कविता

चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!

कोणते नाते कुणाशी?... आठवावे लागते!
चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!

माणसे न्याहाळताना आरश्याला कैकदा....
'चेहरा की मुखवटा' हे पारखावे लागते!

फक्त पाढे घोकुनी, सुटते कुठे अवघड-गणित?
दु:ख-दु:खाने, सुखासाठी गुणावे लागते!

खुंटते काही कुणाचे सांग का कोणा विना?
श्वास येतो, श्वास जातो अन् जगावे लागते!

यंत्रवत् उरले जरी नाते तुझ्या- माझ्यातले...
बोलण्याचे तंत्र दोघांना जपावे लागते!

सद-विचारांची कितीही मंथने केली तरी...
सूर ना जुळता स्वतःशी गुण-गुणावे लागते!

सात फेरे मारल्याने प्रेम का जडते 'प्रिया'?
योग्य साथी लाभण्या 'युग-युग' झुरावे लागते!

लेखन प्रकार: 

तुझी आठवण

मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण !

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण ?

निरोप घेता मळभ दाटले
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे
असे जसे वळवाचे शिंपण !

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतींचे घेउन दर्पण !

- क्रांति

लेखन प्रकार: 

दोनुली

( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. आपण जेव्हा एखादी रचना लिहितो तेव्हा त्या विषयाचा एक अव्यक्त भाव मनात दडुन बसतो...आपण आपल्या बुध्दीला-मनाला पटेल तेवढे लिहुन मोकळे होतो., मात्र हा अव्यक्त भाव लपुन बसतो...कदाचित हा "दोनुली" काव्यसंग्रहाचाच परिणाम असावा..मला माझ्या काही रचनांचा अव्यक्त भाव उमगला आणि मी दोनुली लिहिण्याचा एक प्रयत्न केला.)

प्रश्न

प्रश्नच प्रश्न, कधी डोंगरा सारखे
कधी झाडाएवढे
प्रश्नांचा गुंता सुटता सुटत नाही
उगवत्या सूर्यासोबत रोज येतात

लेखन प्रकार: 

काजळ

kajal_kavita1.jpg

कधी किनारा कधी मेघ अन्, कधी इशारा असते काजळ
ओळख पटता गतजन्मांची, डोळ्यांआधी हसते काजळ

लावण्याचे ओठ हरवती, जेंव्हा त्यावर नसते काजळ
धुंद बदामी प्रत्यंचेतून, आरपार हे घुसते काजळ

जरा पाहता कुणी विखारी, नागीण जैसे डसते काजळ
श्रावणातल्या नभातुनीही, मला अताशा दिसते काजळ

डोळ्यांमधल्या वाटेवरूनी, कुठे साजणा? पुसते काजळ
विरहामध्ये वाट पाहता, अबोध वेडे; रूसते काजळ

रूपगर्विता, तूच अप्सरा, तुला पुरे गं; नुसते काजळ
कधी उमटले? कसे, कुणावर? किती बहाणे; फसते काजळ

लेखन प्रकार: 

आठवते का गं

मज आठवते ते सारे
तुजला आठवते का गं...
मी तुला चिडवले कितीदा धरला न कधी तू राग...

bahinbhau1.jpg

होते दैवाने लिहीले
नशिबी अपुल्या हे नाते
एकाच कुशीतुनी आलो
आणि दूधही एकच होते
तू भाऊ म्हणाली जेंव्हा हे धन्य जिणे झाले गं...

तू खेळ मांडुनी बसता
मी मोडुनी हासत होतो
तू पुस्तक वाचत असता
मी खोडी काढत होतो
कधी प्रेमानेही मजवर ना हात उचलला तू गं...

तू शाळेला निघताना
मी दप्तर लपून ठेवी
तू काही ना करताही
मी आईला भडकावी

लेखन प्रकार: 

थांग

लावायचा होता ना तुला आपल्या नात्याचा थांग..
आणि माझ्या मते ते अथांग होतं..
कसे वेडे हट्ट तरी असतात..
कसले वेडे दिवस...
कशाला हवं असायचं तुला विश्लेषण करायला प्रत्येक गोष्टीचं?
पाण्यात उतरण्या आधीच तळाचा अंदाज घ्यायची तुझी घाई,
आणि ते छान उतरुन अनुभवायची माझी पद्धत..
कधी कधी विश्लेषण करण्याच्या नादात विसरुन जातो ना आपण अनुभवणं?
समजलं नाही का तुला हे?
की अनुभवण्याच्या नादात साध्या गोष्टीही लक्षात यायच्या राहून जातात,
हे मला समजलं नाही..
जे असेल ते..
थोडी वाट पहायला हवी होती का आपण?
उशीरा का होईना सापडला असताच की आपल्याला तळ, आपल्या नात्याचा..
फक्त पाणी गढूळायला नको होतं रे..!

लेखन प्रकार: 

खेळ

यु नो व्हॉट,
तू आणि मी..
टेनिस सिंगल्स..
व्हॉट अ शॉट!

प्रेक्षकांतही
समोरासमोर!
आपणच दोघं..
नजरानजर!!

सत्य की भूत?
सच अ रिलीफ!
लाइव नाहीये..
फाईल शूट.

डबल फॉल्ट,
अ‍ॅडव्हॅंटेज,
ड्यूस आणि एस,
व्हॉट अ शॉट!

मॅच पॉईन्ट,
हँड शेक,
औपचारिक
मिठी एक.

- संघमित्रा

लेखन प्रकार: 

हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे

किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते
विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?

’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी
मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे

लेखन प्रकार: 

तू समोरी

तू समोरी अन् अशी ही पावसाची सर कशाला?
लाभले एकाच वेळी एवढे हे वर कशाला?

भोवती नाही कुणी हा फक्त योगायोग नाही
दैव देते आपल्याला हे असे अवसर कशाला?

यापुढे उपयोग रात्रींचा मला व्हावा निजाया
यापुढे भेटीस स्वप्नांचा उगा वापर कशाला?

संयमाने वागते काळीज माझे एरव्ही, पण
या क्षणी त्या संयमाचा वाटतो अडसर कशाला?

"ही अचानक भेट पण कां वाटते ठरवून झाली?"
ह्या जगाच्या चौकशांना द्यायचे उत्तर कशाला?

- जयन्ता५२

लेखन प्रकार: