कथा

पातक

नेहमी पाय घासत चालणारा त्याचा एक कलीग शेजारून गेला, अन् त्याच्या अस्वस्थपणात आणखीच भर पडली. याला एकदा कान पकडून असा पाय घासत चालत जाऊ नकोस, म्हणून खडसावून सांगावे असे त्याला खूपदा वाटे. पण असलं काही त्याच्या स्वभावातच नव्हतं. चूप बसून होईल ते बघावं, हा खाक्या. कुणाशी फारसा मिसळत नसे; पण मितभाषी असला, तरी गोड बोलण्यामुळे माणूसघाणेपणाचा आरोप सहसा कुणी करीत नसे.

आधीच हबच्या नवीन डिझाइनवरून डीजीएमशी वाद झाला होता. अर्थात वाद घालणारा डीजीएम! याचे काम फक्त अस्वस्थ होऊन ऐकत राहणे. स्वतःचे मुद्दे पटवून देता न आल्यामुळे मनाशीच चरफडणे, मग डिप्रेस वगैरे होणे.. इत्यादी इत्यादी.

लेखन प्रकार: 

देवी

वार्‍याच्या झोतानं दार किंचितसं करकरत उघडलं, तसा भोवतालच्या शांततेवर एक चिरत जाणारा ओरखडा उमटला. कोपर्‍यातल्या जुनाट घड्याळानं हात लांबवून चाराच्या पुढे टेकवला, तशी स्वयंपाकघरात झोपलेली जनूची म्हातारी आई जागी झाली. राम-राम पुटपुटत तिनं आपली थकलेली कुडी आवरून घेतली अन् पोचे आलेल्या, काळ्याकुट्ट तपेलीमधे चहाचं आधण ठेवलं.
"जनू, ए जनू, उठतोस ना रे बाबा...चहा घेऊन जा तुझ्या भावासाठी......"

लेखन प्रकार: 

दिगूलीला

"अहो, पिंप शोधताय की झोपा काढताय माळ्यावर?"
भिडेकाकू खालून करवादल्या, तसे माळ्यावर चढलेले दिगूअण्णा दचकले.
"शोधतोऽऽय, शोधतोऽऽय...पिंपच शोधतोय.."
"मेला इतका कसा वेळ लागतो? एवढं मोठं तांब्याचं पिंप, खाचा झाल्या की काय डोळ्यांच्या?"
"अगं ह्या गोणत्यात किती भांडी ती? शोधायला लागणारच ना वेळ."
"अहोऽऽ, गोणत्यात कुठलं मावायला ते पिंप? एक काम धड करतील तर शप्पथ," काकू पुन्हा एकदा करवादल्या.
"इतकी धडपड करून मी तुझं पिंप शोधतोय त्याचं तुला काहीच नाही..." जमेल तेवढ्या क्षीण आवाजात त्यांनी उत्तर दिले.

लेखन प्रकार: 

सुशीलाकाकू आणि तत्सम

सुशीलाकाकू आणि तत्सम पंचेचाळिशी-आसपास सुखवस्तू-संवेदनशील बायकांबद्दल तिला एक विचित्र, हिंस्र राग होता.

म्हणजे तिच्याखेरीज दुसर्‍या कुणाला ते कळलं नसतंच. उलट तिचं या सगळ्या बायकांशी असलेलं गूळपीठ तसं प्रसिद्धच. त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं, की ती कड घ्यायला धावलीच. पण तरी आत राग होताच. नेमका कसला राग, असा प्रश्न स्वत:लाच अनेकवार विचारूनही उत्तरावर बोट ठेवता येत नसे; आणि राग अजून अजून धुमसतच जाई.

लेखन प्रकार: 

ती...स्वप्नपरी..!

सवयीने घड्याळाकडे नजर गेली. नऊ वाजले, म्हणजे 'ती' आता बसस्टॉपवर उभी असेल तिच्या मैत्रिणींबरोबर. घरातून निघून गाडीत बसल्याबरोबर मन तिचाच विचार करायला लागतं आजकाल. बसस्टॉप जवळ आला, की आपसूकच लक्ष घड्याळाकडे जातं.

लेखन प्रकार: 

गड आला, पण सिंह गेला

"पण स्टेजवर पोटात तलवार खुपसल्यावर रक्त कसं काढायचं महश्या?" हातातली काठी तलवारीसारखी फिरवत एसआर हायस्कूलच्या बोळातून चोरवाटेने गुळवणी बोळाच्या तोंडावर बाहेर पडताना मी महश्याला म्हटलं. अशा अनेक चोरवाटा आम्ही शाळेतून परत येताना हुडकून काढल्या होत्या. एक चोरवाट तर आमच्या वाड्यातल्या मागच्या अंगणातल्या संडासाच्या पाठीमागून निघून अण्णेगिरींच्या वाड्यातून रस्त्यावर बाहेर पडायची. शिवाजीचे सैनिक ह्याच चोरवाटेने हिंडत असणार, अशी माझी आणि महश्याची खात्री होती.

लेखन प्रकार: 

त्रिशंकू

लेकीचं आणि स्वत:चं जेवण आटपून मेघना जरा निवांत टेकते ना टेकते, तोच फोन वाजला. आठवड्यातून तीनदा न चुकता रात्री दहा वाजता वाजणारा फोन म्हणजे नक्की अभिजित ! रोजच्यासारखाच अंगावर आलेला एक गच्च दिवस, आताच्या चार मोकळ्या क्षणांना चपलेतल्या खड्यासारखे बोचणारे उद्याचे विचार आणि शेजारी झोपेला आलेली कुरकुरणारी पोर. किती वेळ आणि काय काय बोलता येणार आहे अमेरिकेत जाऊन बसलेल्या नवर्‍याशी ? आणि बोलण्यासारखं जिव्हाळ्याचं असं खरंच काही आहे का आपल्यात ? ... म्हणजे अर्थात सोनू सोडून. काहीशा कंटाळ्यानेच तिने फोन उचलला. "काय म्हणताय ?" पलीकडून ठरलेलाच प्रश्न आणि त्यावर मेघनाची ठरलेली उत्तरं.

लेखन प्रकार: 

आवा, ई कोकणवा हमार है बा!

हुस्स्-फुस्स् करत गाडी स्थानकात थांबली आणि उतरणार्‍यांची एकच झुंबड उडाली. जगन देखील आपली पिशवी सांभाळत कसाबसा उतरला. बघता बघता फलाटावर एकच गर्दी झाली. जगनने खांद्यावरची पिशवी खाली ठेवून मस्तपैकी आळस दिला. जनरल डब्यात गर्दीत बसावे लागल्याने अंग चांगलेच आंबले होते. आळस झटकत जगनने पिशवी परत खांद्यावर लावली आणि स्थानकाच्या बाहेर पडला. समोरच सगळ्या राजकीय पक्षांचे नेते हात जोडून गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करत फलकांवर झळकत होते. सगळ्या फलकांवर "कोकणचा विकास, हाच आमचा ध्यास" अशी वाक्ये झळकत होती.

लेखन प्रकार: 

दिसामाजिं काहीतरी....

मी तसा प्रसिद्ध लेखक आहे. नामवंत प्रकाशक माझी पुस्तके छापतात आणि ती खपतातही. काही पुस्तकांच्या दुसरी तिसरी (कधी पाचवी सहावी) अशा आवृत्त्याही निघाल्या. म्हणजे मी लोकप्रिय आहे यावर शिक्कामोर्तब व्हावे. पुस्तक प्रदर्शनांमध्ये माझी पुस्तके असतात त्या ठिकाणी वाचकांची बर्‍यापैकी गर्दी असते. त्यात तरुण मुलंही बरीच असतात. माझ्या पुस्तकांतले काही विचार, वाक्यं तरुणाईला आजही भुरळ घालतात, असं परवाच एका मासिकात माझ्यावरच्या लेखात लिहिलं होतं.

मी आता पन्नाशीच्या पुढे आहे. तरीही खूप सुचतं, लेखन करावंसं वाटतं. याला कारण माझ्या वाचकांचा माझ्यावर असलेला लोभ.... हं हे जरा माझ्या सार्वजनिक भाषणासारखं व्हायला लागलं बरं का! तर ते बाजूला ठेवूया जरा.

आजही मी रोज नेमाने लेखन करतो. 'दिसामाजिं काहीतरी ते लिहावें' वर आमच्या पिढीतल्या लेखकांचा तसा खूप विश्वास. कुठलीशी इंग्रजी लेखिका... अगाथा ख्रिस्ती बहुधा... किंवा अजून कुणी असेल. तुम्हाला म्हणून सांगतो माझा इंग्रजी साहित्याचा तेवढा व्यासंग नाही. तर ती म्हणे, काही लिहिण्यासारखं नसेल तरी टाईपरायटरावर काहीतरी टायपत बसायची. मला मात्र रोज काहीनाकाही सुचतंच. ही देवाची कृपाच म्हणायची.... माझं तर स्पष्ट मत आहे की लेखकाने रोज लिहीत राहिलं पाहिजे. आळस करता कामा नये. कधी लिहिलेलं चांगलं उतरतं; कधी नाही. पण लिहावं.

पण एक काळ... बरं का असाही येऊन गेला माझ्या लेखन कारकीर्दीत की, मी सहा महिने काही लिहिलंच नाही. इतकी वाईट अवस्था की हातात पेन धरवेना. नुस्ती घुसमट... तगमग... लिहायला बसलो की ती एक घटना पुनःपुन्हा आठवायची. मग लिहायची इच्छाच नाहीशी व्हायची. आज मी तुम्हाला सांगतोय ही त्याबद्दलचीच गोष्ट आहे.

तेव्हा मी होतकरू लेखक होतो. दोन चार पुस्तकं गाजलेला. लोक महाराष्ट्रात मला ओळखू लागले होते. बर्‍याच समारंभांसाठी मला 'प्रमुख पाहुणे', 'माननीय वक्ते' म्हणून ठिकठिकाणांहून बोलावणी यायला लागली होती. मीही मजा म्हणून काही समारंभांना हजेरी लावीत असे. माझ्या पुस्तकांची तिथं होणारी अफाट स्तुती मला काही काळ हवेत नक्कीच घेऊन जाई.

'मध्यमवर्गाचं नेमकं चित्र रेखाटण्याबाबतीत यांचा हात कुणीही धरू शकणार नाही,' वगैरे ऐकलं की मान अजून ताठ व्हायची.
"मध्यमवर्गाचं चित्रण करण्याचं काय हो? मीही याच वर्गाचा तुमच्यासारखा घटक नाही का? हे मी लिहितो ते माझं आयुष्य आहे, तुमचं आयुष्य आहे. कदाचित म्हणून ते तुम्हाला भिडत असावं," मी खोट्या विनयाने भाषण करी. श्रोतेही त्या भाषणावर बेहद्द खूष होत.

तर असाच एक कुठलासा समारंभ. एक आडगावातलं कॉलेज होतं ते. तिथे 'विद्यार्थीमित्रांशी हितगुज' अशा चालू फॅशनच्या नावाच्या एका कार्यक्रमात भाषण करायला म्हणून मी तिथे यावं, म्हणून त्या विद्यार्थीमंडळाचे चिटणीस व इतर विद्यार्थी माझ्याकडे आले होते.

"सर, आजच्या तरुण पिढीपुढचा आदर्श आहात तुम्ही. (त्यावेळी मी तिशी जेमतेम पार केली होती.) लहान वयात आपण मिळवलेली साहित्यप्रांतातली कीर्ती. आमचे विद्यार्थी धन्य होतील सर....." मी त्या स्तुतीने विरघळत चाललो होतो. तरी उगीचच डायरीत ती नेमकी तारीख उघडून विचार केल्यासारखं दाखवलं. खरंतर दिवस मोकळाच होता. तोच काय अख्खा आठवडा मोकळाच होता.

"बरं, जमवतो मी नक्की." मी होकार दिला आणि मानधनाचं वगैरे ठरवून मंडळी दहा मिनिटांत गेलीही. मी भाषणाची जुळवाजुळव करत मजेत पडून राहिलो.

ठरल्यावेळी मी स्टेशनावर उतरलो तेव्हा विद्यार्थी माझ्या स्वागताला हजर होतेच. गाडीला गर्दी फारशी नव्हती. त्यातून श्रावणाचा महिना. प्रवास सुरेख झालेला. विद्यार्थ्यांनी हारबीर घातले. एकांकडे जेवायची व्यवस्था केली होती. चवदार जेवण होतं. थोडी विश्रांती मग सभागृहाकडे प्रयाण... नेटका कार्यक्रम होता. कसं छान सुरु होतं सारं. 'सर... लिखाण कसं करावं याबद्दल थोडं बोला ना...' मुलांनी गिल्ला केला.

'अनुभवांनी लेखक समृद्ध होत जातो. ज्यावर लिहावं असं बरंच काही तर आपल्या आजूबाजूला रोज घडत असतं. माणसं वाचायला शिका. येणारे विविध अनुभव डोळसपणे घ्यायला शिका. मग लिहा... तुमचं लिखाण कसं जिवंत होईल मग...'
नेहमीप्रमाणे इथेही मी हुकमी टाळ्या वसूल केल्याच.

...... रात्रीची आठची वेळ. माझी गाडी साडेआठला होती. दिवसभर कोवळं ऊन होतं पण संध्याकाळी आभाळ विचित्र भरून आलं. सातपर्यंत पावसाने जोर धरला. त्यात वीज गेली. मी आटोपतं घेऊन लवकरच स्टेशनवर पोचायचा प्रस्ताव मांडला. हो, उगीच कुठेतरी अडकून पडून परतीची गाडी चुकायला नको.

मला दोन विद्यार्थी सोडायला आले स्टेशनापर्यंत. तेव्हा पावणेआठ वाजत होते. काही मिनिटांतच त्या दोघांची चुळबुळ सुरू झाली.
"काय रे? काही प्रॉब्लेम आहे का?"
"नाही सर. आम्ही..... निघावं म्हणत होतो. पण तुमच्यासोबत कुणीतरी हवं ना... आमची उद्यापासून परीक्षा आहे. त्यातच ही अवांतर कामं.... अभ्यास राहिलाय. फक्त तुम्ही होता म्हणून अभ्यास टाकून .... तुमचं भाषण ऐकायला आलो सर..." तो मनापासून बोलत होता.
"अरे... मग तुम्ही निघा लगेचच. इथे मला पोचवल्याबद्दल धन्यवाद. आता काय मला गाडीत चढून बसायचं आहे फक्त.... तुम्ही खरंच निघा."
"नक्की ना सर? आपल्याला काही त्रास तर नाही होणार ना सर?"

पुनःपुन्हा ते विचारत होते. मी त्यांना निरोप दिला. आठ वाजलेच होते. गाडीला जेमतेम अर्धा तास बाकी होता. जाईल आरामात वेळ, मी विचार केला.....

ते दोघं निघून गेले. स्टेशनावर मी आता एकटा राहिलो. पाऊस थांबला होता जवळजवळ. स्टेशनावर मिणमिण ट्यूबलाईट्स. केवळ स्टेशनावरच येऊ शकतो असा घाण वास. त्यातच भजी, वडे वगैरेंचा तळकट वास मिसळलेला. जवळच खाद्यपदार्थांचा स्टॉल होता. दूर कुठेतरी पाणी गळण्याचा आवाज. आसपास पडलेला कचरा. सिगारेटची थोटकं. गर्दी तुरळक. बाजूला एका माणसाचे गोणत्यात बांधलेले बरेच बोजे. पलिकडे एका बाकावर एक कुटुंब बसलेलं. डबे उघडून काहीतरी खात होते. त्या घाणीत खायचं कसं सुचत होतं देव जाणे! बाकी रेल्वे स्टेशनात दिसणारी नेहमीची जनता. हमाल, चहावाले, खेळणी विकणारे. मीही एक बर्‍यापैकी बाक बघून तिथे टेकलो. तितक्यात घोषणा कानी पडली....

'XXXX एक्स्प्रेस दोन तास उशिरा धावत आहे.'
मी चरफडत रेल्वेला शिव्या घातल्या. कधी साल्या गाड्या वेळेवर धावत नाहीत..... दोन तास? मी घड्याळ बघितलं. सव्वाआठ वाजले होते. साडेदहापर्यंत वेळ कसा काढायचा आता? मघाचे दोन विद्यार्थी केव्हाच सटकले होते. मला त्यांचाही आता राग येऊ लागला होता. कसली परीक्षा अन् कसलं काय? तुमच्या भाषणासाठी अभ्यास टाकून आलो म्हणे! थापा... निव्वळ थापा... कामं टाळायला निमित्त पाहिजे फक्त. मी चरफडत बसून राहिलो.

८:२५.... दहा मिनिटं फक्त? वेळ जाता जाईना. सारखं घड्याळ बघून तरी काय करणार? उठलो. इकडून तिकडे उगाच फेर्‍या मारू लागलो. समोरच रेल्वेचा टिपिकल चहा कॉफीचा स्टॉल होता. काहीतरी करायचं म्हणून एक कप चहा घेतला.

'ए, मला देतो का घेऊन चाहा?'
मी दचकलोच. वळून पाहिलं. मागे 'ती' उभी होती. हो... 'ती'च! कारण तिचं नाव मला शेवटपर्यंत कळू शकलं नाही.
मळकी-फाटकी हिरव्या रंगाची साडी, लाल ब्लाऊज, हातात प्लास्टिकच्या लाल बांगड्या, भुरकट-राठ केसांना बांधलेली लाल रिबीन आणि भावहीन चेहरा... हातात कसलंसं छोटं बोचकं होतं. ते तिने छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं. मला तिच्याकडे पाहून एकदम शहारल्यासारखं झालं.

स्टॉलवाला एव्हाना तिला हाकलायला लागला होता.
"ए येडे, चल निघ... निघ इथून. काठी फेकून मारेल. साला तरास... कुणालापन चा मागते..."
ती खवळून त्याच्या अंगावर धावून गेली.
"ए तुज्या XXXXX, तू का शिव्या देतो? तुला मागितला का फुकट चाहा? तुला मागितला? हरामी.... तू पैशे घे, चाहा दे. कोण पिणार याची तुला का पंचाईत रे?"
"एऽऽऽ, मी दिल्या शिव्या का तू?" तो तिच्यावर ओरडला.

त्यांची चांगलीच जुंपणार, असं दिसल्यावर मी मधे पडलो. स्टॉलवाल्यासमोर पैसे ठेवले. 'दे तिला चहा!'
'सायेब, तिला नस्ती मेहरबानी दाखवू नका. वेडी हाये ती. साली... अंगात लई रग आहे. कुणावरपन धावून जाते. आख्ख्या स्टेशनाला तरास...' बडबडतच त्याने प्लास्टिकचा कपभरून तिला चहा दिला. तिचं लक्ष फक्त चहाकडे होतं. त्याच्या त्या बडबडीला तिने काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. चहाचा कप उचलून ती चालू पडली. लांबवर एका बाकावर एक पाय पोटाशी घेऊन चहाचे घोट घेत राहिली. मधूनच एकटक कुठेतरी बघत रहायची.

मी तिच्यापासून थोडा लांबवर बसून तिला न्याहाळू लागलो. कोण असेल ही? कशाने हे असं झालं असेल हिचं? हिला घर असेल का? घरच्यांनी टाकून तर दिलं नसेल? नवर्‍याने टाकलेली बाई असेल का? छळाला कंटाळलेली का रोग वगैरे??? मला प्रश्नांनी भोवंडून टाकलं.

मी तिच्याकडे बघत असल्याचं कळल्यासारखी ती अचानक वळली. माझ्याकडे पाहून हसली. स्टेशनावरच्या त्या रात्रीच्या वातावरणात तिचं हसू अजूनच भयाण वाटलं. अचानक तिला काय वाटलं देव जाणे! एकदम उठून ती माझ्या दिशेने यायला लागली. मला चटकन उठून पलिकडे जायचंही सुचलं नाही. ती जवळ येऊन उभी राहिली. मला विचित्र नजरेने निरखत राहिली. ती तिची नजर मला सहन होईना.

"काय आहे?" मी जरा वरचा सूर लावला.
"थेन्क्यू साहेब." वेडीला थँक्यू वगैरे शिष्टाचार माहीत असणं म्हणजे नवलच! मी कुतुहलाने तिच्याकडे बघत राहिलो.

तिला तेवढंच बोलायचं होतं बहुधा. ती पुन्हा दूर जाऊन बसली. अचानक जोरजोरात हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू आले. वळून पाहिलं तर स्टेशनाच्या दारातून पाच-सहा मुलं आत येत होती. त्यांचा एकंदरीत अवतार बघितला तर ती स्टेशनातच राहत असावीत हे सहज कळत होतं. त्यातला सगळ्यांत लहान मुलगा जेमतेम ७-८ वर्षांचा असेल. बाकीचीही ९-१० पासून १३-१४ पर्यंतच्या वयाची. ती आपसांत काहीतरी विनोद करून सारखी मोठमोठ्याने खिदळत होती. त्यांचं त्या वेड्या बाईकडे लक्ष गेलं.
"बघा रे, वेडी पुन्हा वापस आली रे...." एकजण खिदळला. एकाने हळू आवाजात इतरांना काही सांगितलं. परत सगळे खिदळले. ती एका बाकावर बसून त्यांच्याकडे पाहत होती. चेहरा संतापाने वेडावाकडा झालेला तिचा....
"ए वेडी, वापस कशाला आली? म्हातार्‍याशी लगीन करायला आली काय?" अजून एक तिच्याकडे पाहत ओरडला.
"लगीन करून तुम्ही दोघं हितेच स्टेशनात र्‍हाणार काय?"
"उस दिन क्या बोला था रे छोटू तूने? फिरसे बोल.... "
"वेडीचे बच्चे वेडे होनार का शाने होनार?"
"चल, बेट लाऊ... पैला बच्चा वेडा होनार."
"तोपन हितेच स्टेशनात राहनार? का वेड्याच्या हास्पिटलमधे डायरेक?"
"स्टेशन तुझ्या बापाचं काय रे भडव्या?" ती उसळलीच. "तुझ्या मालकीच्या जागेत राहते काय रे मी? साले, सगळी हरामी अवलाद. आयXX साले. आईबापाने स्टेशनावर फेकून दिलेले पोरं..."

झालं. तिची आणि पोरांची आता चांगलीच जुंपली. शिव्यांच्या फैरी झडायला लागल्या. वेडीचा आवाज संतापाने चिरकलेला. मुलांना मात्र तिला चिथवल्याची मजा वाटत असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात कुठूनसा एक पोलिस दंडुका उगारून तिथे अवतरला (एरवी मी कधी रेल्वे स्टेशनात पोलिस पाहिला नव्हता. इथे कसा होता कुणास ठाऊक!)...
'साले, कुत्र्याच्या अवलादी..... रोजचे तमाशे करतात....' त्याने सरळ दंडुक्याचे फटके लगावायला सुरुवात केली. पोरं बिलंदर होती, हां-हां म्हणता पसार झाली. वेडी मात्र पोलिसाच्या तावडीत सापडली. त्याने पोरांचाही राग तिच्यावर काढायला सुरुवात केली. जीव खाऊन तो फटके हाणत होता. पण बाई दगडाची... बराच वेळ फटके खाऊनही तोंडातून आवाज नाही. अचानक एक फटका बहुधा वर्मी बसला. तो गुरासारखी किंचाळली. हवालदार भेदरला. मारता हात थांबवून तो तिच्याकडे वळून बघत बघत लांब गेला.

ती कितीतरी वेळ तशीच पडली होती. मेलीबिली तर नसेल ना? मला खूप अस्वस्थ व्हायला झालं. ही गाडी अजून का येत नाही? मी घड्याळ बघितलं. जेमतेम साडेनऊ होत होते. मी पुन्हा तिच्याकडे नजर टाकली. ती तशीच लोळागोळा पडून होती. एक म्हातारा हमाल हळूहळू तिच्यापाशी गेला. त्याने तिला हलवून बघितलं. ती क्षीण कण्हली.

हुश्श! मला जरा हायसं वाटलं. जिवंत तरी होती ती! म्हातार्‍याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिला आधार देऊन उठवायचा प्रयत्न करायला लागला. पण त्याला ते काही जमत नव्हतं. तिला तर शुद्धही नव्हती. त्याने मदतीच्या आशेने इकडेतिकडे बघितलं. मघाच्या त्या कुटुंबाच्या जोरजोरात गप्पा चालल्या होत्या. बोजे असलेला माणूस बसल्याजागी पेंगत होता. स्टेशनावरचे नेहमीचे लोक त्यांना बघून न बघितल्यासारखं करत होते. त्याने माझ्याकडेही दोन-तीन वेळा बघितल्यावर माझा नाईलाज झाला. मी अनिच्छेनेच उठून म्हातार्‍यापाशी गेलो. आम्ही दोघांनी तिला आधार देऊन एका बाकावर झोपवलं. तिला जरा शुद्ध आली होती. त्याही स्थितीत तिच्या चेहर्‍यावर उमटलेलं आश्चर्य मला जाणवलं. तिला सोडून मी माझ्या सामानापाशी परत आलो. बसल्यावर पुन्हा बघितलं, तर तिचं ते बोचकं ती पडली होती, तिथेच पडलं होतं. वेडीने मार खातानाही बोचकं हातातून सोडलं नव्हतं. काय एवढं महत्त्वाचं सामान त्यात होतं, देव जाणे!

प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या टोकाकडून पुन्हा त्या मुलांचे आवाज ऐकू आले. त्यातला एक मुलगा,
'म्हातार्‍याचं नि वेडीचं लगीन लावा...' असं काहीतरी जुळवलेलं गाणं मोठमोठ्याने म्हणत होता. पुढेही बरंच काही अश्लील... त्याच्या वयाला ते शोभत नव्हतं. टोळक्यातली इतर मुलं खूष होऊन मोठमोठ्याने हसत होती. तो म्हातारा हमाल नेहमीच त्या वेडीला मदत करत असणार. हा आज घडलेला तमाशाही नेहमीचाच असणार.

काय त्या बाईच्या नशिबी आलं होतं? कदाचित चांगल्या घरातली असावी. घरातल्यांनी कुठल्यातरी कारणावरून घराबाहेर काढलं असणार. मग ही भ्रमिष्टावस्था... तिला काहीतरी आठवत असेल का? ती बरी असेल तेव्हा चांगली दिसत असेल, चांगली राहत असेल. तिचं छोटंसं का होईना एक घर असेल. मग हे? का?

ती आता उठून बसली होती. मधून मधून कण्हत होती. मी मधूनच तिच्याकडे तर मधूनच घड्याळाकडे नजर टाकत होतो. वेळ जाता जात नव्हता. मी काहीतरी चाळा म्हणून बॅग उघडली. आतून ज्यात नेहमी लिखाण करायचो ती वही नि पेन काढला. पानं उलटून काही लिहिणार ('दिसामाजिं काहीतरी...' चा नेम होता ना माझा!) तोच मला ते कात्रण दिसलं.

'मध्यमवर्गातल्या त्याच त्याच पात्रांवर तेच तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणी धरू शकत नाही. यात बिचार्‍या लेखकाचाही दोष नाही. मध्यमवर्गापलिकडलं अफाट जग बिचार्‍याने कधी बघितलेलंच नाही. अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार?......'

नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो. त्यात कुणाचे काय गेले? लेखकाला प्रत्येक तर्‍हेच्या आयुष्यावर लिहिण्याची काय सक्ती असते की काय? माझे वाचक माझ्या पुस्तकांवर होते ना खूष? तेवढे पुरेसे नव्हते का?

अचानक मनात विचार चमकून गेला. या वेडीवर लिहावे का? घ्या, मध्यमवर्गापल्याडचीच गोष्ट आहे म्हणावं. मी कागद समोर ओढून ओळी खरडायला सुरुवात केली.

"श्रीराम... श्रीराम" बाजूला आवाज आला म्हणून मी मान वळवून बघितलं. मघाचा तो म्हातारा हमाल माझ्याशेजारी येऊन बसला होता. माझं त्याच्याकडे लक्ष आहे असं वाटल्यासारखा तो बोलायला लागला. बरंचसं स्वतःशी आणि काही माझ्याशी....
"सायेब तुमी सांगा हे बरं का?.. काहून ही पोरं तिला तरास देत्यात? सगळे माजलेत. राहनार सगळे हितेच. पण ती त्यान्ला काय डिष्टर्ब करत नाई वो. तेच रोज हिला छळणार आनि ही भांडणार. तेपन शिव्या देनार. पण मार कोनाला? हिला... एकदा नाई शेंभरदा सांगितलं, नको त्यांच्या नादी लागत जाऊ. ध्यानात राहील तर ना वो...

काय प्राब्लेम झाला तिचा कुनाला ठावं... मुंबईत होती का काय जनू... हिकडं कुनी आनून टाकलं ठावं न्हाई. आनली तवा बेसुध व्हती ती. जाग आली न् काय झालं कुनाला ठावं! डोस्कं फिरल्यागत झालं तिचं. रडत काय व्हती, मोठ्यानं वरडत काय व्हती... सारखी मुंबईची गाडी कोन्ची? मुंबईची गाडी कोन्ची? गाडी आली की पळत जानार, पन गाडीत चढनार नाय... गाडी निघून गेली की ठेसनावर कपाळ बडवत बोंबलनार. मंग तेबी बंद...
आता मुक्यावानी हिंडती, नायतर कोपर्‍यात बसून असती. फकस्त तिला कुनी वावगं, वंगाळ बोललं की लई खवळती.. लई खवळती... तीपन काय करनार वो?" त्याचा आवाज हळूहळू लहान होत गेला. 'श्रीराम... श्रीराम' फक्त ऐकू येत राहिलं.

मला एक अक्षरही लिहवेना. मी उठून पुन्हा चहाच्या स्टॉलपाशी गेलो. एक चहा घेतला, पार्ले-जीचा पुडा घेतला. तिचं बोचकंही उचललं. ती बसली होती तिथे गेलो.

"तात्या, खूप मारलं... आंऽऽऽऽ...." माझी चाहूल लागताच ती म्हणाली. तिला तो म्हातारा हमाल असावा, असं वाटलं असावं. मात्र चहाचा कप बघून तिने एकदम चमकून वर पाहिलं.
"सायेब... मघाचा चहा... बास..." माझ्याकडे पाहून ती पुटपुटली.
"घे चहा... बिस्कीटंपण घे." मी तिच्याशेजारी पुडा ठेवला.
"हे तुझं बोचकं...." मी ते तिच्या बाजूला ठेवलं. तिने ते उघडून बघितलं. रंगीत, जर लावलेल्या ओढणीचा एक मोठा तुकडा होता. बांगड्या होत्या. दोनचार लिपस्टिक्स, नेलपेंटच्या रिकाम्या बाटल्या. अजूनही काहीकाही... तिने पुन्हापुन्हा ते सगळं तपासून बघितलं. पुन्हा बोचकं बांधून शेजारी नीट ठेवलं.
"मुंबईत असते आता मी... सायेब.. तर हा आयXX माझ्या अंगाला हात लावू शकला नसता. नुस्तं अंगाला हात लावू द्यायचेई पैशे घ्यायचे मी.. मोजून पैशे घ्यायचे. हज्जार.. दोन हज्जार... दाहा हज्जार... लोग पैसा फेकते थे अपुनके सामने. हा भडवा स्टॉलवाल्यांकडनं पाच दाहा रुपये खातो. ह्याला तर मी गेटावर उभा ठेवला असता. मस्त पैसा होता. जिंदगी मस्त होती साली. डोकं फिरलं माझं. सक्सेनाशी शादी करायला निघाले मी. सक्सेना... हरामी... कुत्र्याची अवलाद. लगीन नव्हतं करायचं तर सोडून द्यायचं ना मला... पण नाही... हालहाल केले माझे. रोज मारलं. मी त्याला खूप त्रास देते म्हणायचा. एक दिवस ड्रगचं इंजेक्शन टोचून या स्टेशनावर आणून सोडलं. माहीत होतं ना.. त्याला माहीत होतं. ह्या स्टेशनाचा शाप आहे मला... मीच बोल्ले होते ना त्याला... मीच सांगून टाकलं.... तब अपुन प्यार मे पागल था... साली जिंदगी बरबाद झाली..." ती अचानक गदगदून रडू लागली, हुंदके देऊ लागली.

"मला माझा ऐशोआराम परत पायजे. माझा पैसा, एस्ट्राचे रोल्स... मला सगळं पायजे. बास झालं इथे कुत्र्यागत जगणं.. मला मुंबईला जायचंय. पण स्टेशनाचा शाप... तो कधी सुटणार? शाप... स्टेशनाचा... " ती असंबद्ध बरळत राहिली.
"तू मुंबईची आहेस?" मी अभावितपणे विचारलं. ती रडं थांबवून माझ्याकडे डोळे विस्फारून बघत राहिली नि अचानक खदाखदा हसत सुटली.
'मुंबईची? मुंबईची??????? येस्स... अपुन मुंबईकाईच. पण माझ्या गावठी आईबापाला मंजूर नवतं ते. मुंबईचं नाव काढलं की घाल मला लाथा. कोंड मला खोलीत. मला हिरॉईन व्हायचं होतं. नाय जमलं तर एस्ट्रा.. पण सिनेमावर आपली जान कुर्बान. आईबापाला नाय पटायचं. अडाणी साले!
मग रमेश होता ना रमेश... उसके साथ अपुन भाग गया मुंबई. म्हणाला, काम होईन तुझं... पण मोबदला दे. मुडदा... मोबदला काय ते माहीत होतं माला... घे म्हटलं. सिनेमात काम करण्यासाठी काहीही... भडव्याने पुरेपूर मोबदला घेतलान्. माझं पोट वाढलं न् मला टाकून तो गायब झाला... पार गायब... गडप..." ती पुन्हा हुंदके देऊ लागली.

मला त्या सगळ्या गोष्टीचीच शिसारी आली. शी: या असल्या बाईवर मी कथा लिहिणार होतो? माझ्या वाचकांनी जोडे हाणले असते मला. सगळी लोकप्रियता धुळीला मिळाली असती. मी तिथून निघून जाण्यासाठी पाय उचलला.
"सायेब... माझा शाप... सुटेन का हो? मला मुंबईला जायचंय." एवढं सगळं भोगत असूनही डोक्यात फक्त हेच? माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. तिथे जायचं ते धंदा करायलाच ना? मी खरमरीत काही बोलायला तोंड उघडलं. ती माझ्याकडे आशेने पाहत होती.
मला काय वाटलं कुणास ठाऊक?
"होईल बाई तुझ्या मनासारखं." मी काहीतरी पुटपुटलो.
तिथून लांब जाऊन बसलो.
ते मुलांचं टोळकं जवळच बसलं होतं. त्यांच्यात आता तीनपत्तीचा डाव चालू होता. मुलं असल्या सगळ्या गोष्टींत अगदी मुरलेली दिसत होती. ती अचानक उठली. त्या टोळक्यापासून थोड्या अंतरावर येऊन बसली. त्यांना विचित्र नजरेनं निरखत राहिली.

..... त्या टोळक्यात आता भांडण पेटलं होतं. खेळताना काहीतरी फसवाफसवी झाली असावी. त्यातले दोघे पळत सुटले. बाकीचे तीरासारखे त्यांच्यामागे धावले. ते सगळे प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या टोकाला दिसेनासे झाले. तिकडून भांडणाचे अस्पष्ट आवाज येत राहिले. मारामारी चालू असावी. मला अजून अस्वस्थ व्हायला झालं. मी वेळ बघितली. सव्वादहा.. येईलच गाडी १५ मिनिटांत.
तेवढ्यात पुन्हा नतद्रष्ट घोषणा झाली,
'XXXX एक्स्प्रेस अर्धा तास उशिरा धावत आहे.' आज ही गाडी येणार आहे की नाही? आता कुठलीशी मेल पुढे काढली जाणार होती. तिला इथे थांबा नव्हता. नाहीतर त्यात चढून गेलो असतो. या वातावरणातून सुटलो तरी असतो. पण तसं व्हायचं नव्हतं.

पाचच मिनिटांत धडाडधाड करत मेल स्टेशनात शिरली. जराही वेग कमी न करता तिने प्लॅटफॉर्म पार केला. आऊटरच्या सिग्नलपलिकडे गेली असेल नसेल, एक जीवघेणी किंकाळी स्टेशनात घुमली.
इतकावेळ मरगळल्यागत असलेलं स्टेशन जणू खडबडून जागं झालं. सगळीकडे जनता जमा झाली. "क्या हुआ?" "काय झालं?" च्या हैराण चौकशा सुरू झाल्या.
"अरे वो लौंडे है ना स्टेशनपे रहनेवाले.. उनमे से मरा कोई... ट्रेनका धक्का लगा..." कुणीतरी दुरून ओरडलं.

वेडी अचानक खूप उत्तेजित झाली. "कौनसा लौंडा मरा?"
"कुठलं पोरगं? सांग की रे...." ती प्रत्येकाला विचारत सुटली. तिच्या चेहर्‍यावर विचित्र आनंद पसरला होता. मी अंतर्बाह्य शहारलो. इतका द्वेष? इतका तीव्र द्वेष? कुणाच्या मरणाने माणूस इतका आनंदी होऊ शकतो. पलिकडे गर्दी जमा झाली होती. त्या टोळक्यातली दोन मुलं मोठमोठ्याने रडण्याचा आवाज कानावर येत होता.
"वो सबसे छोटा था ना, नीली शर्टवाला... वो मर गया.. ऑन दी स्पॉट मर गया..." कुणीशी उत्साहाने माहिती पुरवली. तो? छोटा मुलगा? मी सुन्न झालो.

वेडी गर्दीत पुढे घुसायला बघत होती. लोकांच्या शिव्या खात होती. पण पुढे घुसत होती. शेवटी ढकलाढकली करून ती पुढे गेलीच.

... पाच मिनिटांनी त्या कोंडाळ्यातून बाहेर पडलेल्या वेडीचा अवतार बघून मी चरकलोच. ती अनिवार हसत होती... गदगदून... मघाच्या यातना, दु:ख, पोलिसाने लगावलेले फटके, मुलांशी झालेलं भांडण कशाचा मागमूस तिच्या चेहर्‍यावर नव्हता. होता तो केवळ भयंकर, उन्मादातला आनंद.
अचानक तिची नजर माझ्याकडे गेली. ती जवळजवळ पळत माझ्याकडे येऊ लागली. माझे पाय जमिनीला खिळले. तिने जवळ येऊन एकदम लोटांगण घातलं माझ्या पायांवर.

"सायेब, तू ग्रेट माणूस. आपण मानलं तुला. तू बोल्ला ना शाप सुटेन... सुटला बघ. माझा ह्या स्टेशनाचा शाप सुटला. सात वर्षांनी रे .. सुटला आता.. वो मर गया. मला मोकळं करून गेला." तिला अनावर हसू येऊ लागलं. तिचा चेहरा तसल्या हसण्याने भेसूर दिसायला लागला.

"रमेशचा पोरगा... गेला तो... हिते टाकून गेले होते ना मी त्याला... सैतान... सात वर्षं जगला तो. एक दिवसाचा टाकून पळून गेले. वाटलं होतं... भुकेनं मरेल अन् सुटेल तो. पण नाही... जगला ना तो. त्यानंच मला दोन वर्षांत हितं खेचून आणलं. याच स्टेशनावर... धंदा करत होते. कधी नाई ती कुणाचीतरी लग्नाची बायको बनायला गेले. सक्सेना... इंजेक्शन... मार... बरोब्बर हितेच आणून टाकलं.... सात वर्षं... लई भोगला रे शाप.. आज संपला... सायेब, तुझ्या आशीर्वादानं संपला."

ती पुन्हा पुन्हा तुटक तुटक तेच तेच बोलत होती. मला मळमळायला लागलं. डोळ्यांसमोर अंधेरी येऊ लागली.

तो? तो गेला तो हिचा मुलगा होता? हिच्या पोटचा? नि ही त्याच्या मरणाची वाट पाहत सात वर्षं इथे राहत होती? अशी आई असू शकते? पोराला टाकून पळून जाणारी? त्याच्या मरणाची इच्छा करणारी? आणि माझ्या आशीर्वादाने तो मेला? इतकी अभद्र वाचासिद्धी मला कधी प्राप्त झाली?

विजेचा झटका बसल्यासारखी ती उठली.
"सायेब, थांब. तुला कायतरी देते. नवस फेडते म्हण पायजेतर.. आलेच.. थांब"
ती पळत सुटली. स्टेशनाबाहेर गेली. मला तिची प्रचंड भीती वाटायला लागली. घामाने माझं अंग डबडबून आलं. मी इकडेतिकडे भ्रमिष्टासारखा फिरू लागलो.

तेवढ्यात देवाने माझी प्रार्थना ऐकल्यासारखी माझ्या गाडीची घोषणा झाली. लगेचच पाच मिनिटांत गाडी स्टेशनात शिरली. वेडीचा कुठेही पत्ता नव्हता. मी धडधडत्या छातीने गाडीत चढलो. रात्र बरीच झाली होती, त्यामुळे लोक गाडीतले दिवे मालवून झोपले होते. माझ्या ते पथ्यावर पडलं. मी माझ्या जागेवर पुतळ्यासारखा बसून राहिलो. बाहेर वेडीच्या हाका ऐकू आल्यासारख्या वाटल्या. "सायेब... सायेब..." मी बसल्याजागी अंग चोरून घेतलं. बर्थवर सपाट आडवा झालो. ती खिडकीशी येऊन गेली असं वाटलं. रात्रभर तिच्या भीतीने मी जागाच होतो................

................माझ्या आयुष्यात जो तथाकथित 'रायटर्स ब्लॉक' येऊन गेला त्याच्या मुळाशी असलेल्या ह्या घटना. नंतर आयुष्यभर मी माझ्या ठराविक साच्यातल्या मध्यमवर्गीय जगण्याबद्दलच्या कादंबर्‍या पाडल्या. पण हे असलं वास्तव, हे इतकं खरं कधीच लिहू शकलो नाही. लेखणी थांबण्यापूर्वी/थांबवण्यापूर्वी एक संपूर्ण सत्यकथा लिहावी, म्हणून हा खटाटोप. बस्स. बाकी काही नाही.

- shraddhak

लेखन प्रकार: 

सम

वैदेहीने गाडी इमारती समोर आणून लावली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. रात्री अपरात्री ती निशिकांतला विमानतळावर सोडायला-आणायला अनेक वेळा गेली होती. दिल्ली तिला आता नवीन राहिली नव्हती.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा निशिकांतला एका सॉफ्टवेअर फर्मने चांगली लठ्ठ पगाराची नोकरी आणि इतर सुखसोयींबरोबर घरही देण्याची ऑफर दिली, तेव्हा दोघांनी मिळून मंबई सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हल एजन्सी मधली आपली नोकरी सोडून वैदेही दिल्लीला जाण्यासाठी स्वत:हून तयार झाली होती.

दार उघडून आत येऊन तिनं स्वत:ला सोफ्यावर झोकून दिलं. डोक्यावर गरगरणार्‍या पंख्याकडे बघत ती कितीतरी वेळ बसून होती. विचार करून करून ती शिणली होती. जे घडलं ते का घडलं आणि यात चूक कुणाची? मुळात चूक तरी म्हणायची का? प्रश्न आणि नुसतेच प्रश्न. उत्तर नसलेले. स्वतःच स्वत:ला विचारलेले. पण उत्तरं तिची तिलाच शोधायला हवीत, नाही का? तिनंच स्वतःला या गुंत्यात अडकवून घेतलं होतं. रेशमाची लड गुंडाळावी, तशा सगळ्या घटना, सगळ्या भेटी, सगळी बोलणी सगळं हसणं, ... सगळंच तिच्या भोवती गुंडाळत गेलं. इतकं की त्याचं टोक सापडेना. हा गुंता उकलावा, तर सुरुवात कुठून करावी? अगदी सुरुवातीपासून.

दिल्लीला आल्यावर वैदेहीला सगळं नवीन होतं. मुंबईतही निशिकांतचे, तिचे मित्रमंडळी, नोकरीतले सहकारी, अधिकारी यांच्या बरोबर पार्ट्या होत होत्या. पण ते सारं वातावरण वेगळं होतं. सगळे आपले वाटत होते. दिल्लीला आल्यावर निशिकांतच्या office च्या सहकार्‍यांच्या पहिल्याच पार्टीत वैदेही बुजून गेली. कॉर्पोरेट विश्वातल्या मोठमोठ्या हुद्द्यांवरच्या लोकांशी तिचा ट्रॅव्हल एजन्सीत संबंध आला होता,पण तो तेवढ्यापुरता. या पार्टीत मात्र त्यांच्याशी, कुणी निशिकांतचा सहकारी म्हणून तर कुणी बॉस म्हणून बोलताना, हसताना, हात मिळवताना तिला दडपण आलं होतं. कडक सुटाबुटातली माणसं आणि डिझायनर साड्या, वेस्टर्न आऊटफिट आणि दागिने घातलेल्या बायका किती सहजणे वावरत होत्या! हातात वाईनचे ग्लास घेऊन किती सहजपणे गप्पा मारत होत्या! मेहता, सुब्रमण्यम, कपूर ,सिंग, अग्रवाल यांच्या बायकांसारखी ती या विश्वात मुरलेली नव्हती. ते राजकारणी बोलणं, एकमेकांना शालजोडीतले टोमणे मारणं, डिझायनर दागिने, कपडे यांच्या विषयी गप्पा मारणं ... वैदेही पार्टीत गप्प गप्पच असायची. निशिकांत मात्र अगदी सहजपणे वावरत होता. वैदेहीला या वातावरणात रुळायला वेळ लागेल याची त्याला पूर्ण जाणीव होती.

डोकं सुन्न झालं तेव्हा वैदेही उठली आणि बेसिनवर जाऊन तिने गार पाण्याचे हबकारे तोंडावर मारले. बेसिनमध्ये वाहून चाललेल्या पाण्यासारखे सगळे प्रश्न गोलगोल एकत्र गोळा होऊन वाहून गेले तर किती बरं होईल ना! तिने स्वयंपाकघरात जाऊन चहाचं आधण ठेवलं.

जसजसा वेळ जात गेला, तशी वैदेहीला कॉर्पोरेट विश्वाची ओळख आणि सवय होत गेली. ती तेवढ्यापुरतं साजरं करून घ्यायची. एकदा मेहता निशिकांतला म्हणालाही होता," Your wife is too shy, Deshpande. वो तो drinks भी नहीं लेतीं. कुछ सिखाओ यार उनको!" निशिकांतने मात्र तिला कधी आग्रह केला नाही. महिन्यातून त्याच्या अनेक फेर्‍या दिल्ली बाहेर होत होत्या. कधी दोन-तीन दिवस, तर कधी आठ-दहा दिवस. वैदेहीने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी करायला सुरवात केली. ती दिल्लीत रुळली होती.

वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन वैदेही गच्चीत येउन उभी राहिली. सगळीकडे सामसूम होती. खाली गुरखा खुर्चीवर बसून पेंगत होता. इमारतीच्या ८व्या मजल्यावरून सगळं विश्व ती न्याहाळत होती. या गाढ झोपी गेलेल्या विश्वात कुणी तिचं नव्हतं, आणि तसं म्हटलं तर होतंही. कुणी तिचे शेजारी होते, कुणी मैत्रिणी होत्या, कुणी नुसतेच ओळखीचे होते. पण खरंच तिचा कुणी असेल, तर तो फक्त निशिकांत होता. त्याच्यावर तिचं निस्सीम प्रेम होतं. तिच्या कुठल्याही वागण्याने, निर्णयाने जर त्याला त्रास होणार असेल, तर ते तिला नको होतं. तिने मुद्दाम त्याला दुखावण्यासाठी काही केलं नव्हतं.

त्या दिवशीही ती काही मुद्दाम कारण काढून अनुरागच्या शेजारी जाऊन बसली नव्हती. पार्टीत तिला कंटाळा आला होता. सॉफ्ट ड्रिन्कचा ग्लास घेऊन ती स्पीकरच्या शेजारी जाऊन बसली. तिथे तिला शांतपणे बसून पंडित शिवकुमार शर्मांचं संतूर वादन एकता येत होतं. ती अगदी तल्लीन झाली होती. तिला कुणीतरी हसल्या सारखं वाटलं म्हणून तिने वळून बघितलं, तर तो टेबलाच्या दुसर्‍या टोकाला बसून हसत होता. तिचं लक्ष गेल्याचं पाहताच तो वरमला. " Sorry, आप इतनी डूब गयी थीं उस संगीत में, की आप बैठे बैठे खुद बजा रही थीं, मुझे हँसी आ गयी. Please don't mind." तिलाही हसू आलं. त्याला कधी बघितलं नव्हतं आधी, म्हणून मग परिचयाचे सोपस्कार झाले. तसा दिल्लीचाच असूनही शिकायला मुंबईत आल्यामुळे त्याला बरंचसं मराठी येत होतं. नुकताच शिकून बाहेर पडलेल्या त्याला, campus placement मधून या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्या दिवशी वैदेहीला अनुराग शर्मा नावाचा नवा मित्र मिळाला. सुरवातीच्या 'Madam' पासून, एकेरी संबोधनापर्यंत त्यांची मैत्री येऊन पोचली.

'मित्र मित्र' म्हणजे तरी काय आणि कोण? ज्याच्याशी बोलायला, ज्याच्याबरोबर वेळ घालवायला आपल्याला आवडतं. ज्याला आपली काळजी आहे, आपल्या आवडीनिवडी, त्याच्याशी असलेल्या मतभेदांसकट जो स्वीकारतो, जो आपल्याला खरंच आपला वाटतो.. मग अनुराग या सगळ्या व्याख्येत बसतो नं! त्या नंतरच्या पार्ट्यांमधे वैदेही कंटाळली नाही. त्याच्याशी मस्त गप्पा मारता यायच्या. इतरही कधी तो भेटला तर त्याच्या बरोबर एखाद्या कॅफे मधे जाऊन मस्तपैकी कॉफी आणि सँडविच खात अनेक विषयांवर गप्पा मारताना कधी दडपण आलं नाही. आपलं कुठे चुकतंय असं वाटलं नाही.

मी असं काय केलं म्हणून हे सगळं घडलं? या प्रश्नापाशी येऊन वैदही गोल गोल फिरत होती. कधी मधे त्याचा ओझरता स्पर्श झाला असेलच ना! तेव्हा आपल्याला काहीच जाणवलं नाही?

निशिकांत असताना तो अनेकदा घरी येतो. कितीदा तरी त्याला घरी जेवायला बोलावलं आहे. त्याला आवडतात म्हणून खास मराठी पदार्थ बनवले. तो नेहमीच दोघांशी आदराने बोलतो. निशिकांतला 'सर'च म्हणतो. निशिकांत कधी कधी त्याला म्हणतो देखील, "तू हिला वैदेही म्हणतोस आणि मला सर.. असं का रे?" त्याचं नेहमी प्रमाणे उत्तर तयार, " वो क्या है न सर, इनके साथ जरा दोस्ती गहरी है. आप तो मेरे बॉस ही रहेंगे." तो डिपार्टमेंट मधेच ज्युनियर आहे नं. कधी निशिकांत टूरवर असला तरी अधून मधून येऊन जातो घरी. त्याच्या बहिणीच्या लग्नालाही बोलावलं होतं, खास आग्रहाचं आमंत्रण देऊन.

तो निशिकांतचा ज्युनियर आहे... मग त्याच्याशी इतक्या मोकळेपणाने मैत्री करु नये, त्याच्या बरोबर कधी बाहेर जाऊ नये... अशी शंका त्या तिघांच्या मनात कधी आली नाही. का यावी? दोन व्यक्तींमधे मैत्री असू शकत नाही? आपल्या नवर्‍याच्या ऑफिसमधील कनिष्ठ अधिकार्‍याबरोबर आपली मैत्री असू नये .. असं कुठल्या नियमात लिहिलेलं आहे? वैदही आणि तो अनेक बाबतीत सारखेच होते. दोघांना गाण्यांची आवड होती, साधं सरळ रहाणं पसंत होतं, घरगुती वातावरणात वाढलेले दोघेही छानछोकीला, झगमगाटाला बघून दडपून जायचे.

निशिकांतला कधी आक्षेप नव्हता या मैत्रीवर. तो इतक्या संकुचित विचारांचा नक्कीच नव्हता. वैदेहीने आपलं आयुष्य आपल्या आवडीने जगावं असं त्याचं ठाम मत होतं. तो नसतानाही, तिच्या अनुराग बरोबर संगीताच्या मैफिलींना जाण्याने त्याच्या मनात कुठलाच किंतु आला नाही. त्याचा वैदेहीवरही पूर्ण विश्वास होता. तिच्यावरच्या प्रेमाआड असल्या क्षुल्लक बाबी कधी आल्या नाहीत.

त्या दिवशीही दोघे असेच मस्त गझलच्या कार्यक्रमाहून परतत होते. निशिकांत कामात अडकून पडला आणि येऊ न शकल्यामुळे हळहळला होता. कार्यक्रम सुंदरच झाला. वैदेही अगदी खुशीत होती. अनुरागने गाडी काढली तेव्हा निशिकांतचा फोन वाजला. 'निघालोच आहोत, आल्यावर सांगेन सगळा वृत्तांत' म्हणून तिने फोन ठेवला. अनुरागने एकवार तिच्याकडे बघितलं आणि गाडी गियर मधे टाकली. वैदही आपल्याच तंद्रीत गुणगुणत होती. अनुरागने गाडी बाजूला घेतली आणि ब्रेक मारला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. तो काहीच बोलेना. तेव्हा तिने विचारलं, " क्या हुआ? गाडी क्यूँ रोक दी?"
" वैदेही, कुछ कहना चाहता हूँ."
"बोल, काय?"
"कसं बोलू तुझ्याशी, कळत नाही. पण आज हिंमत करतोच. "
"....."
"वैदेही, तुम बहोत सुंदर हो. तुझ्यासारखी मुलगी मी आज पर्यंत बघितली नाही. तुझ्या बरोबर असतो तेव्हा मी पवित्र होऊन जातो."
अनुराग काय बोलतोय ,त्याला काय प्रतिक्रिया द्यावी ... तिला कळेना.
" अनुराग, मी विवाहित आहे आणि तुझ्या पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. माहित आहे ना?" शेवटी इतकंच ती म्हणाली.
" मला माहीत आहे, कळतंय मला, पण काय करु? तुम मुझे बहोत अच्छी लगती हो."
वैदेहीने स्वतःला सावरलं. अनुराग कुणी असा तसा मुलगा नव्हताच मुळी. इतके दिवस ती ओळखत होती त्याला. तो तिला सांगत होता त्या त्याच्या भावना होत्या. वास्तविक तिने चिडून त्याच्या एक सणसणीत वाजवली असती, तरी ते चूक नव्हतं. कदाचित तिने तेच केलंही असतं. याची हिंमत कशी होते माझ्याशी असं काही बोलायची? पण का कोण जाणे, तिने असं काही केलं नाही.
ती शांतपणे म्हणाली, "देखो, तुम गलती कर रहे हो. "
"वैदेही, मी चुकतोय का बरोबर आहे याचा मी विचार करत नाही. माझ्या मनात जे होतं ते सांगतोय. तू माझ्या बॉसची बायको आहेस हे ही मला माहीत आहे. "
दोन शिकल्या सवरलेल्या, स्वत:वर पूर्ण विश्वास आणि ताबा असलेल्या व्यक्ती एकमेकांशी बोलत होत्या.
"वैदेही, अगदी स्पष्टच सांगायचं तर,.... मुझे तुमसे प्यार हो गया है. मला जात-पात, वय कशाची पर्वा नाही."
" हे तुझं वय बोलतंय. तू लहान आहेस अजून. मला मान्य आहे, तुला कदाचित माझ्याबद्दल आकर्षण वाटत असेल. पण ते खरं नाही. तू शांतपणे विचार कर. तुलाही पटेल हे. आता उशीर फार होतोय. आपण निघालं पहिजे. तू करशील drive, की मी करु?"
"पण..."
"या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलू, तू नीट विचार कर, मग."
वैदही आता काही बोलणार नाही हे लक्षात आल्यावर अनुरागने एक खोल निश्वास सोडला आणि गाडी चालू केली. संपूर्ण रस्ताभर कुणी कुणाशी बोललं नाही.

निशिकांतने दार उघडलं तेच उत्सुकतेने. त्याला मैफिलीचा वृत्तांत हवा होता. वैदेही काही न बोलता हसली फक्त आणि त्याच्या मिठीत शिरली.

दोन दिवस वैदेहीच्या डोक्यात सारखे अनुरागचे शब्द घुमत होते. आपण किती शांतपणे वागलो याचं तिला स्वत:ला आश्चर्य वाटलं. आपण बरोबर केलं, का एक घाव दोन तुकडे करून त्याला त्याच्या वर्तनाची चांगली शिक्षा द्यायला हवी होती? कुणास ठाऊक? एखाद्या व्यक्तीने आपल्या भावना प्रकट केल्या तर त्याची त्याला शिक्षा करावी? ते तर ती अजूनही करू शकते. त्याच्या विरूद्ध तक्रार करून. पण खरंच त्याची गरज आहे का? त्याचं सगळ करिअर पणाला लावायचं? त्याने चूक केली असेल! खरंच केली का? असली तरी त्याची काय शिक्षा मिळावी त्याला? वैदेहीला काही सुचेनासं झाल. अनुराग एक चांगला, समजूतदार आणि हुशार मुलगा होता. एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या एखाद्या व्यक्तीबद्दल काय वाटावे, याचे कुठे नियम असतात का? त्याच्यावर कुणाचं बंधन असत नाही, की जबरदस्तीही असत नाही. मी असं काय केलं म्हणून अनुरागला माझ्याविषयी अशा भावना उत्पन्न झाल्या? म्हणजे, यात माझीही चूक आहेच? या सगळ्या प्रश्नांनी वैदहीचा चांगलाच पिच्छा पुरवला होता.

अनुरागचा त्या दिवशी नंतर फोनही आला नाही. आपण फोन करावा का? असाही विचार एकदोनदा वैदहीच्या मनात डोकावून गेला. निशिकांतला सगळं सांगून टाकावं असं तिला सारखं वाटत होतं. पण नाही सांगितलं. तिचा निशिकांतच्या समजूतदारपणावर पूर्ण भरवसा होता. पण, हे सारं त्याला कळण्याची खरंच गरज आहे का? याचा निर्णय तिला करता येईना.

दोन दिवसांनी दुपारी ऑफिस मधे तिचा फोन वाजला. अनुरागचा नंबर तिने ओळखला. घ्यावा का नाही या विचारातच तिने फोन उचलला.
"तू माझा फोन घेशील याची खात्री नव्हती मला. माझ्याशी बोलण्याची तरी तुझी तयारी आहे त्याबद्दल थॅन्क्स.
"मी इथे ऑफिसमध्ये तुझ्याशी काही बोलू शकत नाही. संध्याकाळी भेट, मग बोलू शांतपणे." आपण त्याला पुन्हा भेटायचं का कबूल केलं? पण या सगळ्याचा काहीतरी शेवट करायलाच हवा.

संध्याकाळी ती कॅफेमध्ये शिरली तेव्हा अनुराग आधीच एका कोपर्‍यातल्या टेबलावर बसला होता. दोघांमधील तणाव सहज कळत होता. तिला पाहताच तो उठून उभा राहिला. दोघेही बसले आणि कॉफीची ऑर्डर दिली.
"आता बोल. अजून काय म्हणणं बाकी आहे."
"मी तुला फार दुखावलं आहे ना? त्याच्या बद्दल मी माफी मागतो. माफ करायचं की नाही ते तू ठरव. खरं सांगू, मी त्यादिवशी घरी गेल्यावर खरंच नीट विचार केला. तू म्हणतेस ते कदाचित खरं आहे. आणि तेव्हा मला हेही जाणवलं की तिथे तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर तिने इतक्या शांतपणे माझं ऐकूनही घेतलं नसतं आणि मला समजावलंही नसतं. मी त्या दिवशी माझ्या गालावर चार बोट मिरवतच घरी पोहचलो असतो आणि आज बेरोजगार असतो."

त्या ताणलेल्या परिस्थितीतही वैदेहीला हसू आलं. दोघांतला ताण एकदम सैल झाल्या सारखा वाटला.
"अनुराग, वाईट तर मला वाटलंच. आपल्या मैत्रीचा तू असा अर्थ काढावास ते माझ्या फार मनाला लागलं. पण तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. कुठलही वेडवाकडं पाऊल उचलणार नाहीस याची मला खात्री आहे."
"इतकं होऊनही तू माझ्यावर विश्वास ठेवतेस, यातच सारं आलं. मी तुला प्रॉमिस करतो, या पुढे असं माझ्या हातून काही घडणार नाही ज्यामुळे तुलाच काय , कुणालाही त्रास होईल. पण एक वाक्य त्या दिवशी मी बोलून गेलो, आज ते फारच फिल्मी वाटतंय, तरी खरंय. वैदेही, तुझ्याबरोबर मी खरंच पवित्र होऊन जातो."
"चल, आता डायलॉगबाजी बंद कर आणि शिक्षा भोगायला तयार रहा."
"तू म्हणशील ते मी भोगायला तयार आहे."
"तर मग आता बिल तू भर, मला निघायला हवं आता. निशिकांतची आज १२.३० ची फ्लाईट आहे. घरी जाऊन त्याची तयारी करायची आहे अजून."
इतक मोठं डोक्यात भिरभिरणारं वादळ, दोन मिनिटात शांत झालं!?
संध्याकाळी सामान आवरून, जेवणं आटपून ती आणि निशिकांत कॉफीचे मग घेऊन बसले तेव्हा ती म्हणाली,
"निशिकांत, तुला काही सांगायचंय." तिनी सगळं पहिल्यापासून त्याला सांगितलं तेव्हा तिला हलकं हलकं वाटलं. त्याला सांगावं का नाही या प्रश्नाचा तिने शेवटी निर्णय घेतला होता. तिचं सगळं त्याने शांतपणे ऐकून घेतलं. तो काहीच बोलला नाही. तिला फक्त जवळ घेतलं आणि दोघं कितीतरी वेळ तसेच बसून होते. निशिकांतला काही बोलण्याची गरज नव्हती.

पाचाचे कुठेतरी टोले पडले तेव्हा वैदेही जागी झाली. तिला गच्चीतच खुर्चीवर झोप लागली होती. नवीन दिवस उजाडला होता. काल निशिकांतच्या आश्वासक मिठीत ती सुखी झाली होती. कुठूनतरी भैरवीचे स्वर तरंगत येत होते. आरोहातल्या स्वरांपेक्षा तिला अवरोहातले उलट जाणारे सगळे स्वर जास्तच स्पष्ट ऐकू येत होत. सगळेच्या सगळे अगदी पक्के लागले होते. प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा, जे घडलं त्यामुळे नवीन प्रश्न तयार होऊ नयेत म्हणून अगदी अचूकपणे समेवर येणं तिला जमलं होत. डोक्यात भिरभिरणार्‍या प्रश्नांना तिने त्या अवरोहातल्या स्वरांबरोबर समेवर नेऊन सोडल तेव्हा फोनची रिंग वाजली. भैरवीतले सगळे स्वर गोळा करून ती निशिकांतचा फोन घ्यायला घरात शिरली.

- pama

लेखन प्रकार: