सगळा स्टाफ मात्र पूर्वीचाच होता. आणि आता आमची नवीन, स्वतंत्र संस्था अस्तित्वात आल्याने Indian Institute of Educationमधून आम्हांला बाहेर पडावं लागलं. पहिले काही दिवस माझ्या घरातच ऑफिस होतं. मग इथे या धायरीच्या जागेत आलो. 'निंबकर सीड्स'मधील नोकरीमुळे माझी फलटणात अनेक शेतकर्‍यांशी ओळख होती, त्यामुळे फलटण येथे अर्धा एकर जागा घेऊन आम्ही तिथे आमचे कार्य सुरू केले. वेळोवेळी जशा देणग्या मिळत गेल्या तसं आम्ही तिथे मोठी बिल्डिंग, होस्टेल असं वाढवत नेलं.

चिन्मय : डॉ. टिळकांनी जे केंद्र सुरू केलं होतं, त्यात स्वतंत्र संशोधनाला वाव नव्हता. मात्र 'आरती' आपल्या संशोधनासाठी, विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तर 'आरती'चा नक्की उद्देश काय आहे?

डॉ. कर्वे : आम्ही इथे जी तंत्रं विकसित केली आहेत, ती अतिशय नाविन्यपूर्ण आहेत, हे खरं. म्हणजे लोकांनी ती पूर्वी कधी ऐकलीसुद्धा नसतील. तर ही तंत्रं लोकांना शिकवायची, हा आमचा मुख्य उद्देश. आणि खेड्यांतल्या लोकांनी ही तंत्रं शिकून, शहरांत न येता खेड्यांत राहून हे उद्योग करावेत, हा त्यामागचा विचार. आमचं म्हणणं असं आहे की, आज खेड्यामध्ये महिना पाच हजार रुपये जरी मिळाले तरी ते भरपूर असतात. कारण या खेड्यात राहणार्‍या माणसाचं राहतं घर असतं, तिथे शेती असल्यानं दोन वेळचं जेवण मिळत असतं. थोडी पॉकेटमनी, मोबाईल फोन, मोटरसायकल असं मिळालं की तो खूश असतो. शिवाय माझा व्यवसाय आहे, किंवा मी नोकरी करतो, हे त्याला सांगता येतं. तर अशा लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो. ही मंडळी मग आमच्या संस्थेतच काम करतात, किंवा आमचं तंत्रज्ञान वापरून स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात.

चिन्मय : हे तंत्रज्ञान वापरण्यात, किंवा शिकून घेण्यात गावात, खेड्यात राहणार्‍या लोकांना भाषेमुळे, कमी शिक्षणामुळे काही अडचणी येतात का?

डॉ. कर्वे : आमचे बहुतेक सगळे कर्मचारी हे खेड्यांतून आलेले आहेत. दहावी, बारावी उत्तीर्ण केलेले असेच आहेत बरेचसे. कमी बुद्धीमुळे त्यांचं शिक्षण कमी झालं, असं अजिबात नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं, शाळांचा दर्जा वाईट असतो, आर्थिक परिस्थिती बरी नसते, त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत. पण आमचा असा अनुभव आहे, की ही मुलं अत्यंत हुषार असतात, आणि त्यांना जर योग्य संधी दिली, तर अतिशय यशस्वी होऊ शकतात.

आता आमच्या सर्व स्टाफ मेम्बर्सना आम्ही सांगितलं आहे की, तुम्ही पासपोर्ट काढा. कारण परदेशातूनही आमच्या तंत्रज्ञानाला भरपूर मागणी आहे. आणि इतके दिवस आम्ही वरिष्ठ अधिकारीच फक्त परदेशात जात होतो. मग मी असा विचार केला की, या मुलांनी का परदेशात जाऊ नये? कारण एखादा बायोगॅस बसवणे, किंवा एखादी कोळशाची भट्टी तयार करून ती सुरू करणे, यासाठी दरवेळी मी जाण्याची गरज नाही. आमच्या संस्थेतील एखादा मुलगा तिथे गेला, तरी तो तितकंच चांगलं काम करेल.

आम्ही आमचं तंत्रज्ञान शिकवावं, म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था विनंती करत असतात. पूर्वोत्तर राज्यं, हिमाचल, उत्तरांचल, दक्षिण भारतातील राज्यं, अशा अनेक ठिकाणांहून आम्हाला बोलावणं येतं. त्यांचा एखादा माणूस आमच्याकडे येऊन शिकण्यापेक्षा, आमच्या एका माणसानं तिथे जाऊन त्यांच्या पंचवीस माणसांना शिकवणं जास्त चांगलं. तिथे आमचा असा अनुभव आहे की भाषेची अडचण मुळीच येत नाही. कारण सामायिक अशी भाषा नसतेच. त्यामुळे खाणाखुणांनीच शिकवावं लागतं. तर अशा ठिकाणी आमचे कर्मचारी जातात, आणि तिथल्या लोकांना आमचं तंत्रज्ञान शिकवतात. हा पूर्वानुभव आमच्या गाठीशी असल्यानं आता आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना परदेशातही पाठवतो.

चिन्मय : हंगामी पिकांच्या रोपवाटिका ही एक अतिशय अभिनव पद्धती आपण शोधली. काय तत्त्व आहे या रोपवाटिकेमागचं?

डॉ. कर्वे : प्रत्येक पिकाची एक लागण तारीख असते, त्या तारखेला जर पेरणी झाली तरच उत्पन्न चांगलं येतं. पिकाच्या प्रत्येक जातीच्या आणि वाणाच्या पेरण्या विविध तारखांना करून त्या त्या पिकाची सर्वोत्कृष्ट लागण तारीख कोणती ते ठरवलेलं असतं. ती तारीख चुकली तर मात्र नुकसान. आता पहिल्या पिकाच्या काढणीला उशीर झाला किंवा महिनाभर पाऊस लांबला तर शेतकरी तरी काय करणार? तर आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या तारखेला बी लावा. म्हणजे त्या वनस्पतीची वाढ सुरू होते. आणि जेव्हा कधी पाऊस येईल, तुमची पाण्याची सोय होईल, तेव्हा ते रोप तुम्ही शेतामध्ये लावू शकता. आणि हा प्रयोग यशस्वी होतो, हे आम्ही अनेक वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत दाखवून दिलं आहे. त्यातही व्यापारी दृष्टीकोनातून सर्वांत मोठं यश आम्हांला ऊसाच्या लागवडीत मिळालं.

आपल्याकडे महाराष्ट्रात आडसाली ऊस लोकप्रिय आहे, म्हणजे उसाची जुलै-ऑगस्टमधली लागवड. आणि या पिकाचं सर्वाधिक उत्पन्न येतं. परंतु महाराष्ट्र सरकारला असं वाटलं की, शेतकरी इतर पिकांकडे नीट लक्ष देत नाहीत, आणि त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत आपण मागासलेले आहोत. त्यामुळे शासनाने असा आदेश दिला की, कालव्याचे पाणी घेऊन जर शेतकर्‍यांना ऊस लावायचा असेल, तर पावसाळ्यात दुसरं काहीतरी पीक घेतलं पाहिजे. सोयाबीन, बाजरी, मूग, हायब्रीड ज्वारी यांपैकी काहीही लावा, आणि मग हे पीक काढून ऊस शेतात लावला, तरच कालव्याचं पाणी शेतात वापरायला मिळेल. असं केल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी दहा टन उत्पन्न कमी मिळणार होतं, आणि कारखान्यांनाही त्या प्रमाणात ऊस कमी मिळणार होता. म्हणून आम्ही हा पिशव्यांत उसाची पेरं लावण्याचा प्रयोग केला, आणि आम्हाला असं वाटलं की ही एक अतिशय योग्य अशी पद्धत आहे. जुलै महिन्यात प्लास्टिकच्या पिशवीत उसाचं पेर लावायचं, आणि मग दोन किंवा अडीच महिन्यांनी ते शेतात लावायचं. आमची जाहिरात त्यावेळी अशी असे की, 'तुमचं सोयाबीन तुमच्या शेतात वाढतं आहे, तोपर्यंत तुमचा ऊस आमच्या रोपवाटिकेत वाढू द्या.' शेतकर्‍यांना ही कल्पनाच खूप आवडली. ते आगाऊ पैसे देऊन, बुकींग करून जायचे. आणि हा जवळजवळ आमचा १० लाखांच्या टर्नओव्हरचा धंदा झाला होता. अनेक लोक आमच्याकडून ही पद्धत शिकून गेले आणि आज महाराष्ट्रात सुमारे ६०-७० अशाप्रकारच्या रोपवाटिका सुरू आहेत. ही पद्धत अगदी पार नेपाळच्या तराई भागातसुद्धा लोकप्रिय झाली आहे. त्या भागात थंडी खूप असते. एप्रिल महिन्यात त्यांच्याकडे गहू काढला जातो, आणि त्यानंतर ते ऊस लावतात. तिथले शेतकरी पिशवीत ऊस लावतात, त्यामुळे मे महिन्यात ऊसाचं वाढलेलं मोठं रोप त्यांच्या हाती येतं. अर्थातच त्यांचं उत्पन्नही भरपूर वाढतं.

तसंच कोकणात भात काढून कलिंगडाचं पीक घेतात. आम्ही तिथल्या शेतकर्‍यांना सांगतो की, भात उभा असतानाच तुम्ही पिशवीत कलिंगडाचं बी लावा. भात काढल्या काढल्या जर तुम्ही कलिंगडाचं वाढलेलं रोप लावलं, तर मुंबईत पूर्ण ख्रिसमसची बाजारपेठ तुम्हांला मिळू शकते. तूर, कापूस यांच्याबाबतीतही हेच तंत्र वापरता येतं. आता ९८% तूर आणि कापसाची लागवड ही पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्राइतकं कपाशीचं कमी पीक जगात कुठेही घेतलं जात नाही. याला कारण म्हणजे कापूस मुख्यतः जिथे होतो, त्या विदर्भात पाऊस उशीरा सुरू होतो. आणि शेतात पुरेशी ओल असल्याखेरीज बी पेरलं जात नाही. १५ जुलैच्या आसपास पेरण्या होतात, आणि १५ सप्टेंबरला पावसाळा संपतो. म्हणजे जे पीक सहा महिने शेतात उभं असतं त्याला जेमतेम दोन महिने पाणी मिळतं. याऐवजी जर जून महिन्यात पिशवीत बी लावलं, रोप वाढवलं, तर दीड महिन्याचं रोप जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर लावता येतं. शेतकर्‍याला दुप्पट उत्पन्न मिळतं. आम्ही विदर्भात ३०-४० ठिकाणी हा प्रयोग करून शेतकर्‍यांना दाखवून दिलं की या पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्न दुप्पट करता येतं. पण विदर्भात ही पद्धत कोणी वापरत नाही. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात मात्र ही पद्धत सर्रास वापरली जाते. विदर्भातल्या शेतकर्‍यांची मानसिकता थोडी वेगळी असते. नवीन पद्धती वापरून बघणं त्यांना धोक्याचं वाटतं.

चिन्मय : आपण विदर्भातल्या शेतकर्‍यांचा उल्लेख केला. तिथे होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही एक खूप मोठी समस्या आहे. याबाबत ARTI काही करत आहे का?

डॉ. कर्वे : आम्ही अजून विदर्भात, शेतकर्‍यांच्या आत्महत्त्यांचे सत्र सुरू झाल्यावर गेलोच नाहीये. १९६९-७० साली 'निंबकर सीड्स'तर्फे विदर्भातल्या शेतकर्‍यांसाठी एक योजना राबवली होती. कपाशीच्या बियाणांसंबंधी योजना होती ती, आणि त्यासाठी मी वर्षभर तिथे होतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन यात खूप फरक आहे. विदर्भात हमखास पाणी नाही. त्यामुळे शेती हा एक जुगार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, तिथल्या शेतकर्‍यांच्या जमिनी खूप मोठ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पाणी असल्याने सिलींग एरीया ५-७ हेक्टर अशी काहीतरी आहे. आणि विदर्भात अजूनही शेतकर्‍यांकडे ५० एकर, १०० एकर अशा जमिनी आहेत, एकेका शेतकर्‍याकडे. त्यामुळे तिथल्या शेतीचं अर्थशास्त्रही पूर्ण वेगळं असतं.

आपल्याकडे दोन-पाच एकर जमीन असलेला शेतकरी एकरी १०-२० हजार रुपये खर्चायला मागेपुढे पाहत नाही. कारण त्याच्या हातात पाणी असतं. पीक हमखास येणार आहे, ही खात्री त्याला असते. जमीन कमी असल्याने उत्तम पीक हवं असल्यास, तेवढे inputs आवश्यक आहेत, हे इथे छोट्या शेतकर्‍यांना माहित आहे. जोखीम घ्यायची तयारीही असते. कारण पश्चिम महाराष्ट्रात घरटी एक माणून शहरात राहून पैसे कमावत असतो. त्यामुळे ते कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून नसतं. 'Moneyorder economy' ज्याला म्हणतात, ती इथे आहे. एखादा नवीन प्रयोग करायचा आहे, आणि त्यासाठी २-३ हजार रूपये लागणार असतील, तर ते लगेच शहरातून त्या शेतकर्‍याला मिळू शकतात.

विदर्भात एका कुटुंबाची जर पन्नास एकर जमीन असेल, तर ते त्या शेतात घरचंच बी वापरतील, घरचेच बैल वापरून मशागत करतील. कारण साधं एकरी हजार रूपये खर्च करायचं ठरवलं, तरी संपूर्ण शेतासाठी पन्नास हजार रुपये लागतात. ते कुठून आणायचे? त्यामुळे कमीत कमी साधनं वापरली जातात. शेतीवर होणारा खर्च हा नगण्य असतो. पण त्याने फारसं बिघडत नाही. एकरी दोन क्विंटल जरी कपाशी आली, तरी आज एका एकरातून पाच हजार रुपये मिळतात. अडीच हजार रुपये क्विंटल हा भाव आहे कपाशीला. पन्नास एकरातून म्हणजे अडीच लाख रुपये मिळतात. तेवढे त्या शेतकर्‍याला पुरेसे असतात. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांचा शेतीबद्दलचा दृष्टीकोनच वेगळा आहे.पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांसारखी शेती करा, असं त्यांना सांगितलं, तरी त्यांना ते परवडणार नाही. तेवढं भांडवलच त्यांच्याकडे नसतं.

इथे बसून त्यांना म्हणायचं की, 'तुम्ही आळशी आहात, तुम्ही मेहनत करत नाहीत', हे चूक आहे. त्यांची परिस्थितीच वेगळी आहे. आणि त्याला योग्य असे पर्याय त्यांनी निवडले आहेत.

चिन्मय : आपल्याला पहिला ऍश्डेन पुरस्कार जो मिळाला तो उसाच्या पाचटापासून केलेल्या कांडीकोळशासाठी..

डॉ. कर्वे : माझी मुलगी, प्रियदर्शिनी, लहानपणी फलटणलाच वाढली. तिथल्याच शाळेत शिकली. ते सबंध उसाचंच क्षेत्र असल्यानं तिनं बघितलं होतं की, कापणी झाल्यानंतर वाळलेल्या पानांचा साधारण फूटभर उंचीचा थर शेतात राहतो. साखर कारखाने फक्त खोडं घेऊन जातात, पाला मागंच राहतो. आणि त्याचा शेतकर्‍याला काहीच उपयोग नसतो. गुरं खात नाहीत, तो कुजत नाही. उलट पुढची नांगरण, मशागत करायला त्याची अडचणच होते. त्यामुळे तो पाला जागेवरच पेटवून देतात. आणि अशी पेटलेली शेतं प्रियदर्शिनीनं बघितली होती.

इथे आमच्या संस्थेत जेव्हा चुलीचं काम सुरू झालं, तेव्हा तिला असं वाटलं की, हा पाला जर आपण चुलीत जाळू शकलो, तर तो कारणी तरी लागेल. म्हणून त्या दिशेनं तिने प्रयत्न करायला सुरुवात केली, आणि तिच्या असं लक्षात आलं की, त्या पाल्यापासून इंधन बनवायचं असेल तर कोळसा करणं हे सगळ्यांत सोपं आहे. तिने मग या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली. भट्टी कशी असावी, हा मुख्य मुद्दा होता. ही भट्टी लहान, हाताळायला सोपी, अशी हवी होती. कारण हा जो शेतीतला त्याज्य माल आहे, तो ठिकठिकाणी विखुरलेला आहे. तो अतिशय हलका असतो, त्यामुळे एकावेळी दोन टनांपेक्षा अधिक माल ट्रकमधून नेता येत नाही. पण पैसे मात्र दहा टनांचे द्यावे लागतात. त्यामुळे जिथे माल आहे, तिथे ही भट्टी नेता आली पाहिजे. तर या भट्टीचं तंत्र प्रियदर्शिनीने शोधून काढलं, आणि या भट्टीचं व्यावसायिकरण मात्र आमच्या इतर संशोधकांनी केलं. त्यानंतर आता आम्ही जी भट्टी तयार केली आहे, ती आधीच्या भट्टीपेक्षाही हलकी आहे. वापरायला सुटसुटीत आहे.

चिन्मय : पण हा कांडीकोळसा तयार करण्यासाठी ऊस निवडण्यामागचं कारण काय?

डॉ. कर्वे : ऊस निवडण्यामागचं कारण असं की, नोव्हेंबर ते एप्रिल या काळात कुठेनाकुठे उसाची तोडणी सुरू असते. त्यामुळे कच्चा माल कायम उपलब्ध असतो. याउलट गव्हाचा पार, भाताचा पेंढा किंवा सूर्यफूल, करडई यांचा कचरा हंगामाच्या शेवटीच उपलब्ध असतो, आणि सगळ्या शेतांत हा कचरा एकाच वेळी तयार होतो. हा कचरा जर त्याच वेळी वापरला गेला नाही, तर शेतकरी तो जाळून टाकतात. कांडीकोळसा तयार करण्याचा उद्योग जर तुम्हाला करायचा असेल, तर निदान सहा - आठ महिने रोज कच्चा माल मिळाला पाहिजे. घरगुती वापरासाठी जर कोळसा तयार करायचा असेल, तर इतर कचरा तुम्ही वापरू शकता. पण उद्योग म्हणून मोठ्या प्रमाणात कांडीकोळसा तयार करून विकायचा असेल, तर उसाच्या पाचटाशिवाय पर्याय नाही.

मात्र याला अजून एक पर्याय आहे. शहरांत पाचोळा वर्षभर उपलब्ध असतो. आणि हा पाचोळा जाळून टाकला जातो. त्याऐवजी या भट्टीत तो जाळला तर कोळसा तयार करता येईल.

चिन्मय : आपण जो सराई कूकर तयार केलात, त्यातही हा कांडीकोळसा वापरला जातो. या कूकरचं वैशिष्ट्य काय?

डॉ. कर्वे : सराई कूकरचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याला अतिशय कमी इंधन लागतं. उसाच्या पाचटापासून केलेला कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. या कोळशाचा अजिबात धूर होत नसल्याने तो शहरात फ्लॅट किंवा बंगल्यातही वापरता येतो. साधारण १००-१५० ग्रॅम कोळसा वापरून पाच माणसांचा पूर्ण स्वयंपाक या कुकरमध्ये करता येतो. या कूकरसोबतच त्याला लागणारी शेगडी आणि शेगडीला वेढणारे बाह्यावरण, हेही दोन भाग येतात. शेगडीत १०० ग्रॅम कांडीकोळसा घालून तो मेणाची प्रक्रिया केलेल्या कागदाने पेटवायचा. कोळसा पेटला की त्यावर कूकरचे बाह्यावरण ठेऊन त्यात कूकरचा डबा ठेवायचा. बाह्यावरणामुळे कूकरच्या डब्याला सर्व बाजूंनी उष्णता मिळते. या कूकरमध्ये वाफेचा उच्च दाब निर्माण होत नसल्याने कूकरशेजारी थांबून जाळ कमी करण्याची आवश्यकता नसते किंवा कूकरचा स्फोट होण्याचाही धोका नसतो. एकदा कूकर सुरू केला की त्याकडे अजिबात लक्ष द्यावे लागत नाही. ४५ मिनिटांमध्ये अन्न पूर्ण शिजते. या कालावधीत कोळसा पूर्णपणे जळून जातो आणि शेगडी विझते. अन्न मंदाग्नीवर शिजले गेल्याने त्यातील अन्नघटक शाबूत राहतात आणि त्यांची चवही फार चांगली लागते. तयार झालेलं अन्न तसेच कुकरमध्ये ठेवल्यास ते सुमारे दोन तासांपर्यंत गरम राहते.


चिन्मयः आपल्याला दुसर्‍यांदा ऍश्डेन पुरस्कार मिळाला तो घरगुती इंधनवायू संयंत्रासाठी...

डॉ. कर्वे : बायोगॅसशी तसा माझा काहीच संबंध आला नव्हता. पण मी एक विचार असा केला की, बायोगॅस तयार होणं ही एक किण्वन (fermentation) प्रक्रिया असते. आणि आज किण्वन प्रक्रियेचा वापर करणारा कुठलाही व्यावसायिक शेणाचा वापर करत नाही. तो साखर किंवा molasses वापरतो. मग या बायोगॅस संयंत्रात molasses वापरलं, तर काय होईल? म्हणून मी एक बायोगॅस संयंत्र तयार केलं. सुरूवातीला शेण वापरून मी ते सुरू केलं, पण मग त्याच्यामध्ये साखर घातली. आणि माझ्या असं लक्षात आलं की, चाळीस किलो शेणापासून जेवढा गॅस मिळतो, तेवढाच एक किलो साखरेपासून आपल्याला मिळतो. शिवाय चाळीस किलो शेण कुजायला चाळीस दिवस लागतात, तर इथे फक्त चोवीस तासात गॅस तयार होतो. म्हणजेच बायोगॅस संयंत्राची कार्यक्षमता जवळजवळ चारशे पटींनी वाढते.

साखरेची पोषण उर्जा (calorific value) शेणापेक्षा अधिक आहे, त्यामुळे हे होतंय का, असा विचार मी केला. नंतर मी जेव्हा या बॅक्टेरियाबद्दल अधिक खोलात जाऊन वाचायला सुरूवात केली, तेव्हा बायोगॅसचा आणि आर्किबॅक्टेरियाचा संबंध माझ्या लक्षात आला. मीथेन निर्माण करणारे बॅक्टेरिया हे आर्किबॅक्टेरिया या गटात मोडतात. या शब्दाचा अर्थ पौराणिक जीवाणू. ज्यावेळी हिरव्या वनस्पती अस्तित्वातच नव्हत्या, तेव्हा हे आर्किबॅक्टेरिया निर्माण झाले. त्या काळी आपल्या वातावरणात नैट्रोजन, कार्बन डायॉक्साईड, अमोनिया, मीथेन असे वायू होते, प्राणवायू (ऑक्सिजन) नव्हता. पुढे मग सायानोबॅक्टेरिया नावाचे बॅक्टेरिया निर्माण झाले, आणि त्यांनी प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) करायला सुरूवात केली. वातावरणातून कार्बन डायॉक्साईड घ्यायचा आणि प्राणवायू बाहेर टाकायचा, या क्रियेमुळे वातावरणात प्राणवायूचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं. पण हा प्राणवायू आर्किबॅक्टेरियासाठी प्रदूषणकारी होता. त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी अशा जागा शोधल्या की जिथे प्राणवायू नाही. म्हणून आज हे मीथेन निर्माण करणारे बॅक्टेरिया आपल्याला दलदलीत, किंवा सर्व जनावरांच्या पोटांत सापडतात. आणि ते आपल्या पोटांत राहत असल्याने जे आपण खातो तेच त्यांचे अन्न. विष्ठेबरोबर ते केवळ बाहेर टाकले जातात, विष्ठा हे काही त्यांचे अन्न नाही, हा साक्षात्कार मला बोधीवृक्षाखाली बसलो असता झाला.

याच दिशेने मग मी अनेक प्रयोग केले, आणि मला आढळलं की बायोगॅस तयार होण्यासाठी केवळ साखरच हवी असे नाही. स्टार्च, मेद (fats), प्रथिनं, हे सगळं चालतं. म्हणजे अगदी मांस, अंडी, सर्जरीमध्ये कापलेले अवयवसुद्धा. गेली शंभर वर्षं शास्त्रज्ञ चुकीच्याच मार्गाने चालले होते, हे माझ्या लक्षात आलं. मी जेव्हा याबद्दल बोलायला सुरूवात केली तेव्हा मला असा अनुभव आला की, लोक मला गोंधळ घालून खाली बसवायचे. अगदी मोठ्या परिषदांतसुद्धा. 'तुम्हांला काही कळत नाही, आम्ही सगळं आयुष्य या बायोगॅसच्या संशोधनात घालवलं आहे, तुम्ही काय सांगता आम्हांला? शेणाशिवाय बायोगॅस तयार होणे शक्यच नाही', हे ऐकवत.

ऍश्डेननेसुद्धा खातरजमा करून घेण्यासाठी त्यांचा एक माणून इथे पाठवला. हा गृहस्थ इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठात प्रोफेसर होता. नेपाळमध्ये जो एक अतिशय मोठा असा बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आला होता, त्याच्याशी तो संबंधित होता. तर स्वतःबरोबर तो आपला एक मराठी जाणणारा विद्यार्थी घेऊन आला आणि मला म्हणाला की, तुम्ही मला फक्त घरं दाखवा, की जिथे तुमची बायोगॅस संयंत्रं सुरू आहेत. पुण्यामध्येच मी त्याला अशी अनेक घरं दाखवली. मग तो त्या प्रत्येक घरी जाई, आणि 'तुम्ही बायोगॅससाठी या संयंत्रात काय घालता?', असं विचारी. त्या घरातील बायका सांगत की, आम्ही घरात उरलेलं शिळं अन्न, खरकटं टाकतो, सडकी फळं टाकतो. कोणी पिठाच्या गिरणीत जमिनीवर सांडलेलं पीठ आणून ते टाकत असे. कोणी अखाद्य तेलाची पेंड टाकी. तो प्रोफेसर मग म्हणत असे, 'हे सगळं ठीक, पण शेण किती घालता?' त्या गृहिणी सांगत, 'आम्ही शहरात राहतो. आम्ही कुठून शेण आणणार?' तर अशा चाळीसेक गृहिणींनी त्या प्रोफेसरला सांगितलं की, त्या शेणाशिवाय बायोगॅस संयंत्र चालवतात, तेव्हा त्याचा विश्वास बसला. आणि त्यानंतर तो ऍश्डेन पुरस्कार आम्हांला मिळाला.

चिन्मय : या संयंत्राचं आकारमान काय असतं?

डॉ. कर्वे : या संयंत्रासाठी आपल्याला हजार लिटरची टाकी लागते. त्याचा व्यास चार फूट असतो. ही टाकी गच्चीवर ठेवणे योग्य, कारण हे जनावरांच्या पोटातले बॅक्टेरिया असल्याने त्यांना ३८ अं. से. तापमान आवडतं. पण निदान ३० अं. तापमान तरी हवेच. आणि त्यासाठी ती उन्हात चांगली तापायला हवी. पण त्यामुळे डोंगराळ भागात आमच्या संयंत्रांचा उपयोग नाही. ऍश्डेन पुरस्कार घ्यायला मी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो, तेव्हा प्रिन्स चार्ल्सने आमच्या या प्रकल्पाची माहिती करून घेतली. ते ऍश्डेन ट्रस्टचे पेट्रन आहेत. ते मला म्हणाले की, आमच्या राजवाड्यात तुमची बायोगॅस संयंत्रं बसवा. मग त्यांना सांगावं लागलं की, तुमच्या या हवेत आमच्या संयंत्रांचा मुळीच उपयोग नाही. हे तंत्रज्ञान केवळ उष्णकटिबंधीय देशांत वापरता येतं. तर आता आमची ३५०० बायोगॅस संयंत्र बसली आहेत. आणि बहुतेक सगळी शहरांत आहेत. खेड्यात फार थोडी आहेत. जेमतेम शे-दोनशे असतील.

चिन्मय : त्याचं कारण काय?

डॉ. कर्वे : 'ओला कचरा घेणार नाही', असं महानगरपालिकेनं सांगितलं. म्हणून लोकांनी तो ओला कचरा वापरून गांडूळ खत तयार करायला सुरूवात केली. पण त्या गांडूळ खताच्या खड्ड्यांमुळे तिथे उंदीर, झुरळं, माशा यांचा त्रास व्हायचा. त्यापेक्षा बायोगॅस संयंत्र सोयीचे कारण ते एक बंद युनिट आहे. अजिबात घाण वास येत नाही, फार जागा व्यापत नाही. उर्जा निर्मितीचा तो एक अतिशय सोपा, स्वच्छ मार्ग आहे.

चिन्मय : स्वस्त हरितगृहाची कल्पना आपल्याला कशी सुचली?

डॉ. कर्वे : माझे वडील 'सृष्टीज्ञान' या मासिकाचे संपादक होते. आमच्या घरी 'सृष्टीज्ञान'चे सगळे अंक होते. अगदी पहिल्या अंकापासूनचे. आठ-दहा वर्षांचा होतो तेव्हा मला विज्ञानाची गोडी लागली, आणि मी ते अंक वाचायला सुरूवात केली. त्याचा एक फायदा असा झाला की, मी जे शाळेत पुढे शिकलो, ते बरचसं मी या मासिकांतून आधीच वाचलं होतं. म्हणजे गॅलिलिओ, लव्हाझिये, न्यूटन यांच्याबद्दल, त्यांच्या शोधांबद्दल खूप जास्त माहिती मला या मासिकांतून मिळाली. तर 'सृष्टीज्ञान'च्या एका जुन्या अंकात मी वाचलं होतं की, इटलीतील एका खेड्यात एक गुहा आहे, आणि तिथे जर तुम्ही साखळीला बांधून कुत्रं नेलं, तर ते कुत्रं मरतं पण त्या माणसाला मात्र काही होत नाही. त्याचं कारण असं होतं की, ती एक चुनखडीची गुहा होती. त्या गुहेत कुठलंसं शैवाल वाढत होतं. त्यातून निघणार्‍या आम्लांमध्ये चुनखडी विरघळून कार्बन डायॉक्साईड बाहेर पडत असे. कार्बन डायॉक्साईड वायू हवेपेक्षा जड असल्याने तो जमिनीलगत साठून रहायचा. असा एक दोन फुटांचा थर तिथे साठून राहिला होता. त्यामुळे ते साखळीला बांधलेलं कुत्रं गुदमरून मरायचं. आणि माणूस उंच असल्याने त्याला काही होत नसे.

मी जेव्हा हरितगृहांबद्दल विचार करत होतो, तेव्हा ही पूर्वी वाचलेली गोष्ट माझ्या ध्यानात होती. हरितगृहांचा मुख्य उद्देश झाडांना जादा कार्बन डायॉक्साईड उपलब्ध करून देणं, हाच आहे. मग ते हॉलंडमधील हरितगृह असो, किंवा भारतातील. ती बंद खोली असल्याने रात्री झाडं जो कार्बन डायॉक्साईड तयार करतात, तो तिथंच रहातो. आणि सकाळी सूर्य उगवला की कार्बन डायॉक्साईडचं प्रमाण जास्त असल्याने प्रकाशसंश्लेषण जास्त होते. जास्त अन्न तयार करू शकल्याने वनस्पतींची वाढ चांगली होते आणि त्यामुळे शेतकर्‍याला जास्त उत्पन्न मिळतं.

आपल्याकडे इस्रायली किंवा युरोपियन बनावटीची हरितगृहे बघायला मिळतात. या हरितगृहाला एकरी साठ लाख रुपये खर्च येतो. बंदिस्त हरितगृहात सूर्यप्रकाशाद्वारे उर्जा आत जाते. आतील वनस्पती व इतर वस्तू ही उर्जा शोषून घेतात. या उर्जेमुळे आतील तापमान वाढते. मात्र उष्णता हरितगृहाच्या भिंतींमधून बाहेर येऊ शकत नाही. हरितगृहातील वनस्पतींना दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत असते, पण हे बाष्पही बाहेर पडू शकत नाही. यामुळे भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात हरितगृहामध्ये तापमान व सापेक्ष आर्द्रता कमी करण्यासाठी, हरितगृहात हवा खेळती रहावी म्हणून विजेवर चालणारे पंखे, कूलर इ. उपकरणांचा वापर करावा लागतो. या प्रचंड भांडवली खर्चामुळे हरितगृहात उत्पन्नवाढ होऊनही भारतासारख्या देशात शेतकर्‍याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं.

युरोपसारख्या कडाक्याची थंडी पडणार्‍या ठिकाणी हरितगृहांचा वापर थंडीतही शेती करता यावी म्हणून करतात. युरोपात प्रचंड थंडीत किंवा इस्राइलसारख्या वाळवंटी प्रदेशात प्रचंड उन्हाळ्यात शेती करायची असल्यास बंदिस्त हरितगृहाला पर्याय नाही. भारताची गोष्ट मात्र वेगळी आहे. आपल्या देशाच्या दक्षिण भागामध्ये हवामान बारा महिने तेरा काळ शेतीला अनुकूल असते. अशा ठिकाणी पूर्णतः बंदिस्त हरितगृहाची गरजच नाही. आपल्याला हरितगृहाचा फक्त एकच उपयोग आहे, आणि तो म्हणजे कार्बन डायॉक्साईड साठवून ठेवणे. यासाठी फक्त चार भिंतींचा आडोसा पुरेसा आहे. कारण कार्बन डायॉक्साईड हवेपेक्षा जड असल्याने जमिनीलगतच गोळा होतो, व जमिनीलगतच सर्वत्र पसरतो.

म्हणून मी छत नसलेलं हरितगृह बांधलं. सुरूवातीला १ मी x १ मी x १ मीटर एवढाच आकार होता. या हरितगृहात काही रोपं ठेवली आणि काही रोपं बाहेर ठेवली. या हरितगृहात ठेवलेल्या रोपांची वाढ अतिशय झपाट्याने झाली. म्हणून मी त्याचा आकार वाढवत नेला. माझ्या लक्षात आलं की १० मी x १० मी एवढाच आकार योग्य आहे, आणि उंची त्या रोपापेक्षा १ फूट जास्त हवी. यापेक्षा जास्त मोठं हरितगृह बांधल्यास venturi effectमुळे आडवा वाहणारा वारा कार्बन डायॉक्साईड घेऊन जातो. ही हरितगृहं बांधणंही अतिशय सोपं आहे. ज्या ठिकाणी कलमे किंवा रोपे ठेवली आहेत, त्या जागेभोवती उंच बांबू उभे करून त्यांच्या आधारे या जागेला चारही बाजूंनी वेढून टाकील अशा प्रकारे पारदर्शक पांढर्‍या प्लास्टिक कापडाची भिंत उभारावी. प्लास्टिकचं कापड जमिनीला टेकतं त्या जागी कापडाच्या दोन्ही बाजूंनी माती चढवून कापड व जमीन यांच्यात फट राहणार नाही अशी काळजी मात्र घ्यावी लागते. वनस्पतींच्या श्वसनाने तयार झालेला कार्बन डायॉक्साईड वायू हवेपेक्षा जड असल्याने रात्री जमिनीलागत साठतो. सूर्योदयानंतर रोपं प्रकाश संश्लेषण करतात तेव्हा हा वायू वापरला जातो. या सोप्या उपायाने रोपांच्या, वनस्पतींच्या वाढीत ५०-१००% वाढ घडवून आणता येते.

मागे जर्मनीत तिथल्या सरकारच्या आमंत्रणावरून गेलो होतो. तिथे जवळजवळ २० ठिकाणी मी व्याख्यानं दिली, आमच्या सर्व प्रयोगांविषयी. त्या जर्मन शेतकर्‍यांचेही नंतर ईमेल आले की, आमच्या हरितगृहांचा त्यांना खूप फायदा झाला. फक्त थंडीत मात्र त्यांना ती वापरता येत नाहीत.


चिन्मय : ऊतिसंवर्धनातदेखील (tissue culture) आपण बरंच क्रांतिकारी काम केलं आहे. त्याबद्दल सांगाल?

डॉ. कर्वे : ऊतिसंवर्धन ही एक अत्यंत महागडी पद्धत आहे. आणि या तंत्राचा सर्वांत मोठा उपयोग हा शेतीत होतो. पण शेतीच्या मानाने हे तंत्र खूपच महाग असल्यानं याचा वापर मुख्यतः शोभेच्या वनस्पतींसाठीच केला जातो. जर हे तंत्र शेतकर्‍यांनी वापरावं, असं वाटत असेल तर त्याची किंमत खाली आणावी लागेल. ही किंमत कमी करण्यासाठी आम्ही काही पर्याय शोधून काढले. पाठ्यपुस्तकांत लिहिलेली पद्धत न वापरता आम्ही काही सोपी तंत्रं वापरली. कारण जसजसे शोध लागत गेले, तशा त्या पद्धती पाठ्यपुस्तकांत लिहिल्या गेल्या. पण संशोधन करताना आपण जे उच्च दर्जाचं साहित्य वापरतो, ते व्यवहारात वापरणं गरजेचं नसतं. आता 'बोरोसिल' हा एक काचेचा प्रकार असतो, आणि या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या, टेस्ट ट्युब्स संशोधनात वापरतात. एक बाटली साधारण दोनशे रुपयांना मिळते. त्याऐवजी आपण जर साध्या काचेची बाटली घेतली तर ती बाजारात दहा रुपयांना मिळते. जॅम, लोणची यांसाठी ज्या बाटल्या मिळतात, त्या खूप मोठ्या प्रमाणात तयार केल्याने अतिशय स्वस्त असतात. दीड-दोन रुपयांना अशी एक बाटली मिळते आणि आम्ही याच बाटल्या वापरतो. शिवाय अतिशुद्ध रसायनं ही संशोधनासाठी आवश्यक असतात. पण ही महागडी रसायनं प्रत्यक्षात वापरण्याची गरजच नसते. ऊतिसंवर्धनात वाढणार्‍या पेशींना अन्न म्हणून साखर द्यावी लागते. संशोधनासाठी लागणारी अतिशुद्ध साखर पाचशे रुपयांना अर्धा किलो मिळते. त्याऐवजी वाण्याकडून आणली तर वीस रुपयांत किलोभर साखर मिळेल. आगार-आगार हे आधारद्रव्यसुद्धा अतिशय महाग असतं आणि ते वापरलं नाही तरी चालतं. तुम्ही टीपकागद वापरू शकता. आम्ही कृत्रिम प्रकाश आणि एअर कंडिशनिंग करणंसुद्धा टाळतो.

आपण ऊतिसंवर्धन का करतो? तर आपण शेतकर्‍याला ते रोप रोगमुक्त असल्याची हमी देत असतो. मग आपण पहिली पिढी ऊतिसंवर्धनाचं तंत्र वापरून तयार केली, आणि दुसरी पिढी रोपवाटिकेत वाढवली, तर बराच खर्च कमी करता येऊ शकतो. कारण जमिनीत रोप वाढवताना खतं, आणि थोडाफार पाण्यासाठी होणारा विजेचा खर्च सोडला तर बाकी सगळं फुकट असतं. ही पद्धत जर आपण वापरली तर आज शेतकर्‍याला जे रोप दहा रुपयांना विकत घ्यावं लागतं, ते एक रुपयात आपण देऊ शकू. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी ही रोपं वापरू शकतील.

आज फक्त केळ्याची ऊतिसंवर्धनाने वाढवलेली रोपंच वापरली जातात. कारण एकरी फक्त दोन हजार रोपांची गरज असते. हे वीस हजार रुपये खर्चण्याची शेतकर्‍याची तयारी असते कारण पुढे त्याला कधीतरी लाखभर रुपये मिळणार असतात. पण हळद किंवा आलं लावायचं असेल, तर एका एकरात चाळीस हजार रोपं लागतात. एक रोप जर दहा रुपयांना दिलं तर ही किंमत शेतकर्‍याला परवडायचीच नाही. म्हणून आम्ही जे काम केलं आहे ते मुख्यतः किंमत कमी करण्याच्या दृष्टीने, आणि दुसरी पिढी शेतकर्‍याला देऊन ही किंमत आणखी कशी कमी करता येईल, या विचारानेच.

चिन्मय : हल्ली अन्नधान्याचं उत्पादन घटलं आहे. काय कारणं आहेत यामागे?

डॉ. कर्वे : याला कारण म्हणजे आपल्याकडे जी 'हरितक्रांती' झाली, तीत भरपूर खतं वापरणे, जमलं तर भरपूर पाणी वापरणे आणि हायब्रीड बियाणे वापरणे, ही मुख्य तत्त्वं होती. या त्रिसूत्रीमुळे उत्पन्न खूप वाढ झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना भरपूर खतं वापरण्याची सवय लागली. त्याचा परिणाम असा झाला की, 'soil fatigue'चा शेतकर्‍याला त्रास सुरू झाला. म्हणजे जमीन 'दमली' आणि उत्पन्न मिळेनासं झालं. माझ्या माहितीत असे अनेक शेतकरी आहेत की जे पूर्वी एकरी शंभर टन ऊस काढायचे, आणि आज ते चाळीस टनाच्या वर जाऊ शकत नाहीत. आणि ते सांगतात की, 'आम्ही कितीही खतं घातली तरी उत्पन्नच मिळत नाही.' तर या समस्येवर कोणी संशोधनच केलं नाही.

मुळात रासायनिक खतं वापरायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा आपण काहीतरी कृत्रिम वापरतो आहोत, हे कोणी लक्षातच घेतलं नाही. रासायनिक खतं वापरण्यापूर्वी नैसर्गिक पद्धतीनं झाडं वाढत होतीच. शेतकरी शेती करतच होते. कोणाच्याही जमिनी नापीक झाल्या नव्हत्या. हे लक्षात न घेता, वनस्पती जमिनीतून अन्न कसं घेतात, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास न करता रासायनिक खतं वापरायला सुरुवात झाली. आज चित्र असं दिसतं आहे की, ज्यांनी प्रचंड प्रमाणात रासायनिक खतं वापरली, त्यांच्याच जमिनी नापीक झाल्या आहेत.

आपल्याकडे एक आता सगळ्यांनी मान्य केलं आहे की, जमिनीत सूक्ष्म जंतू हवेत. जमिनीत सूक्ष्म जंतूंची संख्या जितकी जास्त, तितकी जमिनीची सुपिकता अधिक. आणि त्यासाठी सेंद्रीय पदार्थ वापरले पाहिजेत. पण सेंद्रीय पदार्थ म्हणजे काय? तर याबाबतही आज आपल्याकडे ज्या रूढ कल्पना आहेत, त्या चुकीच्या आहेत. त्याचं काय झालं, १९३५च्या सुमारास एक इंग्रज अधिकारी इंदूर संस्थानात होता. त्याने इंदूरातला कचरा गोळा करून शेतात घालायला सुरूवात केली. त्याच्या असं लक्षात आलं की, तो कचरा नुसताच शेतात टाकला तर पीक कमी येतं. पण जर तो कचरा कुजवला, तर मात्र पीक भरपूर वाढतं. त्याची ही पद्धत 'इंदूर मेथड ओफ कंपोस्टिंग' म्हणून ओळखली गेली, आणि आपण भारतात कंपोस्ट खतं वापरायला सुरूवात केली. याचं समर्थन असं केलं जातं की, सेंद्रीय पदार्थांत कार्बन, हायड्रोजन, प्राणवायूच्या जोडीने नैट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश वगैरे असतातच. सर्व जिवंत पेशींना ही खनिजं लागतातच. तर या कुजवण्याच्या प्रक्रियेत कार्बन, कार्बन डायॉक्साईड बनून निघून जातो आणि खनिजांचं प्रमाण वाढतं. पण तरी आपण कोणत्याही वनस्पतीजन्य पदार्थांचा विचार केला, तर आपल्याला दिसून येईल की, झाडांची पानं, खोडं, साल यांत फक्त पाच टक्के खनिज पदार्थं असतात. आता सर्वसाधारण संकेत असा आहे की, एक हेक्टर शेत जर असेल, तर १०० किलो नैट्रोजन, ५० किलो फॉस्फेट आणि ५० किलो पोटॅश आवश्यक आहे. आणि ही खनिजं जर सेंद्रीय खतांद्वारे द्यायची असतील तर हेक्टरी पन्नास टन खत लागेल. हे खत तयार करण्यासाठी दहा हेक्टर शेतातील त्याज्य माल वापरावा लागेल. म्हणून त्यासाठी रासायनिक खतंच वापरली पाहिजेत, आणि ही खतं वापरून उत्पन्न मिळत नाही, हे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ सध्या किंकर्तव्यमूढ झाले आहेत. रासायनिक खतं वापरली तर उत्पन्न नाही. आणि सेंद्रीय खतं वापरायची असतील, तर ती उपलब्ध नाहीत.

१९६०च्या सुमारास ही हरितक्रांती झाली, आणि १९८०च्या सुमारासच हे लक्षात आलं की, रासायनिक खतांचा काही उपयोग होत नाही. मी गेली वीस वर्षं यावर विचार करतो आहे, आणि बायोगॅस संयंत्र बांधताना मला जो साक्षात्कार झाला होता, त्याचा वापर मी शेतीत केला. तिथे चाळीस किलो शेणापेक्षा एक किलो मेद, स्टार्च, प्रथिनं चालतात. कारण या पदार्थांत पोषणउर्जा अधिक आहे. आपल्याला जर सूक्ष्म जंतूंकडून काम करून घ्यायचं असेल, तर त्यांना शेणाचा चोथा देऊन उपयोग होणार नाही. शिवाय खतं घालताना आपण नैट्रोजन, फॉस्फेट, पोटॅशचा जो विचार करतो, तो न करता आपण सूक्ष्म जंतूंची संख्या कशी वाढेल, याचा विचार करायला हवा.

एक प्रयोग म्हणून मी एका कुंडीत माती घातली. त्यात पाणी घालून त्यातील बॅक्टेरियांची संख्या मोजली. मग त्यात अर्धा ग्रॅम साखर घातली. चोवीस तासांनंतर त्या कुंडीतल्या बॅक्टेरियांची संख्या पाचशे पटींनी वाढली होती. त्या मातीत खनिज पदार्थ होतेच. कारण नुसती साखर देऊन बॅक्टेरियांची संख्या वाढली. पण हे खनिज पदार्थ आपल्या मुळांद्वारे झाडांना घेता येत नाहीत. पण हे खनिज पदार्थ जर बॅक्टेरियांनी शोषून घेतले, आपल्या पेशींत त्यांचा साठा केला आणि मग बाहेर टाकले, तर वनस्पतींना ते घेता येतात. आणखी एक गोष्ट की जी कोणत्याही पाठ्यपुस्तकात लिहिली जात नाही ती ही की, पाण्यात नेहमीच खनिजं विरघळलेली असतात. ही खनिजं येतात कुठून? मातीत दगड, वाळू, मृदा असते आणि त्यांत ही खनिजं असतात. ही खनिजं पाण्यात विरघळतात. आणि पाण्यातील खनिजांच्या प्रमाणाचा समतोल राखला जातो. बॅक्टेरियांनी खनिजं शोषून घेतली की लगेच दगड, मातीतील खनिजं पाण्यात नव्याने विरघळतात, आणि पाण्यातील खनिजांचं प्रमाण कायम राखलं जातं. हे लक्षात घेतलं की बरीचशी कोडी चटकन उलगडतात. शास्त्रज्ञ म्हणतात की ही खनिजं लवकरच संपतील. कशी संपतील ती? आपल्याकडे एवढे दगडधोंडे आहेत. त्यामुळे ही खनिजं संपणारी नाहीत.

चिन्मय : हे प्रयोग यशस्वी झाले आहेत का?

डॉ. कर्वे : जमिनीतल्या सूक्ष्म जंतूंना योग्य असे खाद्य देऊन त्यांच्याद्वारे आपल्या पिकाचे पोषण करून घेणे हा प्रयोग आज महाराष्ट्रातले अक्षरशः शेतकरी करत आहेत. हे शेतकरी एका २०० लिटरच्या पिंपात पाणी, १० किलोग्रॅम शेण, १० लिटर गोमुत्र व १० किलोग्रॅम गूळ यांचे मिश्रण सुमारे आठ दिवस कुजत ठेवतात व हे द्रावण पाण्याबरोबर एका एकरास देतात. 'अमृतपाणी' असं नाव शेतकर्‍यांनी या द्रावणाला दिलं आहे.

मी आधी सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म जीव अन्न घेण्यासाठी वनस्पतींना कशाप्रकारे मदत करतात, हे नीट उलगडलं नव्हतं. संपूर्ण चित्र काही स्पष्ट होत नव्हतं. पण मला आता हे कोडं उलगडलं आहे. बायोगॅसच्या क्षेत्रात जशी माझ्या संशोधनामुळे क्रांती झाली, तसंच या संशोधनामुळे दुसरी हरितक्रांती घडून येईल याची मला खात्री आहे.

आज रब्बी हंगामात कोरडवाहू शेतात ज्वारी आणि करडई ही दोन पिकं लावतात. तिथे जर तुम्ही पहाटे पाचच्या सुमारास गेलात, तर जमीन कचकचीत ओली झालेली दिसते. तर हे पाणी येतं कुठून? म्हणून मी फांद्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बांधून ठेवल्या. तर दुसर्‍या दिवशी सकाळी मला शंभर-दोनशे मिली. पाणी एकेका पिशवीत आढळलं. म्हणजे ते पाणी पानांतूनच पडतं, हे सिद्ध झालं. त्या पाण्याचं परीक्षण केल्यावर, मला त्या पाण्यात साखर आढळली. आता प्रकाशसंश्लेषणाद्वारे त्या वनस्पती साखर तयार करतात. मग स्वतः वापरायची सोडून त्या वनस्पती ती साखर जमिनीत कशाला टाकतात? तर जमिनीत जे सूक्ष्म जंतू आहेत, त्यांनाही जिवंत ठेवलं पाहिजे. कारण या जंतूंमुळेच वनस्पतींना खनिजं मिळतं. तर असा हा परस्परसंबंध आहे.

आम्ही केलेल्या प्रयोगांमध्ये आम्हाला असे आढळले आहे की, अमृतपाण्याऐवजी उच्च पोषणउर्जा असणारा कोणताही पदार्थ, म्हणजे साखर, गूळ, मासळी खत इ. प्रति हेक्टर सुमारे १०-२५ किलोग्रॅम एवढ्या कमी प्रमाणात घातला तरी त्याचाही असाच परिणाम होतो. या पदार्थांमधील उच्च उर्जा आणि सेंद्रीय कार्बन यांचा वापर करून जमिनीतल्या जिवाणूंची संख्या एका दिवसात पाचशे पटींनी वाढवता येते. अशा प्रकारचे उच्च पोषणमूल्य असणारा एक अत्यंत स्वस्त व नेहमी उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे गवत आणि हिरवी पाने. ज्या सूक्ष्म जीवांना सेल्युलोज पचवता येतं त्यांच्या दृष्टीने हिरव्या पानांचे पोषणमूल्य साखरेइतकेच असते. त्यामुळे हेक्टरी १२५ किलोग्रॅम हिरवी पाने किंवा २५ किलोग्रॅम वाळवलेली हिरवी पाने शेतजमिनीत घातल्यास त्या शेताला दुसरे कोणतेही सेंद्रीय किंवा रासायनिक खत देण्याची गरज भासत नाही.

या शोधासाठी आता परत तिसरं ऍश्डेन पारितोषिक मिळायला हरकत नाही.

चिन्मय : हल्ली जैवविविधता नष्ट होते आहे. पिकांच्या अनेक जाती नष्ट होत आहेत.

डॉ. कर्वे : याबद्दल आपण फारसं काही करू शकत नाही. पिकांच्या जातींप्रमाणेच जंगलात वाढणार्‍या वनस्पतीही नष्ट होत आहेत. त्यासाठी या जाती शोधून काढणे, त्यांचं संग्रहालय तयार करणे, हे सगळं व्हायला हवं. या जिवंत जाती असल्याने त्यांची लागवड व्हायला हवी. नाहीतर त्यांची रुजवण शक्ती कमी होत जाते. आणि त्यासाठी भरपूर पैसा या प्रकल्पात गुंतवायला हवा.

आज काय होतं की, एखादं विशिष्ट हायब्रीड चांगलं उत्पन्न देतं म्हणून शेतकरी त्याची लागवड करतो. मग नंतर काही वर्षांनी त्या पिकावर एखादा रोग आला की त्याच्या लक्षात येतं की, जुन्या जातीवर हा रोग नसे. पण तोपर्यंत ती जात नष्ट झालेली असते.

चिन्मय : या रोगांचा बीमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं वापरली जातात, आणि त्यामुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते आहे. त्याबाबत काही करता येईल का?

डॉ. कर्वे : ही अनादि काळापासून सुरू असलेली स्पर्धा आहे. रोगाविरुद्ध immunity हा एक उत्क्रांतीचाच भाग आहे. वनस्पती आपल्या पेशींमध्ये अशी काही द्रव्यं निर्माण करतात की ज्यामुळे त्यांना त्या रोगांपासून मुक्ती मिळते. मग रोग अशा काही योजना करतात की ज्यांमुळे त्यांना तरीही त्या वनस्पतींत वाढता येईल. तर अशीही एकमेकांवर कुरघोडी सतत सुरूच असते. त्यात आपण कीटकनाशक हा एक नवीन घटक आणला. पण तरी ही कुरघोडी सुरूच राहिली.

उत्क्रांतीत नवीन द्रव्यं निर्माण होणं की जेणेकरून रोगमुक्ती मिळेल, ही एक अतिशय दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी काही शे वर्षांचा काळ जावा लागतो. कीटकनाशक हे असं रसायन आहे, की जे मला आज प्रयोगशाळेत सापडल्यावर मी उद्या लगेच ते वापरू शकतो. त्यामुळे माणूस हादेखील त्या उत्क्रांतीचाच एक भाग झाला. शिवाय आपल्याला पचावं म्हणून आपण अशी वाणं निर्माण केली की जी चवीला चांगली आणि पचायला हलकी आहेत. तर माणूस हा पिकांच्या उत्क्रांतीचा एक घटकच आहे.

आज आपण जी कीटकनाशकं निर्माण केली आहेत ती मानवासहित अनेकांना अपायकारक अशीच आहेत. त्या कीटकांच्या जीवनपद्धतीचा, चयापचयाचा (metabolism) अत्यंत सखोल अभ्यास करून केवळ त्या कीटकाचाच नायनाट करेल, असं कीटकनाशक शोधून काढलं पाहिजे. पण या कीटकनाशकाचाही फक्त काहीच वर्षं उपयोग होईल. नंतर परत ते कीटक immune होतीलच.

चिन्मय : सेंद्रीय कीटकनाशकांचा कितपत उपयोग होतो?

डॉ. कर्वे : सबंध जगात साधारण एक लाख कीटक प्रजाती अशा आहेत, की ज्या वनस्पतींना अपायकारक आहेत. कोणत्याही वनस्पतीवर साधारण चार-पाच कीटक आढळतात. शिवाय प्रत्येक वनस्पतीवर वेगळे कीटक असतात. ज्वारीवरचे कीटक कपाशीवर आढळणार नाहीत, कपाशीवरचे कीटक मोहरीवर आढळणार नाहीत. उदाहरणार्थ, आपण निंबोणीची पेंड कीटकनाशक म्हणून वापरतो. तर याचा अर्थ असा की, निंबोणी खाणारे कीटक सोडले तर इतर कीटकांना ती अपायकारक असते. निंबोणीवर कधीही बोंडअळी दिसणार नाही, कारण तिला ते विष पचवता येत नाही. म्हणून आपण निंबोणीचा अर्क कपाशीवर उडवतो. तर माझं म्हणणं असं आहे की, तुम्ही मोहरीचा अर्क कपाशीवर उडवून बघा. सरकीचा अर्क टोमॅटोवर उडवून बघा. नक्की उपयोग होईल.

या इतक्या सोप्या कल्पना आहेत, की कधीकधी वाटतं की हे मुद्दाम दडवून ठेवलं जातं. मी आता जे सांगितलं तेच मी गेली दहा वर्षं सांगतो आहे. पण कोणी त्याचा अवलंब करत नाही. कारण कीटकनाशक बनवणार्‍या कंपन्यांची प्रचंड जाहिरातबाजी चालते. जर शेतात लावलेल्या मोहरीच्या अर्काने कपाशीवरची कीड मेली, तर मग ती महागडी कीटकनाशकं कोण विकत घेणार? म्हणून ही सगळी माहिती पद्धतशीरपणे दडपली जाते. अगदी कृषी विद्यापीठांतसुद्धा ही माहिती दिली जात नाही. कारण कीटकनाशक कंपन्यांना ते सोयीचं असतं.


चिन्मय : आज अनेक शेतकरी शेती सोडून शहरात नोकरी करतात. असं होऊ नये म्हणून काय करता येईल?

डॉ. कर्वे : आपले कायदे बदलायला हवेत. आज महाराष्ट्रात ५०% लोक शहरात राहतात. तुम्ही जर खेड्यात गेलात, तर तुम्हाला लक्षात येईल की बहुतेक जमिनी तशाच पडून आहेत. त्या जमिनींचे मालक शहरात पैसे मिळवायला गेले आहेत. आजचे कायदे असे विचित्र आहेत की, त्यांना भीती वाटते, आपली जमीन दुसर्‍याला कसायला दिली जाईल म्हणून. कारण 'कसेल त्याची जमीन' हा कायदा आहे. शिवाय आज M.Sc करून शहरात नोकरी करणं हे शेती करण्यापेक्षा जस्त फायदेशीर आहे. कारण नोकरी करून शेतीपेक्षा जास्त पैसे मिळतात. मग शेतीत जास्त पैसे कधी मिळतील? जर त्याची जमीन जास्त असेल तर. म्हणून सीलिंगचा कायदा आणि कूळ कायदा, हे दोन्ही कायदे रद्द करायला हवेत. हे फार जुने कायदे आहेत. ते बदलायची वेळ आली आहे.

आमच्याकडे खूप लोक येतात आणि आम्ही त्यांची जमीन खंडाने कसायला घ्यावी, असा आग्रह धरतात. कारण इतर कोणी कसायला घेतली, तर जमीन हातची जाईल, अशी त्यांना भीती वाटते. पण ते आमचं काम नाही. आम्ही संशोधक आहोत. आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याने आम्ही त्यांची जमीन खंडाने घेऊ शकत नाही.

चिन्मय : आपल्या या संशोधनांचा सरकारने कधी उपयोग करून घेतला आहे का?

डॉ. कर्वे : फारसा नाही. मी निंबकरांकडे नोकरीला असताना सरकारने उसाचं उत्पादन कसं वाढवता येईल, याचा अभ्यास करायला एक समिती नेमली होती. त्या समितीचा मी एक सदस्य होतो. आम्ही अहवालही दिला होता. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्याचं असं आहे की, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मान्यता दिल्याशिवाय सरकारच्या कृषी खात्यातील अधिकारी कुठलाच निर्णय घेत नाहीत. त्यांचं म्हणणं असं असतं की, त्यांना प्रशासकीय अधिकार आहेत फक्त, ते काही शास्त्रज्ञ नाहीत. आणि कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ आमचं संशोधन मान्य करत नाहीत.

***

डॉ. आनंद कर्वे यांच्या संशोधनाचा योग्य वापर व्यापक प्रमाणावर व्हायला हवा. अन्नधान्याची टंचाई, इंधनांची टंचाई, नापीक जमिनी या समस्या भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार आहेत. निसर्गाशी सुसंवाद साधून, सहजसोपी जीवनशैली स्वीकारणे, हाच पर्याय आज उपलब्ध आहे. डॉ. आनंद कर्वे यांसारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञांचं संशोधन हाच या समस्यांवर उतारा आहे.

लेखन प्रकार: 

शीतल महाजन

संवाद: शीतल महाजन
मुलाखत आणि शब्दांकन- पूनम छत्रे, चिन्मय दामले

शीतल महाजन! प्रत्येक मराठी माणसालाच नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाला जिचा सार्थ अभिमान वाटेल अशी मुलगी. १४ एप्रिल २००४ रोजी, कोणताही पूर्वानुभव नसताना, आयुष्यात कधीही साध्या विमानात पाऊलही टाकलेले नसताना हिने ३००० फूटांवरून, उणे ३७ डीग्री तापमानात पॅरॅशूटच्या सहाय्याने चक्क उत्तर धृवावर उडी मारली आहे. अशी उडी तिने याआधी सरावासाठीही मारलेली नव्हती. पहिली मारली ती थेट उत्तर धृवावरच! अर्थातच हा विश्वविक्रम झाला शीतलच्या नावावर. ती इथेच थांबली नाही. उत्तर धृवावरून ती परतही आली नसेल, तोवर तिने मनाशी निश्चयही केला की पुढची उडी दक्षिण धृवावर! आणि तीही ’फ्रीफॉल जम्प’- म्हणजेच ज्यामधे तब्बल १५,००० फुटांवरून हवेत स्वत:ला झोकून द्यायचं आणि ४००० फुटावर आल्यावरच पॅरॅशूट उघडायचं! ही उडीही तिने यशस्वीपणे पूर्ण केली.

उत्तर अन् दक्षिण धृव- पृथ्वीचे अतिशय निर्गम भाग. इथे पाणी नसतं, जे असतं ते केवळ बर्फ. हवामान इतकं प्रतिकूल की अजूनही मानव तिथे राहू शकत नाही, केवळ संशोधनासाठी काही भागातच वस्ती आहे. अश्या जागी जिथे आपण कधी जायचा विचारही करू शकत नाही, तिथे शीतल नुसती गेलीच नाही तर एक कल्पनातीत साहस करून आली! अश्या या धाडसी आणि नावाप्रमाणेच ’कूल’ शीतलशी साधलेला हा संवाद.

त्यापूर्वी आवर्जून असं सांगावसं वाटतं की या मुलीचे विक्रम जरी ’हवेतले’ असले, तरी शीतल बोलायला, गप्पा मारायला अगदी मनमोकळी आणि निगर्वी आहे. यश तिच्या डोक्यात अजिबातच गेलेले नाही, उलट तिच्या डोक्यात सतत ’यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आणि ते कसं करता येईल’ हेच असते..

-तुझ्या मनामधे ’आपण पॅरॅशूट जम्पिंग’ करावं असं अगदी पहिल्यांदा कधी आलं? त्यामागची प्रेरणा कोणाची?

शीतल: मला अगदी लहानपणापासून विमानांचं भयंकर आकर्षण होतं. कधीही आकाशात विमान दिसलं की मी ते बघून म्हणायची की मला त्यात बसायचंय. मी बारावीत असताना माझी एक मैत्रीण होती, जी एनडीएमधे रहायची. त्यावेळी एनडीए, ते कॅडेट्स वगैरेचं प्रचंड आकर्षण असायचं, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक रविवार मी तिच्याकडे असायचे. तिचा भाऊ, म्हणजेच कमलसिंग उबेरा हे एनडीए मधे होते. त्यांच्याशी माझी जुजबी ओळख होती. एक दिवस अशीच मी त्यांच्याकडे गेलेले असताना मी टीव्हीवर कमलसिंगांचा एक प्रोग्राम बघितला. त्यांनी उत्तर आणि दक्षिण धृवावर उडी मारली आहे त्यावरचा कार्यक्रम होता तो. ते बघून मी इतकी प्रभावित झाले की बस. आणि मला आश्चर्यही वाटलं की भैय्यांना मी इतक्या वेळा भेटले आहे, त्यांनी एकदाही कसं मला सांगितलं नाही याबद्दल? पुढच्याच रविवारी मी त्यांना गाठलं, आणि विचारलं की ’तुम्ही इतका मोठं साहसी काम केलंत, मला एकदाही कसं बोलला नाहीत?’ तर, त्यावर ते म्हणाले, की ’त्यात काय सांगायचं? माझ्याच तोंडाने मी काय माझी तारीफ करणार?’ मी त्यांना त्याच क्षणी कोणताही विचार न करता म्हणाले, ’भैय्या, मलाही अशी उडी मारायची आहे. मला सांगा तुम्ही कसं केलत ते!’ त्यावर ते काहीच बोलले नाहीत. फक्त हसले. त्यानंतर मी दीड वर्ष त्यांना सतत विचारत होते आणि ते टाळत होते.. पण या काळात माझा विचार एकदम पक्का होत गेला. शेवटी माझी तयारी बघून दीड वर्षानी त्यांनी होकार दिला, आणि ते माझ्या घरी, माझ्या वाढदिवसालाच आले, माझ्या आई-बाबांशी बोलायला.

-आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती?
शीतल: त्यांचा आधी विश्वासच बसला नाही. या खेळाची माहितीच आपल्याकडे नाही. आणि जेव्हा त्यांना भैय्याने सांगितलं, तेव्हा तर त्यांनी लगेचच ’नाही’ सांगितलं. मला दहावीनंतर मुंबईमधे जे.जे.स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश मिळाला होता, पण मुंबईला पाच वर्ष रहावं लागेल, म्हणून त्यांनी मला जाऊ दिले नाही, ते मला या अश्या स्पोर्टमधे परवानगी कसे देणार? पण भैय्या त्यांना म्हणाले की ’इस लडकीमें स्पार्क है, वो कर सकेगी’. मग त्यांनी थोडा विचार केला. आणि माझं तर पक्कं झालंच होतं. मला जम्प करायचीच होती.

-तुझ्या उडीचं वेगळेपण काय आहे?
शीतल: माझी उत्तर धृवावरची जम्प ही माझी ’मेडन जम्प’ आहे! मी त्या अगोदर कधी साध्या विमानातदेखील पाय ठेवलेला नव्हता. या आधीही लोकांनी तिथे जम्प केल्या आहेत. आपल्या भारताच्याच रेचल थॉमस म्हणून आहेत, त्यांना मी खूप मानते.. त्यांनी दोन्ही धृवांवर जम्प केल्या आहेत, पण त्या त्याआधी १५ वर्ष जम्प करत होत्या, त्यांना प्रॅक्टिस होती, अनुभव होता. ही माझी माझ्या आयुष्यातली पहिली उडी होती.


-बापरे! मग त्याची काय तयारी केलीस?

शीतल: काहीच विशेष नाही. ’मला जम्प करायचंय’ हेच इतकं होतं डोक्यात की बाकी तयारी काहीच नाही लागली. मी जी जम्प केली त्याला ’स्टॅटिक लाईन पॅरॅशूट जम्प’ म्हणतात.. म्हणजे काय, की मी विमानाच्या बाहेर पडल्याबरोब्बर पॅरॅशूट उघडतं. त्यामुळे मला पॅरॅशूट उघडेल की नाही याचं टेन्शन नव्हतं, फक्त व्यवस्थित लॅंड करायचं होतं. ते एकदा झालं की झालंच!

-तेंव्हा उडी मारताना काय होतं मनात?
शीतल: बास! आपलं स्वप्न साकार होतंय, आपल्याला नीट जम्प घ्यायची आहे इतकंच. खरंतर इतक्या उंचावरून उडी मारताना आपण ४ सेकंदात एक हजार फूट खाली येतो.. त्यामुळे तेंव्हा फारसा विचार वगैरे करायला वेळ नसतो.. पूर्ण लक्ष आपल्या जम्पवर ठेवावं लागतं. माझी उडी पूर्ण झाल्यावर मात्र खूप खूप आनंद झाला. माझ्याबरोबर माझी रशियन टीम होती बेसवर. तिकडे सगळ्यांनी कौतुक केलं. ही जम्प मी केली १८ एप्रिल, २००४ ला. त्या आधी माझी जम्प हवामानामुळे पुढे पुढे जात होती, त्यामुळे जम्प पूर्ण झाल्यावर एकदम ’Dream come True ’!

-मग त्यानंतर भारतात परत आल्यावर खूप जल्लोष झाला असेल ना?
शीतल: अजिबातच नाही! इथे कोणाला हा स्पोर्टच मुळात माहित नाहीये! भले मी तिकडे वर्ल्ड रेकॉर्ड करून आले, इकडे कोणालाही त्याचं काही नव्हतं. मी क्रीडा खात्यामधे गेले, त्यांना हे सगळं सांगितलं, माझं सर्टिफिकेट दाखवलं, तरी त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणाले चक्क की मदत मिळवण्यासाठी अशी खोटी सर्टिफिकेट्स रोज येतात आमच्याकडे! मग मी त्यांना फोटो दाखवले, सर्व परवाने घेतले त्यांचे रेकॉर्ड दाखवले, माझ्या रशियन टीममेट्सशी बोला असं सांगितलं, त्यांचं या लोकांशी बोलणं घडवून आणलं तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला!

मग त्यानंतर काही मदत वगैरे मिळाली का?
शीतल: हे स्पोर्ट खूप खर्चिक आहे. माझ्या नॉर्थ पोलच्या उडीला मला १५ लाख रुपये खर्च आला, तो आम्ही कसाबसा, स्पॉन्सरच्या मदतीने वगैरे करू शकलो. माझ्या वडिलांच्या कंपनीमधून मदत मिळाली . पण माझी पुढची उडी ही साऊथ पोलवर करायची होती मला, आणि ती ’फ्रीफॉल जम्प’ असणार होती. यामधे कमीतकमी एक प्रशिक्षक तरी लागतो. या प्रकारची माझी पहिलीच जम्प असल्याने मला दोन प्रशिक्षक हवे होते. या सगळ्याचा खर्च, तयारी, प्रवास वगैरे मिळून ८० लाख रुपये असा खर्च होता. यासाठी मला मदत हवी होती आणि मुख्य म्हणजे रेकगनिशनही हवं होतं. आत्ता आत्ता कुठे बाकी खेळांकडे ऑलिंपिक्समुळे आपलं लक्ष जायला लागलंय. नेमबाजी, बॉक्सिंग, हॉकीला थोडी प्रसिद्धी मिळतेय. नाहीतर आपल्याकडे एकच खेळ म्हणजे क्रिकेट. अर्थात, त्यांच्याकडेही स्किल आहे, कसब आहे, पण शेवटी ते संध्याकाळी धड घरी जाऊ शकतात. माझं स्पोर्ट ’पॅरॅजम्पिंग’ हे असं स्पोर्ट आहे, की एक चूक आणि तुम्ही कायमचे अधू किंवा जीवालाच मुकता. तर अश्या स्पोर्टला थोडी तरी मदत हवी होती मला.

-या सर्वामधे आपले तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुझी भेट झाली.. तो अनुभव कसा होता?

शीतल: खूपच छान. मी त्यांना प्रथम भेटले आणि त्यांना माझं नाव सांगितलं, तेव्हा ते मराठीमधे बोलले, ’अरे! शीतल महाजन हे नाव तर मी ऐकलेलं आहे. फार पराक्रमी मुलगी आहेस तू!’ हे ऐकताक्षणी मी हवेत होते! ’पराक्रमी’ सारखा अस्सल मराठी शब्द त्यांच्याकडून माझ्यासाठी ऐकताना अंगावर काटा आला! मग त्यांनी मला माझ्या दुसर्‍या जम्पबद्दल अगदी सखोल माहिती विचारली. मी जाण्याआधी थोडा अभ्यास करून गेले होते, म्हणून बरं, मी सगळी उत्तरं दिली त्यांना. शेवटी त्यांचं समाधान झाल्यावर ते म्हणाले, की ’हां, तुझा अभ्यास तर पूर्ण झालाय. मी तुला सगळी मदत करतो. हवे ते सहकार्य देतो..’ मला स्पॉन्सरशिपबरोबर माझे ट्रेनर म्हणून नेव्हीचे दोन ऑफिसर हवे होते, माझ्या दुसर्‍या जम्पसाठी. नेव्हीमधे सिव्हिलियन्ससाठी अशी मदत करत नाहीत. ते जे ऑफिसर्स होते, ते नेव्हीमधले सर्वोत्तम ऑफिसर होते. त्यांना सहजासहजी नेव्हीवाले माझ्यासाठी जाऊन द्यायला तयार नव्हते. ते म्हणाले की राष्ट्रपतींच्या परवानगीचं पत्र आणा, तरच हे ऑफिसर आम्ही तुमच्यासाठी देऊ शकू. हे सगळं राष्ट्रपतींना सांगितल्यावर त्यांनी लगेचच त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की हिला सगळी मदत कर, हवी ती पत्र, परवानग्या दे, वगैरे.

- वा! मग यानंतर पटापट सूत्र हलली असतील ना?

शीतल: आपल्या देशात काय आहे, की कोणत्या ना कोणत्या पर्सनल कारणासाठी म्हणा, किंवा काहीही, पण कामं पटपट होत नाहीत. आता खुद्द राष्ट्रपतींकडून मला मदतीसाठी, सगळ्या क्लीयरन्सेससाठी पत्र मिळणार म्हणून मी परत घरी आले. पत्र मला पंधरा दिवसात मिळायला हवं होतं, पण एक महिना झाला तरी काही हालचाल नाही! मग पुन्हा दिल्लीची वाट! सेक्रेटरींना भेटले, तर त्यांनी पत्रच पाठवलं नव्हतं! मग पुन्हा मागे लागून एकदाचं पत्र मिळवलं. दिल्लीमधे आपलं कोणतंही काम करायचं असलं तर खूप हेलपाटे मारायला लागतात, खूप वेळ जातो. मी तर म्हणेन की उडी मारणं सोपं, पण फंड्ज मिळवणं, स्पॉन्सरशिप मिळवणं फार अवघड काम. साधं पत्र मिळवायलादेखील खूप वेळ जातो.

- तुला २००५चं ’तेनझिंग नोरगे नॅशनल ऍडव्हेन्चर अवॉर्ड’ मिळालं, त्याबद्दल काय सांगशील?
शीतल: प्रथमच हे अवॉर्ड एका सिव्हिलियनला मिळाले आहे. आत्तापर्यंत फक्त डिफेन्समधल्या लोकांनाच हे अवॉर्ड मिळाले आहे, कारण अर्थातच ऍडव्हेन्चर स्पोर्ट्स मधे कोणी सामान्य लोक उतरतच नाहीत. या अवॉर्डसाठीही बरीच फाईट मारायला लागली. एका सिव्हिलियनचं नाव नॉमिनेट झालं हेच मुळी काही लोकांना पचलं नाही. त्यातून मी मुलगी.. म्हणजे तर जास्तच. त्यामुळे मला हे अवॉर्ड मिळू नये म्हणूनही बरीच फिल्डींग लावली गेली होती, पण अखेरच्या दिवशी माझं नाव फायनल झालं. बरं, हे अवॉर्ड जाहीर झाल्यानंतरही याची पेपरमधे, मीडीयामधे कुठेच पब्लिसिटी केली नाही. रेडीयोवर एका ओळीची बातमी दिली फक्त. पण हे बरोबर नाही ना.. या अवॉर्डच्याच वेळी खेलरत्न जाहीर केलं, द्रोणाचार्य अवॉर्ड दिलं, पण माझंच अवॉर्ड का नाही जाहीर केलं पेपरमधे? एका सिव्हिलियनला हा सन्मान मिळाला आहे, तर तो जगासमोर यायलाच हवा. असं एकदा ठरवल्यानंतर मग सगळीकडे फोटो आले, मुलाखती आल्या वगैरे वगैरे. पण यात मलाच खूप इनिशिएटीव्ह घ्यायला लागलं.

-या नंतरच तुझी दक्षिण धृवावरच्या उडीसाठी तयारी चालू झाली?
शीतल:
हो, मी नॉर्थ पोलची जम्प केल्याबरोब्बरच ठरवलं होतं की आता पुढची जम्प साऊथ पोलवरच. यासाठी स्पॉन्सरशिप हा मोठा प्रॉब्लेम होता. या मोहिमेचा खर्च सुमारे ८० लाख रुपये होता, आणि तो शेवटी एक कोटी पर्यंत पोचला. इतका खर्च करणं मला एकटीला शक्यच नव्हतं. पण तेनझिंग नोरगे अवॉर्डमुळे मला स्पॉन्सर्स गोळा करायला मदत झाली. अवॉर्डचे पैसे मिळाले, पुन्हा माझ्या बाबांच्या कंपनीमधून पैसे मिळाले, बर्‍याच संस्थांनी मदत केली. हे चालू होतं त्या बरोबरच माझं नेव्हीच्या लोकांशी बोलणं चालू होतं. मला ते दोन ऑफिसर्स हवे होते. राष्ट्रपतींच्या क्लीयरन्सनंतरही ते ऑफिसर मला सहजासहजी मिळाले नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं येणं अनिश्चित होतं. परत, माझ्या टीमबरोबर मला एक कॅमेरामॅनही हवा होता जम्पचं शूटींग करायला.. मी या सगळ्या तयारीत होते. इतकं सगळं करूनदेखील मला २० लाख रुपये कमी पडत होते, तेव्हा माझ्या पपांनी आमचं हे राहतं घरही गहाण टाकलं. सुदैवाने बँकेने लगेच चेक दिला.. तेव्हा माझ्या मनाला खूप लागून राहिलं होतं की माझ्यासाठी माझ्या आई-बाबांना किती काय काय करावं लागतंय.. सगळे पैसे माझ्या मोहिमेसाठी जात होते, आता तर घरही गहाण! पण माझे पपा बोलले की इतकं सगळं केलंय, तर आता माघार घेऊ नकोस. आता यशस्वी होऊनच ये. माझ्याही मनात होतंच की ’बस, करायचंय, आता जम्प पूर्ण करायचीये!’

-दक्षिण धृवाच्या उडीचा अनुभव कसा होता?
शीतल: ही माझ्या आधीच्या उडीपेक्षा पूर्णपणे वेगळी उडी होती, कारण ही फ्रीफॉल जम्प होती. आम्ही गेलोही होतो १५००० फुटावर. आधीची जम्प मी ३००० फुटांवरून केली आणि त्यात फ्रीफॉल नव्हता. इथे मी आणि माझे दोन ट्रेनर्स- आम्ही १५००० फुटांवरून अक्षरश: खाली स्वत:ला झोकून दिलं. ४००० फुटावर आल्यावरच मला पॅरॅशूट उघडायचं होतं. त्यावेळी माझ्या दोन ट्रेनर्सची मला मदत झाली. एक तर हे ट्रेनर्स वॉच करतात- उडी मारताना काही चूक झाली, समजा पॅरॅशूट उघडलंच नाही तर, वगैरे वेळी त्यांची मदत मिळते. सुदैवाने तसं काही झालं नाही. आम्ही ४००० फुटांवर आल्यावर मी पॅरॅशूट उघडलं आणि मग सेफली लँड केलं!

-प्रत्यक्ष उडी मारण्याच्या वेळी, किंवा हवेत असताना काय वाटत होतं- आपलं स्वप्न साकार होताना दिसत होतं?

शीतल: खरं तर इतका वेळच नसतो. आपण इतके झपकन खाली येत असतो, की हाईट चेक करणं, पॅरॅशूट व्यवस्थित उघडणं वगैरेकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं. कारण हवेमधे काहीही होऊ शकतं. आणि इथे एक चूक म्हणजे सगळं संपलंच! त्यामुळे, त्या क्षणी फक्त उडी महत्त्वाची असते. मग खाली उतरल्यावर थोडं थोडं जाणवायला लागतं की येस, जम्प झाली, वर्ल्डरेकॉर्ड केलं वगैरे!


-या स्पोर्टमधे फिटनेस कश्या प्रकारचा लागतो? खाण्यापिण्याची काही बंधनं, काही विशेष व्यायामप्रकार वगैरे करतेस का?
शीतल: आधी मी या बाबतीत फारशी जागरूक नव्हते. पण आता मुद्दाम लक्ष देते. इतक्या उंचीवर ऑक्सिजन खूपच विरळ असतो, श्वास घ्यायला त्रास होतो.. त्यामुळे तेलकट खाणं बंद केलंय.. थोडक्यात ज्याने मळमळेल, उलटी होईल असं सगळं खाणं बंद केलंय आता. रोजचं जेवण, पोळी, भाजी, भात हे बेस्ट. व्यायाम म्हणशील तर मुख्य आपले खांदे बळकट असले पाहिजेत. पॅरॅशूट उघडल्यावर, जेव्हा त्यात पूर्ण हवा भरते, तेव्हा मानेला जोराचा हिसका बसतो. मान, खांदे यांना तो हिसका सहन होण्यासाठी खांद्याचे, मानेचे व्यायाम करून ते फिट ठेवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, नेहेमीचे व्यायाम, डायट वगैरे असतंच.

-तुझं लग्नही अनोख्या पद्धतीने झालं..
शीतल: माझं अरेंज्ड मॅरेज. माझे पती श्री. वैभव राणे सध्या फिनलँडमधे असतात. त्यानेही पॅरॅजम्पिंग केले आहे, अर्थातच अमॅच्यूअर म्हणून. पण त्याला या खेळाबद्दल माहिती आहे, त्यातले धोके, त्यातलं थ्रिल- सगळंच. लग्न ठरवताना, स्थळं बघताना मी आई-पपांना सांगितलं होतं की सध्या भारताबाहेर असला तरी चालेल, पण नंतर भारतामधे परत येणाराच मुलगा बघा. भारत सोडून अन्य देशात स्थायिक होण्याचा मी विचारही करू शकत नाही. ही आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, आपलं जे काही व्हायचं ते इथेच. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे मधूनही स्थळं येत होती, पण त्यांचा विचार केला नाही. वैभवना भेटल्याबरोबर मी हे सांगितलं की हेच माझं करीयर असणार आहे. ऑफिस जॉब मी नाही करू शकणार. त्यांनी, त्यांच्या फॅमिलीने मला पूर्ण सपोर्ट केला. लग्न मला हॉट एअर बलूनमधेच करायचे होते. त्यासाठी वेगळी परमिशन घेतली आर्मीकडून.. लग्नाच्या तयारीपेक्षा तीच धावपळ बरीच केली, पण शेवटी मिळवली परवानगी आणि दोन बलून मिळवले. जमिनीपासून ६०० फूट उंचीवर एका बास्केटमधे मी आणि वैभव, आणी दुसर्‍यामधे माझे बाबा आणि गुरुजी असे गेलो आणि तिथे फेरे घेतले!

-त्यानंतर तू लगेचच पॅरॅशूट जम्पिंगच्या ट्रेनिंगला अमेरिकेत गेली होतीस.. या ट्रेनिंगचे अनुभव कसे होते?
शीतल: खूपच छान. आम्ही ऍरिझोनाच्या वाळवंटात होतो, पूर्ण डेझर्ट. मी मेनली गेले होते ते पॅरॅशूट जम्पिंगच्या ट्रेनिंगसाठी. मी नॉर्थ आणि साऊथ पोल वरून उड्या मारल्या, पण त्या कोणत्याच ट्रेनिंगशिवाय. आता हेच करीयर करायचंय, त्यामुळे व्यवस्थित माहिती असणं गरजेचं होतं. इथे आम्हाला १३,००० फूटांवरून किमान ८ जम्प रोज करायच्या होत्या. सगळे वर्ल्ड बेस्ट लोक या ट्रेनिंग सेंटरमधे येतात. काही काही लोकांचे ८ वेळा, ९ वेळा वर्ल्डरेकॉर्डही झाले आहेत. अश्या लोकांबरोबर ट्रेनिंग घेणं हा एक जबरदस्त अनुभव होता. या लोकांपुढे मी अगदीच लिंबूटिंबू होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरॅजम्पिंग शिकवले जाते, टीम इव्हेन्ट्स असतात, तसंच फॉर्मेशन्स असतात, इन्डीव्हिजुअल जम्पिंग असते.. सगळंच शिकले मी. मी आणि माझ्याबरोबर एक मुलगी होती, आम्ही दोघीच कमी एक्सपीरीयन्सवाल्या.. बाकी सगळे दादा लोक होते. पण मी भराभर शिकले, माझ्या ट्रेनरने मला तसं सांगितलंही, की माझी प्रगती खूपच चांगली आहे. आमचं शेड्यूल टाईट होतं. रोज १३,००० फूटांवरून कमीतकमी ८ जम्प मारायच्या म्हणजे अवघड जातं. इतक्या उंचीवर जा, परत खाली आपण अक्षरश: ५ मिनिटात येतो, मग पुन्हा १३,००० फूटाच्या उंचीवर जा.. डोकं नंतर भिरभिरायला लागतं. सुरुवातीला चक्क भीतीही वाटायची.. तेव्हा तिथला ट्रेनर म्हणला होता की ’काही माहित नसताना जम्प करणं तसं सोपं असतं, पण मुद्दाम तसं ट्रेनिंग घेतलं की शंकाकुशंका जास्त येत राहतात’. पण त्यालाही सरावले. नंतर नंतर तर मी बाकीच्यांना सांगायचे, ’थांबा आधी मी मारते उडी!’ ट्रेनिंगसाईटवर दोन ड्रॉप झोन्स असतात- एक प्रोफेशनल्ससाठी आणि एक अमॅच्यूअर्ससाठी . आम्हाला हेलिकॉप्टरमधून आमच्या अमॅच्यूअर फील्डमधे जम्प करायची असे. आपलं जे टार्गेट आहे, ते मार्क केलेलं असतं, त्या टार्गेटवर जम्प करायचा प्रयत्न करायचा. हे जसं जसं ऍक्यूरेटली जमायला लागेल, तशी जम्प परफेक्ट होत जाईल. मला बर्‍यापैकी जमत होतं माझं टार्गेट गाठायला.

-ट्रेनिंगच्या वेळेचे बाकी लोक कसे होते?
शीतल: एकदम मस्त. एक तर ७० वर्षाचे आजोबा होते. प्रचंड अनुभव होता त्यांना. एक जण होते, तेही वयाने मोठे.. त्यांनी तर वयाच्या ५०व्या वर्षी पॅरॅजम्पिंग सुरु केलं.. अचानक एक दिवस मनात आलं की बस, खूप काम केलं, आता काहीतरी थ्रिल हवं म्हणून हे सुरु केलं, आणि आता दर वर्षी येतात ते या कँपला. अश्या लोकांकडे बघून आम्ही तर तोंडात बोटंच घालायचो.

-हे असं पन्नासाव्या वर्षी पॅरॅजम्पिंग करणं ते केवळ अमेरिकेत आहेत म्हणूनच शक्य झालं?
शीतल: हो. तिथे हे स्पोर्ट लोकप्रिय आहे आणि अद्ययावत सुविधाही आहेत. ते लोक फिटही असतात. त्यामुळे, तुमच्याकडे पैसा आणि वेळ असेल तर कधीही हे स्पोर्ट आपण सुरु करू शकतो. आपल्या इथे या स्पोर्टला इतकी मान्यता मिळायला वेळ लागेल.

-तू फॉर्मेशन्स मधेही भाग घेतलास?
शीतल: हो. हा फार अवघड आणि तितकाच सुंदर प्रकार असतो. यामधे हेलिकॉप्टरमधून सगळे १०-१२ जण, एकाच वेळेला जम्प करून हवेत वेगवेगळे फॉर्मेशन्स करतात आणि मग सेपरेट होत खाली येतात. यामधे फ्रन्ट फ्लिप, बॅक फ्लिप, साईड फ्लिप, ३६० डीग्री टर्न असे बरेच प्रकार असतात. फॉर्मेशन्समधे सगळ्यांचं ट्यूनिंग जमणं फार महत्त्वाचं आहे. पण आम्ही हवेतच असल्यामुळे रिस्कही खूप असते. साधं उदाहरण सांगते.. जवळ येताना हवेच्या प्रेशरप्रमाणे आम्ही एकमेकांवर धडकू शकतो आणि ही धडक इतकी जोराची असू शकते की प्राणही जाऊ शकतो. माझ्यासमोरच अशी दोघांची धडक झाली होती.. त्यांची तर डोकी, म्हणजे हेल्मेट्स आपटली एकमेकांवर आणि त्यातला एक तिथल्या तिथे बेशुद्ध झाला. अश्या वेळी आपण काहीही करू शकत नाही. फेटल ऍक्सिडेन्ट्स होतात. कधी कधी लोक बरेही होतात, पण त्यांना पॅरॅजम्पिंग नाही करता येत पुढे. यामधेच आता एक ’ए ए डी’ म्हणून डीव्हाईस आलाय.. पॅरॅशूट आपल्याला उघडता आलं नाही, तर याच्यामुळे किमान पॅरॅशूट उघडतं तरी आणि फेटल ऍक्सिडेन्ट होत नाहीत.

-हवेमधे आपण असताना आपल्याकडे काहीच सुरक्षित साधनं नसतात की ज्यायोगे आपण लँड तरी नक्कीच होऊ शकतो?
शीतल: पॅरॅशूट हेच सर्वात सुरक्षित साधन आहे. पण त्यामधेही गडबड होऊ शकते. जेव्हा फ्रीफॉल करतो, तेव्हा कोणत्या हाईटवर आल्यावर पॅरॅशूट उघडायचे आहे हे दर्शवणारा एक ’अल्टीमीटर’ असतो. त्याकडे लक्ष नाही गेलं काही कारणाने, तर कानामधे त्या हाईटला आल्यावर एक ’बीप’ वाजतो. हे इन्डीकेशन असतं की आता पॅरॅशूटची लीव्हर खेचून ते उघडायचं आहे. पण कधीकधी घाई होते, ती लीव्हर आपण नीट उघडू शकत नाही. आणि खाली यायचा वेग प्रचंड असतो. एक एक क्षण महत्त्वाचा असतो. अश्या वेळी मेन पॅरॅशूटमधे काही बिघाड झाला, तर एक मिनी पॅरॅशूट अजून असतं, ते कंबरेच्या बेल्टला असतं, तेव्हा मेन पॅरॅशूट कट अवे करायचं आणि हे उघडायचं. पण हे निर्णय झटपट घ्यावे लागतात. कोणी येऊन आपल्यासाठी पॅरॅशूट उघडू शकत नाही. मी हा अनुभव घेतला आहे, की हेलिकॉप्टरमधून उडी मारायच्या आधी आम्ही सगळेच एकमेकांना थंब्ज-अप करतो, किंवा शेकहँड करतो.. हे करून आमच्या एका कलीगने जम्प केली आणि कसल्यातरी मिसहॅपमुळे तो लँड करू शकला नाही. त्याला हॉस्पिटलाईज केले, पण तो गेला नंतर. हे असं बघितलं की सुन्न व्हायला होतं.
मलाही एक छोटासा ऍक्सिडेन्ट झाला लँड करताना.. माझ्या पावलाचं लिगामेन्ट पार फाटलं, पाऊल प्रचंड सुजलं होतं.. तसा मोठा म्हणायचा, पण तसा किरकोळच.. बाकी लोकांचे जे हाल झालेत, त्यापुढे माझं काहीच नाही. या नंतर मला सक्तीची विश्रांती होती ६ आठवडे, सूज उतरून पूर्ण बरी होईपर्यंत. काही दिवसांनी चालायची परवानगी मिळाली. तेव्हा मला नुसतं बेसवर बसवायचंच नाही. मी सगळ्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून वर जाऊन खाली यायचे. फ्लाईंगची आवड आहेच मला, त्यामुळे मी त्या पायलटलाही अनेकदा विचारलं की मला हे कसं चालवतात शिकव ना, पण त्याने नाहीच शिकवलं! तरी मी वॉच करायची तो कसं आणि काय करतो ते!

-ट्रेनिंगमधे जे बरेच प्रकार शिकलीस, त्यातल्या कोणा एका प्रकारामधे खास काही करावं असं वाटलं?
शीतल: फ्रीस्टाईल जम्पिंग म्हणून एक प्रकार असतो, जो मला खूप आवडला आणि करायला जमलाही. माझे ट्रेनर मला म्हणाले, की तो प्रकार मी नॅचरली चांगला करू शकते. यामधे पहिला फ्रीफॉल घेऊन खाली येईपर्यंत आपण हवे तसे फ्लिप्स, फॉर्मेशन्स करू शकतो.. आपल्यामधे जे टॅलेन्ट आहे ते दाखवू शकतो, कधी एक प्रकार, तर कधी दुसरा प्रकार.. कसंही.. त्यामधे काही लिमिट्स किंवा रूल्स नाहीत की अमूक इतक्या फ्लिप्स झाल्याच पाहिजेत असं. आणि मुख्य म्हणजे मी ते एकटी करू शकते. मला एक फोटोग्राफर लागेल फक्त. पण टीम लागत नाही. आपल्याकडे टीम करणंच मुळात अवघड काम आहे. एक तर हा स्पोर्ट कोणाला माहित नाही, बरं ज्या मुली तरीही थोडंफार जम्पिंग करत आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. एक चांगली मुलगी भेटली होती मला, मराठीच होती. मी तिला विचारलं की आपण टीम बनवूया का? तर ती मला म्हणाली, माझ्या नवर्‍याला आवडणार नाही! मग अश्यावेळी काय बोलणार? हे स्पोर्ट आपल्या देशात वाढणार कसं मग? मला अश्या मुलीच्या माहेरच्यांना, सासरच्यांना सांगायचं आहे की तुम्ही असं का नाही बघत की तुमची मुलगी, सून तुमचं नाव कुठल्या कुठे नेणार आहे ते.. ती घराबाहेर पडेल तेव्हा लोक अभिमानानी म्हणतील की ही अमूक आहे, जी पॅरॅजम्पिंग करते, जी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर रीप्रेझेन्ट करते! हे जोवर होत नाही, तोवर मी एकटीच मला जमेल तसं हे स्पोर्ट फॉलो करणार. आणि एक दिवस निश्चितपणे या स्पोर्टलाही आपल्याकडे मान्यता मिळेल याचा मला विश्वास आहे.

-पण हे स्पोर्ट परदेशात लोकप्रिय आहेच, तर तिथेच जाऊन रहावं, इथे तो पावलोपावली संघर्ष करावा लागेल तो टळेल असं कधी नाही वाटलं?
शीतल: कधीच नाही. आपल्यासारखा देश, आपल्यासारखे लोक आणि आपल्यासारखं अन्न कुठेच नाही मिळू शकणार. आपल्याकडची साधी चटणी-भाकरी खाल्ली तरी एक समाधान मिळतं. मला सरकारी कामात, अनेक परमिशन्स घेताना इतका त्रास झाला, की असं वाटलं की आता माझं काम होऊच नाही शकणार! आणि नेमक्या त्याच वेळी मला कोणीतरी मराठी माणूस, कोणी महाराष्ट्रियन भेटला आहे, ज्याने माझं काम जरी केलं नाही, तरी मला जमेल ती सर्व मदत केली आहे. आणि असा माणूस भेटल्यावरच माझी पुढची कामं फटाफट झाली आहेत. त्यामुळे मी हा देश सोडायचा विचारही नाही करू शकत. मी बरेच देश फिरले आहे, अनेक प्रकारचे लोक बघितले आहेत. पण ’कायम जाऊन रहावं’ असं मला कधीच नाही वाटलं. हा माझा देश आहे आणि इथे मला हे स्पोर्ट आणायचे आहे, बस्स! मी ठरवले आहे की कितीही वेळ का लागेना, पण इथेच जे काय करायचं ते करायचं. मला माझा पासपोर्ट हा भारतीय पास्पोर्टच हवा आहे शेवटपर्यंत.

-पुढच्या योजना काय आहेत?
शीतल: बर्‍याच आहेत. माझ्या डोक्यात सतत तेच चालू असतं, की आता पुढे काय करता येईल, कसं करता येईल? माझे सगळे ब्ल्यूप्रिन्ट्सही तयार आहेत. मला एका सेन्ट्रल लोकेशनला पॅरॅजम्पिंगचे ट्रेनिंग सुरु करायचे आहे. असं लोकेशन की भारतातले सगळे लोक जिथे सहजपणे येऊ शकतील. हे स्पोर्ट नक्की काय आहे, त्यात काय मजा आहे हे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे मला. बेसिकली हे स्पोर्ट मला भारतामधे आणायचं आहे आणि त्याकरता झटायची माझी तयारी आहे. मला वेळ मिळेल तसतसे माझे सगळे अनुभव लिहूनही काढायचे आहेत, म्हणजे लोकांना एन्ट्रीलेव्हलपासून यातले खाचखळगे कळू शकतील. तसंच नवीन नवीन उंचावरच्या ठिकाणी जाऊन मला तिथून जम्पिंग करायचे आहे. खूप बेत आहेत मनात. वैयक्तिक सांगायचं, तर मी आधी बोलले तसं, मला फ्रीफॉल जम्पिंग मधे काहीतरी करायचं आहे, आपली टीम होऊ शकली तर वर्ल्ड इव्हेन्ट्समधे भारताची टीम म्हणून भाग घ्यायचा आहे. बेसिकली, पॅरॅजम्पिंग आणि फ्लाईंग हेच माझं करीयर आहे आणि त्यामधे जे जे काही शक्य आहे ते ते सगळं मला करायचं आहे, आणि ते होईल असा मला विश्वासही आहे.

शीतलच्या जिगरचं कौतुक वाटल्यावाचून राहवत नाही. तिच्या मनातल्या सर्व योजना पूर्णत्वास जावोत आणि तिचे सर्व बेत सुफळ संपूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त करून आम्ही या धाडसी मुलीचा निरोप घेतला.

लेखन प्रकार: